घटस्फोट भाग -३
घटस्फोट भाग -३
आठवडाभर मेधा मुलांच्या खोलीत झोपूनच होती. कॉलेज मधून तिने १५ दिवसांची रजा घेतली होती.घरातल्या कोणालाच कळत नव्हते की मेधाला काय झाले आहे. तीने सांगून ठेवले होते डॉक्टरांना बोलावण्याची काहीच गरज नाही, काही दिवस आराम केल्यावर तीला बरे वाटेल. थोडासा थकवा जाणवत आहे बाकी काहीच नाही.
आविला तिच्या बरोबर बोलायचे होते, तिची माफी मागायची होती, पण तिच्या बरोबर कधी मुले, कधी शालू ताई तर कधी आई असायची. आवीला एकदा तरी तिच्याशी एकांतात बोलायचे होते पण योगच जुळत नव्हता. शेवटी रविवारी त्याने संध्याकाळी शालू ताईंना मुलांना घेऊन जवळच्या पार्क मध्ये पाठवले. आई बाबा पण झोपले होते. तो मुलांच्या खोलीत गेला. मेधा खिडकी जवळ उभी होती. अविला बघून ती गोंधळली.
मेधा तुझ्याशी बोलायचे होते म्हणून मुलांना आणि शालू ताईंना बाहेर पार्क मध्ये पाठवले आहे. आई बाबा झोपले आहेत. मेधा मी फार चुकीचे वागलो. मी नीलिमाला माझ्या आयुष्यातून बाहेर काढून टाकले आहे. नीलिमा कालच पुणे सोडून निघून गेली. ही चूक माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक समझ. मी पुन्हा असे कधीच वागणार नाही. हवं तर मी तुझ्या पाया पडतो पण मला माफ कर. त्याच्या डोळ्यांत पष्यातापाचे अश्रू होते. तो हतबल होऊन तिची मनापासून माफी मागत होता.
मेधा म्हणाली तू जे काही केलेस त्याला चूक म्हणतोस, चुका लहान मुले करतात अवि, मोठी माणसं गुन्हा करतात. हीच चूक माझ्या कडून घडली असती तर स्वीकारलं असत का तू मला?? तो गप्पा उभा होता. त्याला काय बोलावे सुचत नव्हते.
नाही ना ... मग मी तुला माफ करावे अशी अपेक्षा का करतोस तु माझ्या कडून ??
मी एक स्त्री आहे म्हणून ??? आणि तू पुरुष आहेस तर तुला सर्व गुन्हे माफ ...
गेले सहा महिने तू त्या परस्त्री बरोबर संबंध ठेवलेस, तेव्हा तुला माझी, मुलांची, आपल्या परिवाराची आठवण आली नाही. अवि लग्नाचा पाया नवरा बायको मधला विश्वास असतो, जो मी तोझ्यावर डोळे झाकून केला, पण तू माझा विश्वासघात केलास. मी स्वप्नात पण विचार नव्हता केला की तू असे करशील. तू माझे मन दुखावलेस. माझ्या मनाला असंख्य यातना दिल्यास ...
म्हणून तर तुझी माफी मागतोय मी..
माफीचा प्रश्नच उरत नाही अवि, माझे मन भावना शून्य झाले आहे. माझ्या मनात तुझ्यासाठी ना प्रेम उरले आहे ना द्वेष. आपल्यात कोणतेही संबंध उरले नाहीत. आपल्या मनांचा घटस्फोट त्याच दिवशी झाला होता.मनातून मी तुझ्या पासून त्याच दिवशी वेगळी झाले अवि, तू मोकळा आहेस...
घटस्फोट ... असे नको बोलूस मेधा, अग आपल्या मुलांचा तरी विचार केलास का तू.
हो नक्कीच केला आहे, मुलांचाच काय, तर आई बाबा, समाज, सगळा विचार करूनच बोलत आहे मी. मुलांसाठी, आई बाबांसाठी , या घराच्या आब्रू साठी मी ह्याच घरात राहणार आहे, पण आपल्यातले नवरा बायकोचे संबंध या पुढे संपलेत. तुझी वाट तुला मोकळी आहे. मला तुझ्या कडून कसलीच अपेक्षा नाही, आणि हा विषय इथेच संपव आता.मला या विषयाची बोंबाबोम कुठेच करायची नाही. मुलांसमोर तर मुळीच नाही, उगाच त्यांचा त्यांच्या बाबावरचा विश्वास उडायला नको.
मेधा जे बोलत होती, बरोबरच होते. ती एकटी घर सांभाळण्यास सक्षम होती.अवि टूरला जयायचा तेव्हा तिच मुलांचा अभ्यास, आई बाबांची औषधे, किराणा, बिल भरणे, सर्व तिच बघायची. शिवाय ती स्वतःच्या पायावर उभी होती, आर्थिकरित्या सक्षम होती, कुठे ही एकटी राहू शकली असती. तिला त्याच्या कडून पोटगीची पण गरज नव्हती.
ती जर घर सोडून निघून गेली असती, तर सर्वात जास्त नुकसान अविचेच झाले असते. घटस्फोटा साठी जर तिने कोर्टात अर्ज टाकला असता तर त्याचे नाव तर खराब झाले असतेच, कदाचित नोकरी पण गेली असती. आई बाबा, समाज, मुले, सासू सासरे, सर्वांच्याच नजरेतून तो उतरला असता.
मेधा म्हणाली आपण दोघे शरीराने जरी एकाच घरात राहत असलो, तरी मनाने मात्र मी तुला घटस्फोट दिला आहे हेच खरे...