वादळ भाग १
वादळ भाग १
भाग १
रकमा .... ए ...रकमा ... हे घे पन्नास हजार रुपये....
एवढे पैसे....
अग हापूस आंब्याची बरीच मागणी वाढली आहे, देशातच नाही तर परदेशात पण, म्हणून चांगल्या किमतीत विकला गेला आंबा.
पैसे सांभाळून ठेव घरात...
घराची थोडी डाग डुज करू, नंतर पोरीच्या लग्नाच्या तयारीला लागायला आपण मोकळे...
हो ना..तसं पण दूसरी खेप आंब्यांची कोवळी आहे, त्याला झाडा वरून काढायला अजून पंधरा वीस दिवस तरी लागतील, तो पर्यंत आपण घराचे बांधकाम उरकून घेऊ नाहीतर घाई होईल... रकमा बोलली.
"अग झाडं नुसती लगडली आहेत कोवळ्या आंब्यांनी, एकदा आंबा तयार झाला की त्याला विकून आपल्याला ह्याच्या पेक्षा जास्त पैसे भेटतील. पोरीचे लग्न करून पण थोडे फार पैसे उरतील आपल्या गाठीला. ह्या वर्षी कशाची कमतरता भासणार नाय बघ आपल्याला. घराची दुरुस्ती होईल, पोरीचं लग्न होईल, आणि हाती थोडा पैसा पण राहील आपल्या, परमेश्वर आपल्या पाठीशी आहे"
रकमा आणि किशोर दोघे रत्नागिरी जिल्हयाच्या एका छोट्याश्या गावात राहत होते. मुलगी वयात आली होती, तर मुलगा मामाच्या गावी शिक्षणासाठी राहत होता.
गाव अगदी लहानसे, पण सौंदर्याने नटलेले होते. हापूसची शेती हा तिथला मुख्य व्यवसाय होता. पण ह्या वर्षी काही लोकांनी पपयी, तर काहींनी केळ्यांची शेती केली होती. गावातली माणसं फार प्रेमळ होती.
शेतकऱ्यांचे गाव, वेग वेगळ्या हंगामात वेग वेगळया पिकांची लागवड करीत असत. कधी निसर्गाने साथ दिली तर भरघोस पीक आणि कधी पाऊस जास्त झाला तर नुकसान पण होई, म्हणून लोकांनी सरकारी नियमानुसार पिकांचा विमा काढायला सुरुवात केली होती. शेवटी कोकणातले गाव, पावसाची हामी कोण घेणार??? रकमा, मुलगी आरती आणि किशोर तिघांनी मिळून घराचे बांधकाम पूर्ण केले.
आठ दहा दिवस झाले असतील. दोन चार दिवसात आंबा काढावा लागणार होता, परत त्याची तयारी.
त्या दिवशी तिघांनी दिवसभर भरपूर काम केले होते, म्हणून रात्री जेवून लवकर झोपले.
तेवढ्यात लाईट गेली, सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला. विजा चमकू लागल्या. वारा पाण्याचा रंग काही वेगळाच वाटत होता. मध्य रात्र झाली तरी पाऊस काही थांबेना. किशोरच्या मनात भीती दाटून आली. तो समजला की हा वादळ आहे, चक्रीवादळ !
त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. तो रडू लागला. रकमाने पण डोळ्याला पदर लावला. खूप मेहनत घेऊन त्यांनी आंब्याची शेती केली होती, त्या हाता तोंडाशी आल्येल्या फळाचे खूप नुकसान होणार होते.
हवा आणि पाऊस इतका होता की त्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडत होती. ते तिघे कसे तरी घराच्या एक एक कोपऱ्यात शरीराचे मुटकुळे बनवून बसले होते. कधी एकदा वादळ थांबेल आणि कधी एकदा सकाळ होईल, असे झाले होते त्यांना. जीवाची पण भीती होतीच.
सकाळी दहा अकरा वाजे पर्यंत वाऱ्या पाण्याचा खेळ असाच सुरू होता. एवढ्या पावसात दरवाजा उघडून बाहेर बघणेही शक्य नव्हते. दुपार होत आली होती पण बाहेर अंधार दाटलेलाच होता. थोडीशी खिडकी उघडून ते बाहेरच्या स्थितीचा अंदाज घेत. बाहेर कोणीच दिसत नव्हते अगदी शुकशुकाट होता. आवाज होता तो फक्त वारा, पाऊस आणि विजांचा.
दुपारी दोन वाजेपर्यंत पाऊस थोडा ओसरला. रात्रभर त्या तिघांच्या डोळ्याला झोप नव्हती. तिघेही सारखे राहून राहून रडत होते. पावसाने त्यांच्या आशा, आकांशा, मेहनत, सगळ्यांवर पाणी फेरले होते. नको तेव्हा वादळ धडकले होते.घराचे पत्रे उडाले होते म्हणून एका भागातून पाणी आत शिरायला लागले होते.
शेवटी वादळाचे रौद्र रुप शांत झाले, तरी पाऊस सुरुच होता.
मोठ्या हिमतीने त्या तिघांनी घराबाहेर पाऊल ठेवले. बाहेरची परिस्थिती फार वाईट होती. बऱ्याच लोकांचे घराची कौले उडाली होती. कुठे पत्रे उडाले होते. एकाच्या बैल जोडी वर वीज पडली होती आणि त्या बैलांचा जागीच मृत्यू झाला होता. शेती तर जमीन दोस्त झाली होती. नशिबाने जीवित हानी झाली नव्हती. देव कोपला,सागर खवळला, वादळ आले आणि हाता तोंडाशी आलेला घास नाहीसा झाला. शेती, घर सगळेच उध्वस्त झाले. शेतकऱ्याला उघड्यावर पाडून गेला होता वादळ. शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत, पैसा सर्वच धुळीत मिळाले होते. पावसाची रीप रीप सुरुच होती. सर्व शेतकरी बांधव डोक्यावर मेनकापड तर काही जण छत्र्या घेऊन आपल आपल्या शेता कडे निघाले. किशोर ने आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर बघितला. पावसाने चांगलीच उचल ठेव केली होती. सर्व तसेच सोडून त्याने ही शेताकडे धाव घेतली. त्याच्या मागे रकमा पण गेली.
वादळाने त्याचे काम चोख केले होते. जमिनीवर हापूस आंब्यांचा सडा पडला होता. त्याच्यावर दोन तीन झाडे कोसळली होती. सगळी कडे चिखल झाला होता. फळांचा लगदा झाला होता. फार नुकसान झाले होते त्याचे. बिचारा डोक्याला हात लावून तिथेच जमिनीवर बसून धाय मोलकुन रडू लागला.. रकमा त्याला कसे तरी आवरायचं विफळ प्रयत्न करत होती पण सर्वच व्यर्थ होते. आणि थोड्याच वेळात तो जमिनीवर कोसळला.... शहरात जेव्हा वादळ येतो तेव्हा नुकसान हे होतेच पण खरे नुकसान काय आहे हे एक शेतकरीच सांगू शकतो. आपल्याकडे लाईट, पाणी, नेट बंद झाला की आपण हायपर होतो, फोन करून एकमेकांना शुल्क गोष्टींमुळे किती त्रास झाला हे सांगत सुटतो आणि आपण किती अडजस्ट करतो हे दर्शवतो. पण खऱ्या वादळाची झळ आपण सहन करू शकतो का ???
क्रमशः