वादळ भाग २
वादळ भाग २
भाग २
वादळाने त्याचे काम चोख केले होते. जमिनीवर हापूस आंब्यांचा सडा पडला होता. त्याच्यावर दोन तीन झाडे कोसळली होती. सगळी कडे चिखल झाला होता. फळांचा लगदा झाला होता. फार नुकसान झाले होते त्याचे. बिचारा डोक्याला हात लावून तिथेच जमिनीवर बसून धाय मोलकुन रडू लागला.. रकमा त्याला कसे तरी आवरायचा विफळ प्रयत्न करत होती पण सर्वच व्यर्थ होते. आणि थोड्याच वेळात तो जमिनीवर कोसळला....रकमा ने इतर शेतकऱ्यांच्या मदतीने किशोरला कसे तरी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याला हार्ट अटॅक आला होता.
वादळ आल्याने पिकाचे नुकसान होईल हे त्यांना माहीत होतेच पण हातातोंडाशी आलेल्या पिकाची स्वतःच्या डोळ्यादेखत झालेली रायदाना बघून त्याला मोठा धक्काच बसला होता. झालेले नुकसान फार मोठे आणि सावरण्या पलीकडे होते. तो हे सहन करू शकला नाही म्हणून त्याला अटॅक आला होता. औषध उपचारांसाठी त्याला रुग्णालयात ऍडमिट केले होते. दोन तीन दिवसानंतर त्याला रकमा घरी घेऊन आली होती. घरात शुकशुकाट होता. कोणालाही अन्न गोड लागत नव्हते.
वादळाला चार-पाच दिवस झाले होते. रकमा किशोर आणि आरती तिघेही घरातच होते. तेवढ्यात शेजारचा माधव घरी आला. तो सांगू लागला की उद्या सरपंचांनी सभा आयोजित केली आहे. गावात सगळ्यांचे काही ना काही नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्याशेतीचा विमा काढला आहे त्यांना आपले कागत पत्र घेऊन येण्यास सांगितले आहे. उद्या मुख्यमंत्री नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आपल्या गावात दुपार नंतर येणार आहेत. हे सांगून तो निघून गेला. मुख्यमंत्री गावात येण्याची ही पहिलीच वेळ होती. रकमा आणि किशोरच्या जीवात जीव आला होता. आपल्याला नुकसानाची भरपाई नक्की मिळेल असे त्यांना वाटू लागले..त्या रात्री तरी ते व्यवस्थित झोपले होते.
दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आले. त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. राज्य सरकार शेतकऱ्यांना पूर्ण सहयोग करेल शिवाय ही प्राकृतिक हानी आहे म्हणून विम्याची रक्कम ही मिळणारच असे मोठ्या दिमाखाने सांगितले. सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.शिवाय टीव्ही वर बातम्यांमध्ये ही सरकार मदत करणार हे जाहीर करण्यात आले होते. सगळे खुश झाले. शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले होते पण कमीतकमी पैशांचे नुकसान होणार नाही याबद्दल त्यांना शाश्वती मिळाली होती.
पंधरा दिवसांनी बरीच खटाटोप करून विम्याचे पन्नास हजार मिळाले. सरकार नुकसान भरपाई देणार आहे ह्या आशेने हातात आलेल्या विम्याच्या पैशांमध्ये किशोर ने मुलीचे ठरलेले लग्न काटकसरीने उरकून टाकले. आत्ता हातात असलेला पैसा पण मुलीच्या लग्नात खर्च झाला होता. ते आतुरतेने सरकार जी मदत करणार होती त्या पैशांची वाट बघू लागले. दोघेही अर्ध पोटी राहून कसे तरी दिवस लोटत होते. रकमेचे कानातले विकून शेतीचे काम त्यांनी पुन्हा सुरू केले.
किशोर आणि त्याच्या सारखे गावातले अनेक शेतकरी ग्रामपंचायतीत दिवसा आड फेऱ्या मारू लागले.आंदोलनं ही करून बघितली, दिवस असेच पुढे सरकत होते. दोन वर्षे उलटून गेली होती पण मदत मिळाली नाही. . गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री पण बदलले होते. आता सर्व शेतकरी बांधव नुकसान भरपाई मिळणार होती हे ही विसरून गेले होते. त्यांचे जीवन पुन्हा पूर्वी सारखे सुरू झाले होते सरकारी मदती शिवाय...
धन्यवाद