एक निरागस शांतता
एक निरागस शांतता


आज तिच्याजवळ काहीच नव्हतं आज नियतीने सगळंच हिरावून घेतलं. तुला आता असंच जगावं लागेल असेच जणू काही नियती तिला सांगत होती. चौदा वर्षापूर्वी मोहन आणि प्रिया यांचे लग्न झाले. सुरुवातीचे दिवस खूप आनंदात गेले. हळूहळू त्यांच्या पदरात दान टाकलं, ते फूल. तिचं नाव त्यांनी पूजा ठेवलं. पूजा दिसायला खूप देखणी होती. पूजा मोठी होऊ लागली नंतर त्यांना दुसरे अपत्य झालं. देवाने सगळं सुख त्यांच्या ओंजळीत टाकलं त्यांचा संसार खूप सुखात चालला. जणूकाही कोणाचीही नजर लागेल इतकं सुख, आनंद, प्रसन्नता त्यांच्या संसारात होती.
पूजा आता वयात आली. ती 14 वर्षाची झाली. नियतीला त्यांचे सुख बघवले नाही. पूजाला एके दिवशी ताप आला. तिचा ताप काही केल्या उतरेना. रक्ताच्या तपासण्या केल्या तर हिमोग्लोबिन एकदम पाचवर आलं. मोहन - प्रिया खूप घाबरले इतकी सुंदर हसरी सोज्वळ मुलगी. अचानक त्या सुखी संसाराला खरंच कोणाची तरी नजर लागली. पत्त्याच्या बंगल्याला वाऱ्याची झुळूक लागल्याक्षणी तो अलगद निसटून जातो त्याचप्रमाणे मोहन व प्रियाच्या संसाराला वार्याची झुळूक लागल्यासारखा त्यांचा संसार निसटून गेला.
पुजाला दवाखान्यात ॲडमिट केले. तिला वाचवण्यासाठी डॉक्टर नर्सेस जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होते. त्यांच्या संसाराचा आनंदाचा झरा व्यावहारिक शहाणपणाच्या सान्निध्यात कुठेतरी हरवत चालला होता ते बघून तेव्हा प्रत्येकाला वाटत होतं की या कोवळ्या जिवाला वाचव आणि आमचे प्राण हे यमराजा तू घेऊन जा.
शेवटी तो दिवस आला पूजा आयसीयूमध्ये शेवटचे क्षण मोजत होती आणि बाहेर जीवाभावाचे लोक देवाजवळ तिच्या आयुष्याची भिक मागत होती. खरंच आयुष्याचे गणित हे आजपर्यंत कुणालाच कळले नाही. ज्याचा सहवास आपल्याला हवा असतो तो असा अचानकपणे नाहीसा होतो दिसेनासा होतो आणि जवळ उरते ती फक्त एक नि:शब्द शांतता. डोळ्यासमोर तिचं खळाळणारे हास्य, खोडकरपणा अगदी जिवंत झाल्यासारखा दिसत होता. मृत्यू हा अटळ असतो. तो कोणालाच टाळत नाही. एक हसती खेळती पोर अचानकपणे सगळ्यांना सोडून जाते. आयुष्यभरासाठी वेदनांचे चटके देऊन जाते तिच्या सोबत घालवलेले, जगलेल्या क्षणांचे आठवणीत रूपांतर होतं त्या आठवणी हळुवारपणे मनाला स्पर्श करून जातात. तो स्पर्श पुलकित करून जातात आणि याच आठवणी मनाच्या कोपऱ्यात जागा करून जातात. त्या आयुष्यभरासाठी. आपण म्हणतो बालपण हे रम्य असत पण हे रम्य बालपण एक निरागस जीव अर्ध्यावर सोडून जातो तेव्हा ते कसा रम्य होईल?
हा जीव जेव्हा अर्ध्यातच सगळ्यांना सोडून जातो तेव्हा त्याचा परिणाम हा सर्वप्रथम त्या जीवाच्या माता-पित्यावर होत असतो. तो त्यांच्या काळजाचा तुकडा असतो. आईने डोळ्याला लावलेला पदर आणि तिच्या आशावादी डोळ्यात भरगच्च भरलेले अश्रू हे सगळं कधीच विसरता येण्यासारखं नाही.
या आठवणी कधीही पुसल्या न जाण्या सारख्या आहेत. या आठवणी डोळ्याच्या कडा पाणावतात. कधीकधी तिच्या गमतीशीर आठवणी चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवतात. याच आठवणींवर आयुष्य पुढे सरतं. या आठवणी कायम हृदयावर कोरल्या जातात.
काही लोक आयुष्यात नको तितकी ढवळाढवळ करतात, नको तितका त्रास देतात. हा केवळ भावनांचा खेळ आहे उठलेल्या स्पंदनाचा खेळ आहे गेलेल्या गेलेल्या आठवणींची सावली आहे. सावली ही कधीच शरीराचा पिच्छा सोडत नाही त्याचप्रमाणे पुजाच्या आठवणी मनात कायम राहतील.
एखादी व्यक्ती मनात इतकी घर करून जाते की ती जेव्हा अचानकपणे सोडून जाते तेव्हा तिच्या संपर्कात असलेल्या आठवणीच फक्त शिल्लक राहतात. त्या आठवणींच्या कप्प्यात असलेल्या गोष्टी हळूहळू कारंजी फुलावे तशा मनात फुलत जातात.
एखादे वासरु आपल्या आईपासून दूर जातं तेव्हा ती गाय आपल्या पिल्लांना शोधण्यासाठी जशी हंबरडा फोडते तशीच अवस्था त्या आईची होते. ती फक्त आईच जाणू शकते. विरहाचे रूपांतर वियोगतच झालं तर शेवटी उरते ते फक्त हळहळणे, दुःख आणि उरलेलं आयुष्य फक्त आणि फक्त आठवणीतच काढायचं. याशिवाय आपल्याजवळ दुसरा पर्यायच उरत नाही. शेवटी आयुष्याचा पूर्णविराम कधी, कुठे, आणि केव्हा धाव करेल हे कोणीच सांगू शकत नाही.