एक होती चिऊ भाग-३
एक होती चिऊ भाग-३
आजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि आजीला काय झाले म्हणून बिचारा अर्णव कावराबावरा होऊन आजीकडे बघत बसला.
आज सुलूला काय झाले होते कुणास ठाऊक पण अश्रू थांबायचे नावच घेईना.ते अविरतपणे वहातच होते.अर्णवने आजीच्या गालाला स्पर्श केला आणि विचारलं,'आजी काय झालं गं? तुला बाऊ झाला का?आपण डॉक्टर काकांकडे जाऊन औषध आणूया हं!'तशी सुलू भानावर आली.निरागस अर्णवबाळाचा पापा घेतला आणि म्हणाली,'नाही रे बाळा, ठीक आहे मी.डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलंय डोळ्यात.'
'बाऊ माझ्या शरीराला नाही, मनाला झालाय' असं ती त्या निष्पाप जीवाला कसं सांगू शकणार होती?
सुलूने बेसीनवर खसाखसा तोंड धुतले.अर्णव तिच्या गाउनला धरुन उभा होता.आपल्या आजीचं काहीतरी बिनसलंय हे त्या चिमण्या जीवाला उमगलं होतं.तोंड पुसता पुसता सुलूचं लक्ष आरशातील आपल्या प्रतिमेकडे गेलं.वयाच्या मानानं किती वयस्कर दिसायला लागलो आहोत आपण! डोळ्यांखाली काळी वर्तुळं, कित्येक दिवसात डाय न केल्याने पांढुरके दिसणारे केस,ढगळ,कळकट,जुनाट गाउन.... सुलूने सुस्कारा सोडला.किती टकाटक रहात होतो आपण एकेकाळी आणि आता.... आपल्या मधील फरक वसंतरावांनाही कधीच जाणवला नाही? सुलू विनमस्क अवस्थेत अर्णवचा हात धरुन मागे वळली.संध्याकाळच्या कुकरची तयारी करायची होती.
खडखड खडखड दाराच्या कडीचा आवाज ऐकून अर्णवजवळ पडलेली सुलू धडपडून उठली.तिने शक्य तेवढ्या वेगाने जात दार उघडले.दारात संध्या उभी होती.
'अरे संध्या तू?'अशी अचानक?'
'अगं हो हो,आत तर येऊ देशील की नाही?'संध्या म्हणाली तशी सुलू ओशाळून बाजूला झाली.
'काय गं सुलू, किती वेळ बेल वाजवायची? आता शेवटचा प्रयत्न म्हणून कडी वाजवली.नसतं दार उघडलंस तर परत जाणार होते.'
'अगं अर्णव झोपलाय ना म्हणून बेल बंद केलीय.'
'आणि वसंतराव कुठेत?'
'हास्यक्लबातला त्यांचा एक मित्र सहा महिने अमेरिकेत राहून परत आलाय ना म्हणून त्यांचं आज गेट टुगेदर आहे.'
'सहा महिने अमेरिकेत कशाला?बेबी सिटींगला?'
'काही कल्पना नाही गं!'
'छान आहे, छान आहे! तुम्ही भारतात बेबी सिटींग करा,ते अमेरिकेत!'
'अगं तू रविवारी नाटकाला येणार आहेस का?'संध्याने अचानक प्रश्न केला आणि सुलू गडबडली.
'आधी बघते बाई कोणाचे काही प्रोग्राम्स ठरले आहेत का ते!'
'त्यांचे प्रोग्राम तुझ्या साठी ते कॅन्सल करु शकणार नाहीत का?'का तुला त्यांच्या सुटीच्या दिवशीही काही तास बाहेर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार??'संध्याच्या या प्रश्नावर सुलू निरुत्तर झाली.
'सुलू, आपल्या कुटुंबियांसाठी जरुर झटावं,पण त्यालासुद्धा काही मर्यादा आहेत ना! स्वतः ला सतत अॅडजेस्टमेंटच्या मोडमध्ये ठेवून दुसऱ्यांना किती प्रायॉरिटी द्यावी त्याच्या सीमारेषा ठरवून घ्याव्यात.आपल्या कष्टांची, त्यागाची जाणीव आपल्या कुटुंबियांना कितपत आहे हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे.जर ते बेफिकीर असतील तर फ्रस्ट्रेशन शिवाय पदरात काहीही पडणार नाही.तेव्हा त्यांना ठणकावून सांग, मी या रविवारी मैत्रिणींबरोबर नाटकाला जाणार आहे.बघू त्यांचीकाय रिअॅक्शन होते आहे ती! मी तुझं तिकीट काढते आहे,कसं यायचं ते तुझं तू बघ!'संध्याने समारोप केला आणि ती निघाली.
दार लावता लावता ही बातमी घरात सांगितली की काय प्रतिक्रिया होईल या विचारात सुलू गढली..
'येत्या रविवारी मी माझ्या मैत्रिणींबरोबर नाटकाला जाणार आहे ',सुलूने रात्री जेवताना जाहीर केले.
(क्रमशः)