दिपावली
दिपावली
यंदाची दिवाळी धाकट्या अजित कडे पुण्यास होती. पण यंदाची दिवाळी जणू काही मोठया मंडळीची अथवा सिनिअर सिटीझनच होती .एक नात सोडली तर कोणीच नातवंडे आली नव्हती. विमला बाईंच्या सुना, मुले, जावई व मुलगी एवढीच मंडळी एकत्र होणार होती.आपल्या दिवंगत नव-याच्या फोटोकडे पहात विमलाबाई विचार करत होत्या.मधेच मनांत हसत होत्या. त्यांना फोटोतून आवाज आल्याचा भास झाला,"काय ग विमल यंदाची, आपल्या कुटुंबाची दिवाळी रोडावल्या सारखी वाटतेय ? " हो ना ! " नातवंडे म्हणजे आपली चिमणे पाखरे पंख विस्तारून दूर गेली आहेत आणि आयुष्यात उंच उंच भरा-या घेतल्याच पाहिजेत ना! आता नातवंडे साता समुद्रापार त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यात व नाती त्यांच्या त्यांच्या सासरी व नात सुना आपल्या नातवंडा बरोबर दूर परदेशात आहेत .आपला काळ वेगळा होता .मुले भारतातच होती. येऊन जाऊन थोरला फक्त दूर असायचा दूर म्हणजे सूरतला".आणि एखाद वर्षी अनिल पण बेहरीनला असल्याने दिवाळीत नव्हता. नाही का हो?" पण बाकी सर्व वर्षी मुले एकत्र होती व असायचीच .दिवाळी म्हटली की एखाद मंगलकार्य असावे असे सर्व जण एकत्र यावयाचे . पुढे त्यांची कुटुंबे पण वाढत गेलीत तरी सर्व नातवंडे ठरल्या प्रमाणे उत्साहाने एकमेकांना भेटणार या ओढीने, आठवणीने यावयाची .एकत्र जमायची, खेळायची . पुढे पुढे फिरती दिवाळी म्हणजे प्रत्येकाकडे जावयाचे अशी दिवाळी सुरु झाली .त्यामुळे प्रत्येकाकडे जाण्यात वेगळी मजा असायची .आठवते ना ? एकदा आपला पुतण्या पण सहकुटुब दिवाळीस आपल्या दिवाळीत सह भागी झाला होता.
दिवाळीत एक सून, मुलांना म्हणजे आपल्या नातवंडांना पकडून अंघोळी घालण्यात, तर एक स्वयंपाकात, तर एक सून फराळाचे पहाण्यात गर्क असावयाची आणि आठविते कां ते चित्र?
आपली ताई हॉलमध्ये एक पाय पसरून व तिच्या आजू बाजूला सर्वांनी आणलेले फराळाचे डबे ठेवून बसलेली आणि तोंडाने," अरे ,मुलांना काचेच्या डिश नको त्या कागदी डिश दे अथवा त्या मासिकाचे कागद फाड.अजित तू काढून ठेवली आहेत ना ?"असे म्हणत असायची.आणि त्यात मुलांचा गलका "ए मला रवा लाडू दे ,तर दुसरा ए, मला रवा लाडू नको, मला बेसन लाडू दे ,मला चकली नाही दिली, मला दोन चकल्या दे .आणि दाल मुठ पण हवीय मला ".असा गलका, गोंधळ चालू असायचा .हो!साधनाच्या दाल मुठ शिवाय दिवाळीला पूर्णता नाही . त्यात मधेच ताईचे सांगणे असावयाचे की अग साधना त्याबाजूला अर्धा अर्धा कप चहा टाक, तुमच्या गुजराथी पद्धतीचा दुध पाणी मिक्स . आणि मुलांनो, तुम्ही आधी खाऊन घ्या ,मग या बाजूला या मी पाणी देते "अशी तिची बडबड तोंडाने चालू असायची,त्यात कोणाचा तरी उठताना भरलेल्या पाण्याच्या ग्लासला पाय लागावयाचा की अरे फडके आणा तिथून असा गलका सुरु व्हायचा . घर कसे भरलेले असावयाचे.
पाडव्याला मुले आपापल्या बायकांना काही तरी गिफ्ट वस्तू ,दागिना आणावयाचे.मग कोणाचा पाडवा किती भारी यावर चर्चा चेष्टा,विनोद गप्पा व्हायचा .तुमच्या पासून ओवाळ्णीस सुरुवात व्हायची.तुम्ही नेहमी प्रमाणे हातातील अंगठी काढून ताम्हनात टाकावयाचे .आणि हो लक्ष्मी पूजनाला तुम्ही सांगावयाचे तितकी नीट पूजा कदाचित सांगत नसेल पण धवल मात्र पुस्तक (पोथी) घेऊन नेहमी पूजा सांगतो.सर्व जण पुर्वीवत आपापला दागिना पूजेत देतात . लक्ष्मी पूजनाला माझे अनारसे असतात .व थाटाने लक्ष्मी पूजन साजरे होते
भाऊबीज म्हटली की ताईची,' ए मी दोन बोटे तेल लावते म्हणत, पण तिच्या ऐवजी भाचे मंडळीकडून तेल लावून घेणे , तेल लावणे कसले? रगडून घेणे मामालोकांचे चालावयाचे .नातवंडे पण नातीनकडून म्हणजे सीमा, सोनाली, अमिता मुग्धा कडून भाऊबीज हवीय ना?मग आम्हाला तेल लावा बर का ! अशा गमती जमतीत भाऊबीज व्हायची .
दिवाळीत रात्री फटाके वाजविचा कार्यक्रम असायचा .हो ना.! अजून आरती साधना वाजवितात
का ग फटाके ? दोघी जणी धावून धावून फटाके फोडावयाच्या.व मनीषा मात्र वरूनच कानावर हात ठेवून घाबरत असायची .एका दिवाळीत श्रेयसची बोटे भाजली होती.तरी अनिल ,अजितचे अरे मुलांनो सुती कपडे घाला, .पायात प्रत्येकाने स्लीपर घातल्या आहेत ना? वगैरे आदेश अथवा सूचना चालूच असायच्या हो ना ! हो .हो अजूनही तसेच फटाके फोडणे चालू आहे .पण आता नातवंडा ऐवजी आपली पतवंडे ,पणतू मंडळीअसतात. नेहा नील ईशान रोहन आदित्य अनुष्का व कधी मधी सीमा अमिता परदेशातून आल्यातर सायली, ओजस ,सानिका यांची भर होते .पुढल्या वर्षी धवलचा निखील पण असेल. आपले जावई,,अरुणराव, अजून पण नेमाने पणतू मंडळींना घेऊन फटाके वाजवावयास जातात
.
दिवाळीत एक दिवस भजनाचा कार्यक्रम असतोच .पूर्वी प्रमाणेच धवल,केदारची तबल्याची साथ, सचिनची पेटीची ,श्रेयसची सिंथेसायजरची साथ व माझ्या हातात झांज असे साथ संगत करत भजन रंगते.आता मुलींबरोबर मुग्धा, अमिता सीमा सोनू म्हणजे या नातींच्या बरोबर कल्याणी ,अनुजा स्नेहा या नात सुना कडून पण भक्ती गीते सादर होतात .व या सर्व कार्यक्रमाचे चित्रण अनघा नीट करून दिवाळीच्या आठवणी ताज्या ठेवण्याचे काम करते .लगेच सोनू लगबगीने कॉमप्यूटर वर फोटो लोड करून प्रत्येकाच्या घरी झालेली दिवाळी फोटो व्दारे पोहचती करते
आता बदल म्हणजे एक दिवस दिवाळीत औटिंगला जातो. तुम्ही असतांना थोरल्याच्या प्लॉटवर बोपालला ,पुढे एकदा लोणावळा , तर एकदा भिडे वाडीला तर एकदा, दोन दिवसा साठी अलिबागला .तर गेल्या वर्षी कर्जतला फार्मवर गेलो होतो .त्या योगाने शशी चे फार्म हाउस पाहिले. असे नवीन बदलत्या काळा प्रमाणे औटिंग चे प्रोग्राम करून दिवाळीची रंगत वाढवीत दिवाळी साजरी होत आहे .
तेव्हा सांगावयाचे काय ? अजूनहि पूर्वी सारखीच दिवाळी साजरी होत आहे .मी खरोखरी सुखी आहे हो कारण तुम्ही घालून पायंडा प्रमाणे आज तोवर मुले एकत्र येऊन , दिवाळी मी त्यांच्या सोबत व मुले माझ्या सोबत दिवाळी साजरी करत आहोत .यंदा भले दिवाळी रोडावली असेल पुढच्या वर्षी पुन्हा दिवाळीस उधाण नक्कीच येईल .