चिमणीबाईची चिंता
चिमणीबाईची चिंता
चिऊताई आज जरा चिंतेमध्ये दिसत होती. त्याने विचारलं काय झालं? ती म्हणाली, अरे! मला आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य फार कठीण वाटते. पुढच्या काळामध्ये या पृथ्वीवर आपण राहू किंवा नाही हे समजत नाही. नाहीतर लहानपणी चिऊ-काऊच्या गोष्टी सांगत घास भरवणाऱ्या आईला चित्रातली चिमणी दाखवावी लागेल .
चिमणा म्हणाला एवढं काय झालं? एवढी का नाराज झालीस.
ती म्हणाली लोकांनी अफाट जंगलतोड केल्यामुळे आपल्याला झाडावर घरटे बांधता येत नाही. तिथे पण आपण ऍडजेस्टमेंट शिकलो. आपण घराच्या वळचणीला, मिळेल त्या जागेमध्ये, एवढेच काय लाईटचा बोर्ड लावतात ती जरी पोकळी मिळाले तरी आपण तिथे घरटे बांधत होतो. आपली पिल्ले कशी सुरक्षित राहतील हे बघत होतो. पण आता सगळीकडे सिमेंट काँक्रीटची जंगले झाल्यामुळे, आपलं घरटं बांधायला जागाच राहिली नाही .कुठे बीळ शिल्लक नाही .शिवाय मध्ये मध्ये तर आपण मोबाईलच्या टॉवरला पण घरटे बांधले, पण मग म्हणे ते व्हाट्सअप वरती असे येऊ लागलं की त्यातून रेडिएशन येतं .मग आपल्या पिल्लांना धोका नको ग बाई! आता करायचं तरी काय?
अगं चिमणे सगळंच चित्र काही निराशाजनक नाही. अजूनही आपल्याला काही लोक गच्चीवर दाणापाणी ठेवतात. काही लोक आपल्यासाठी कृत्रिम घरटी आपल्या दरवाजासमोर टांगतात. आपल्यासाठी "जागतिक चिमणी डे" कींवा स्पॅरो डे साजरा केला जातो. किमान वर्षातून एकदा तरी सर्वांना आपली आठवण येते ना! शिवाय जोपर्यंत पृथ्वीवर लहान मुल आहेत तोपर्यंत त्यांच्या या बोबड्या भाषेमध्ये ,एक घास चिऊचा एक घास काऊचा भरवणारच .आपली आठवण काढणारच! आणि मग ती त्यांची छोटी छोटी मुले मोठी झाली किती देखील आपल्या पिल्लांची काळजी घेतीलच ना? अगं माणसांच्या भाषेमध्ये एक म्हण आहे "जो चोच देतो तोच चारा देखील देतो"
तू आता तुझी चिंता सोड चल आपण कुठेतरी घरट्यासाठी जागा शोधूया. चिमणा- घरटे शोधण्यासाठी बाहेर उडाला.
जरा वेळाने चिमणा अगदी आनंदातच आला. अगं ऐकलस का! समोरच्या बिल्डींग मध्ये जोशी काकूंनी आपल्यासाठी दाणे पण ठेवलेत, पाणी पण ठेवलेय आणि पत्र्याचे एक कृत्रिम घरटे पण ठेवले. चल चल आपण तिकडे जाऊ या.
चिमणी म्हणाली एक मिनिट थांब.
काय झालं
अरे दाणा पाणी ठीक आहे. पण घरटे पण आयत घ्यायचं का? आपण काहीच कष्ट करायचे नाहीत? लोक नेहमी पक्षांच उदाहरण देतात. काडी काडी जमवून संसार केला म्हणतात. आणि आपण घरदेखील काडी काडी जमवून बांधायचं नाही.? कोणीतरी दिलेल्या आयत्या घरट्यात राहायचं ?लोकांच्या त्यावरून अनेक म्हणी आहेत. आयत्या बिळात नागोबा म्हणतात तसं ,आपल्याला आयत्या बिळात चिमणोबा म्हणतील, मला बाई हे आवडणार नाही. आपल्याला कोणी ऐतखाऊ ऐदी म्हटलेलं मला आवडणार नाही .आता यावेळी ठीक आहे ,माझे अंडी देण्याचे दिवस जवळ आलेले आहेत. माझे दिवस भरलेले आहेत. म्हणून मी त्या कृत्रिम घरट्यामध्ये अंडे देते. पण तिथे आपल्या पिल्लांना पत्रामुळे गरम होणार. आपण कशा गवताच्या मऊ मऊ काड्या घेतो, त्यावर ती कापूस पसरतो, आपल्या पिल्लांना मऊ गादी बनवतो. तसं पत्र्याच्या घरट्यामध्ये मिळणार नाही
बरं बरं ठीक आहे. पुढच्यावेळी अंडी देईपर्यंत चित्र बदललेलं असेल, आपल्याला कोठेतरी घरटे बनवायला जागा मिळेल. असे चिमणा म्हणाला आणि दोघेही भुरकन उडून जोशी काकूंच्या दरवाजावर गेले. तेव्हा चिमणा-चिमणी लाल गुलाबी रंगात न्हाऊन निघाले होते