चारचौघी
चारचौघी
सुजाता ची सकाळची गडबड चालू होती. तिला आवरून शाळेत निघायचे होते. तोच फोन खणाणला. स्मिता चा फोन होता. "सुजाता आपण उद्या संध्याकाळी हॉटेल वरूण मध्ये भेटतो आहे. सागरिका आली आहे युएस वरून. सुहास पण येते आहे. तुला माहिती आहेच ." जवळपास ती किंचाळत होती. सुजाता ने तिला शांत करत म्हंटले " मी कळवते तुला"
स्मिता लगेच म्हणाली "नाही ह! तुझं नेहमीचेच असते. .ये नक्की. आपण खूप दिवसांनी भेटतो आहे." सुजाताच्या उत्तराची वाट न बघता स्मिताने फोन ठेवला. सुजाता ने जाण्याचा निश्चय केला.
सुजाता, स्मिता, सागरिका व सुहास यांचा शाळेपासूनचा ग्रुप होता. दहावीपर्यंत चौघी एकत्र शिकत होत्या. नंतर शिक्षणाकरता वेगवेगळ्या झाल्या होत्या. पण मनाने मात्र एकच होत्या. चौघींच्या परिस्थितीत कमालीची तफावत होती. पण तरीही कुठल्यातरी एका धाग्याने जोडल्या गेल्या होत्या. चौघीही 25 ते 26 वर्ष वयोगटा मधल्या होत्या. लग्न झालेले नव्हते.
सुजाताची परिस्थिती बेताचीच होती. B.Sc. B.Ed. करून शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागली होती.नोकरी करणे तिला गरजेचे होते. सागरिका मात्र एका श्रीमंत घरातील मुलगी होती. ती M.S. करून अमेरिकेत नोकरी करत होती .श्रीमंत असून तिला अजिबात गर्व नव्हता. स्मिता ही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली होती. ती नदीसारखी अवखळ होती. खूप बोलकी होती.तिने सोशल वेल्फेअर मध्ये मास्टर्स डिग्री घेऊन एका NGO मध्ये नोकरी करत होती. व सगळ्यांना मदत करत होती. सुहासला लहानपणापासून आई वडील नव्हते. मामा मामी कडे राहायची. तिने M Com. केले व बँकेत नोकरीला लागली.
उद्या या चार टोकाच्या चार जणी भेटणार होत्या. स्मिताचा उत्साह तर ओसंडत होता . दहावीनंतर मधली वर्षे या एकमेकीं शी अधून मधून भेटायच्या व आपली गुपितं एकमेकींना सांगायच्या.
यावेळी काही न काही गुपित नक्कीच उलगडणार होते. व त्यातून मार्ग पण नक्कीच निघणार होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सुजाता, सागरिका व सुहास हॉटेल वरूण मध्ये भेटल्या. स्मिताचा पत्ताच नव्हता."ही स्मिता ना, स्वतः आयोजन करते पण वेळेवर गायब असते "सागरिका म्हणाली. "हो ना"इति सुहास. थोड्याच वेळात धापा टाकत स्मिता पोहोचली. तिने आल्याआल्याच "एका शाळेतील लहान मुलीला काऊन्सिलींगची व मदतीची गरज होती त्यामुळे मला उशीर झाला असे सांगून टाकले".
"तू सगळ्यांना खूप मदत करतेस स्मिता" सुहास म्हणाली. "नाही ग विशेष नाही. पण शाळेतील मुलींना मला मदत करावीशी वाटते."ती लहान असताना तिला एका नातेवाईकानी केलेला चुकीचा स्पर्श आठवला. त्याच वेळी तिने केलेल्या आरडाओरड्यामुळे ती बचावली.म्हणूनच तिने याच बाबतीत काम करण्याचा निश्चय केला होता.
चौघी जणी गप्पांमध्ये गर्क झाल्या.त्यात हळूच सागरिकाने सुजाताला विचारले "सुजाता तू काय निर्णय घेतलास?" सुजाताला तिच्या प्रश्नाचा रोख कळला.सागरिका च्या भावाला सुजाता खूप आवडायची.ती सुंदरच होती. पण त्यांच्या परिस्थितीत खूप तफावत होती. सुजाता म्हणाली" हो मी विचार करते". "सुजाता माझ्या घरी तुला काहीही त्रास होणार नाही" सागरिकाने तिला आश्वस्त केले. सुहास व स्मिताला हा एक धक्काच होता. मोठं गुपित उघडकीला आलेलं होतं .दोघींनीही सुजाताला आश्वस्त केले.
"तुमचं काय सुहास मॅडम ?"तिघींचा रोख सुहासकडे होता. तिने तिच्या बॅकेत असणाऱ्या सागरशी लग्न ठरवले होते. दोन्ही घरचे तयार होते. सागरच्या घरी सुहासची परिस्थिती माहिती होती. तरीही ते तयार होते .स्मिताने कधीही लग्न न करता समाज कार्य करण्याचे ठरवले होते. सागरिकाने तिला समजावले "स्मिता तू कौटुंबिक जबाबदारी घेऊन पण काम करू शकतेस". "नाही ,मग मी पूर्णपणे काम करू शकणार नाही" स्मिता म्हणाली. ती ठाम होती तिच्या निर्णयावर.
सागरिका च तसं काही ठरलं नव्हतं. पण ती करिअर व कुटुंब दोन्ही ला तयार होती. तिचे आई-वडील वर संशोधन करत होते.
अशा या वेगवेगळे विचार व वाटा असलेल्या जीवलग मैत्रिणी. वेगवेगळे विचार घेऊन एकत्र येऊन समजून घेणाऱ्या या चार चौघी. आपण कितीही आपल्या कामात गर्क असलो तरीही आहे गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला मित्र-मैत्रिणींची गरज नक्कीच असते.
भेट झाल्यावर चौघीजणी बाहेर आल्या व परत भेटण्याचा निश्चय करून चार दिशांना निघून गेल्या. त्यांना जोडणारा धागा मात्र अतूट राहिला.
