कर्तव्य
कर्तव्य
प्रणव हा नुकताच पोलीस सब इन्स्पेक्टर ची बढती घेऊन एका लहान गावांमध्ये रुजू झाला होता. त्याच्याबरोबर त्याचे कुटुंब होतं. आई वडील बायको आणि एक लहान मुलगी. तो अतिशय कर्तव्य कठोर माणूस होता. त्याला कोणीही कर्तव्यात कसूर केलेला चालायचा नाही.
पोलीस खात्यातल्या लोकांमध्ये नेहमीच कर्तव्य मोठे की भावना मोठी हा प्रश्न समोर येत असतो. पण त्यांनी आपल्या नोकरी करता घेतलेली शपथ त्यांना खरी करावी लागते. असे अनेक प्रसंग त्यांच्या समोर येत असतात पण बरेचदा भावनेवर ताबा मिळवून पोलीस आपले कर्तव्य पूर्ण करत असतात.
अशाच एका प्रसंगातून प्रणवला जावे लागले. ज्यावेळी भावना व कर्तव्य याची याच्या तराजूत तोलताना ,त्याने कर्तव्य दक्ष पोलीस म्हणून स्वतःचा नावलौकिक मिळवला.
तो राहत असलेल्या गाव साधारण मोठे होते. फार मोठे शहर नव्हते. पण अनेक जाती आणि धर्माचे लोक तिथे राहत होते. एकदा अशीच आपली ड्युटी संपवून तो घरी आला जेवण संपवून थोडासा आरामच करत होता की, त्याच्या वडिलांच्या छातीत दुखू लागले.सुरुवातीला त्यांना थोडी ऍसिडिटी असावी असे वाटले. गरम पाणी पिऊन छाती शेकून घरगुती उपाय करू लागले. पण त्यांना आराम वाटेना आता प्रणवला थोडी काळजी वाटू लागली होती व त्याने त्यांना दवाखान्यात नेण्याचा विचार सुरू केला.
एवढ्यात त्याला कंट्रोल रूम मधून मेसेज आला की गावामध्ये दोन जातीमध्ये तणाव वाढतो आहे व त्याला लवकरच ड्युटी जॉईन करावी लागेल व पोलीस चौकीत यावे लागेल. त्याला आता खूप चिंता वाटू लागली कारण ड्युटी जॉईन करणे तर गरजेचे होते व इकडे वडील सुद्धा आता दुःखाने कळवळू लागले होते. परत तेच भावना की कर्तव्य अशावेळी त्याने कुठलाही विचार न करता पोलीस चौकीत जाणे ठरवले. व स्वतःची ड्युटी पूर्ण करून समाज व देशात प्रति आपले कर्तव्य पूर्ण करायचे याला प्राथमिकता दिली. आता वडिलांचे काय हा प्रश्न त्याच्यापुढे होताच त्याची पत्नी अत्यंत सुस्वाभावी होती तिने प्रणवला आश्वासन दिले की मी हे बघते तुम्ही आपल्या ड्युटीला जा.
प्रणव पोलीस चौकीत आला. गावाच्या एका भागामध्ये दंगल सुरू झाली होती. प्रणव ताबडतोब आपली फौज फाटा घेऊन त्या ठिकाणी गेला व परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण परिस्थिती हाताबाहेर चालली होती. त्यामुळे त्याला गोळीबार करावा लागला.जमाव हिंसक झाला होता. तेवढ्यात एक हात बाॅम्ब प्रणव शेजारी येऊन पडला.त्यात तो भयंकर जखमी झाला.सुदैवानी वाचला.त्याला काही कळलेच नाही.
त्याने परिस्थिती उत्तम तऱ्हेने सांभाळली.इकडे वडील दवाखान्यातून बरे होऊन घरी आले.त्यांना प्रणवचा अभिमान वाटला.