आधार
आधार
"रेवती,रडू नकोस प्लीज अग यातून पण चांगलेच निष्पन्न होणार आहे.
"विक्रम,माझ्या शरीरातला एक अवयव मी कायमचा गमावणार आहे,"
हो रेवा पण तुला ब्रेस्ट कॅन्सर आहे,त्यामुळे पूर्ण शरीरात कॅन्सर पसरण्या आधी एक ब्रेस्ट काढून टाकणे हा चांगला पर्याय आहे.तू मला मुलांना हवी आहेस रेवा,मुल आता ऐन करियर च्या टप्प्यावर आहे,तुझी साथ हवी त्यांना ही.रेवा,अग एक ब्रेस्ट नसल्याने तुझ्या सौंदर्यात काहीच फरक पडणार नाही".
रेवती आणि विक्रम हे मध्यम वर्गीय जोडपे . त्यांचा संसार सुरळीतपणे चालू होता. त्यांना वयात आलेली दोन तरुण मुले होती.
आदित्य आणि अनिश. आदित्य डिग्रीच्या सेकंड इयरला होता. तर अनिश बारावीत होता. एक अतिशय सुखी परिवार होता. विक्रम एका खासगी कंपनीत सीनियर मॅनेजर होता. तर रेवा एका शाळेत शिक्षिका होती. छान चालू होते त्यांचे. दोघांचेही आई-वडील गावी राहत होते.
मागील काही दिवसापासून रेवाला थोडा ताप यायचा. पण तिने त्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केले. विक्रम तिला दोन-तीनदा म्हणाला" रेवा एकदा डॉक्टरला दाखवून ये". ती हो म्हणायची पण आपल्या कामातच व्यग्र असायची. शाळेच्या परीक्षाही सुरू होत्या. तिची गडबड सुरू होती. एक दिवस आंघोळ करताना तिच्या लक्षात आले की तिच्या एका ब्रेस्टमध्ये गाठ जाणवते आहे. ती मनातून खूप घाबरली आणि तिने ठरवले की आजच डॉक्टरांना भेटायचे. शाळेतून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन ती तिच्या स्त्रीरोगतज्ञां कडे तपासणीसाठी गेली.
डॉक्टरांनी तिला काही तपासण्या करण्याकरता सांगितल्या व दुसऱ्या दिवशीची वेळ दिली. घरी येऊन तिने विक्रमला सगळे सांगितले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विक्रमने दिला धीर दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही डॉक्टर कडे गेले. तपासण्या सुरू झाल्या. मनात खूप धाकधूक होतीच. दोघेही घरी आले. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होते.
आणि तो दुसरा दिवस उजाडला सकाळी दहा वाजता तिला डॉक्टरांकडून फोन आला. रेवा तू आणि विक्रम एकदा मला भेटायला या. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
दोघेही तयार होऊन डॉक्टरांकडे निघाले. डॉक्टरांनी रेवाला थोडा वेळ बाहेर बसायला सांगितले व विक्रमला बोलवून कल्पना दिली की रेवाला एका ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे. तेव्हा आपण आधी गोळ्या देऊन ट्रीटमेंट ला सुरुवात करायला हवी.
डॉक्टरांनी पुढची ट्रीटमेंट कशी असणार आहे ते विक्रमला समजावले व रेवाला आत बोलून याची कल्पना दिली तिला तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती खूप घाबरली व रडू लागली. डॉक्टरांनी तिला समजावले "हे बघ कॅन्सर मधून पूर्ण बाहेर येणारे रोगी सुद्धा आहेत. तेव्हा मानसिक दृष्ट्या तू खचून जाऊ नकोस. मोठमोठ्या नट्या सुद्धा आहेत की ज्यांनी या ब्रेस्ट कॅन्सरशी सामना केला आहे."
हळूहळू तिचे रडणे कमी झाले व तिने हे स्वीकार केले की मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. आणि मला यातून पूर्णपणे बाहेर यायचे आहे. आजकाल भरपूर मेडिकल ट्रीटमेंट आपल्याला मिळतात व आपण यातून पूर्ण बरे होऊ असा सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवण्याचे ठरवले.
विक्रम आणि रेवा यांच्यासमोर आता एक मोठे आव्हानच होते की या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ.
सुरुवातीला त्यांनी आपल्या आई-वडिलांना याची कल्पना दिली ते खूप घाबरले पण दोघांनीही परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत दाखवली.
रेवा चीट्रीटमेंट सुरू झाली. तिला रोज हॉस्पिटलला जावे लागायचे किमोथेरपी सुरू झाली.
घरी मुलं आणि विक्रम यांनी तिला खूप साथ दिली. ती सकारात्मक कशी राहील याचा प्रयत्न सुरू ठेवला.
तिला रोज सकाळी विक्रम सकारात्मक वाक्य किंवा भाषण ऐकवायचा की यातून कशी पूर्ण बरी होईल. रेवाचे आई वडील तिच्याबरोबर राहायला आले त्यांनी तिला उत्तम प्रकारे आहार मानसिक बळ देणे सुरू केले. त्यामुळे रेवा खूप प्रचंड ताकदीने तिच्या रोगाशी लढायला तयार झाली.
कॅन्सर तिच्या बेस्ट मध्ये पसरत होता तेव्हा डॉक्टरांनी विक्रमला विश्वासात घेऊन सांगितले की आपण जर तिचे एक ब्रेस्ट काढून टाकले तर तो शरीरात पसरणार नाही व आपल्याला रेवाला वाचवता येईल. व हीच गोष्ट विक्रम रेवाला समजावत होता. रेवाला त्यानी समजावून सांगितले की "संपूर्ण कुटुंबाला तिची कशी गरज आहे. संपूर्ण कुटुंबाचा ती एक आधार आहे व तिचं असणं सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तिचं एक ब्रेस्ट नसलं तर तिचे सौंदर्य कमी होणार नाही. शारीरिक सौंदर्य पेक्षा अंतरिक सौंदर्य जास्त महत्त्वाचा असतं. अँजेलिना जोली या नटीने तर आपले दोन्ही ब्रेस्ट काढून टाकले आहे तरीही ती उत्तम प्रकारे अभिनय करते आहे."
खरंय स्त्री हा कुटुंबाचा आधार असते. कुटुंबाची चेतना असते. तिचं असणं खूप गरजेचं असतं. स्त्री व पुरुष हे दोघेही कुटुंबाचा आधार असतात .त्यामुळे दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलं तर कुटुंब किती छान उदाहरण प्रस्थापित करू शकतात.
शेवटी रेवा ऑपरेशनला तयार झाली .ऑपरेशन उत्तम रित्या पार पडले.आणि ती या संपूर्ण प्रक्रियेतून अतिशय चांगल्या प्रकाराने बाहेर पडली. तिला आधार द्यायला तिचा खंबीर नवरा आणि मुले होती. त्याचप्रमाणे तिच्या इतर कुटुंबीयांनी सुद्धा तिला अतिशय चांगला आधार दिला. या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरता तिला बराच वेळ लागला पण सगळ्यांच्या साथीने आणि स्वतःच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे ती या कॅन्सर मधून बाहेर पडली. आता ती अतिशय चांगले जीवन जगते आहे. तिने इतर स्त्रियांकरता कौन्सिलिंग सेशन सुरू केलेले आहे. ती आता समाजामध्ये सगळ्यांचा आधार बनलेली आहे.