शरणागती
शरणागती
अर्पित खूप हुशार मुलगा होता. लहानपणापासूनच त्याची अभ्यासात प्रगती दिसायची. त्याच्या घरी खूप धार्मिक वातावरण होतं. त्याचे आई-वडील देवाला खूप मानायचे .त्यांच्या घरी व्यवस्थित पूजाअर्चा आणि सण साजरे व्हायचे. संपूर्ण कुटुंब एकत्र यायचे. फक्त श्रद्धाचं नाही तर, अत्यंत चांगुलपणा असलेले घरातील लोक होते आणि सामाजिक बांधिलकीला पण जागणारे होते.
खरंतर अत्यंत हळुवार आणि चांगल्या वातावरणात अर्पित मोठा झाला. पण का कोण जाणे त्याचा या सगळ्यावर फारसा विश्वास नव्हता. त्याची आई त्याला हळूच समजून सांगायची. "अरे कुठली तरी शक्ती या जगाला चालवते. त्या शक्तीनेच आपल्याला बळ मिळते. त्या शक्तीला पुर्ण शरण गेलो तर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणून आपल्याला जे काही मिळते त्यासाठी कष्ट करण्याची तर तयारी हवी. पण संपूर्ण शरणागती पत्करावी. हेच गीतेत सुद्धा सांगितले आहे."
पण अर्पित समजून पण न समजल्या सारखा करायचा. तो म्हणायचा की "आपणच कष्ट करून सगळं मिळवायचं असतं. त्याचा श्रेय मी कोणालाच देणार नाही."त्याला आपल्या कष्टाचा अहंकार वाटायचा.
अर्पित युपीएससी परीक्षेची तयारी करत होता. मेहनत तर भरपूर करत होता. पण तीन-चार वेळेला तो त्यात अनुत्तीर्ण झाला. त्याला खूप निराश वाटू लागले. त्याला मार्ग दिसेना. अशावेळी त्याला त्याच्या आईने सांगितलेले शब्द आठवले. मनातून खरोखरच त्याने त्या शक्तीची क्षमा मागितली व त्याला जाणीव झाली की खरोखरच यश मिळवायला कष्टा बरोबर कोणाच्यातरी आशीर्वादाची गरज नक्कीच असते.
तो जवळच असलेल्या गणपतीच्या देवळात गेला. त्याने मनापासून त्या अधिष्ठात्याची क्षमा मागितली. व त्या गणरायाकडे बघितले. हळूच त्याच्या डोक्यावरील जास्वंदीचे फूल खाली पडले. त्याला कुठेतरी जाणीव झाली की परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिला आहे. आता मी नक्कीच यूपीएससी मध्ये यश मिळविन. त्यानी मनाशी निश्चय केला व प्रचंड मेहनत करून त्या परीक्षेमध्ये यश मिळवले.
त्यानंतर त्याचा श्रद्धा ,भक्ती आणि कष्ट त्रयीवर विश्वास बसला. पुढील आयुष्यात त्यानी याच बळावर भरपूर यश संपादन केले. त्याच्या आईला मनातून खूप समाधान वाटले.
