खरी लक्ष्मी
खरी लक्ष्मी
आयुष्यभर अरुंधतीने खूप मोह माया जमवली. नात्यांपेक्षा तिला नेहमी पैसा महत्त्वाचा वाटला. त्याकरता तिने अनेक नाती सुद्धा तोडली. आणि खूप पैसा जमवला. कोणाला कधीही दिडकी सुद्धा दिली नाही. कुठल्याही प्रकारचं दान केले नाही. जमवलेला पैसा आणि लक्ष्मी पाहून ती खूप खुश होत असे. तिला वाटले म्हातारपणासाठी मी स्वतःसाठी भरपूर जमा करून ठेवलेले आहे. तिच्या मुलाचं लग्न झाल्यावर तिने सुनेशी सुद्धा तसाच व्यवहार केला. त्यामुळे नाराज होऊन आणि मुलगा सुद्धा दुसरीकडे राहायला निघून गेले .सुन तर तिच्याकडे यायला सुद्धा घाबरत असे.मला कोणाचीही गरज लागणार नाही, असे अरुंधतीला नेहमी वाटत असे. काम करणाऱ्या मावशींना कधी चहाचा कप सुद्धा दिला नाही.कधी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही.फक्त पैसा तिचे जीवन होते.जगण्याच्या तिच्या कल्पनाच वेगळ्या होत्या.
आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ती अतिशय दुःखाने आणि क्लेशाने त्या जमवलेल्या मायेकडे बघत होती. दागिन्यांकडे बघत होती. कारण तिला पॅरॅलिसीस चा अटॅक आला. त्यात तिची एक बाजू पूर्णपणे प्रभावित झाली आणि तिला हात पाय सुद्धा हलवता येत नव्हते. जेव्हा तिचे स्वतःचे पलंगावरून उठणे सुद्धा कठीण झाले होते, तर ती कुठून त्या दागिने आणि कपड्यांचा सोस पूर्ण करणार होती? आज तिला नात्यांची आणि माणसांची किंमत कळली होती. तिला कळून चुकले की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर अष्टलक्ष्मीची अनेक रूपे जी आहेत, जशी धनलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी संतानलक्ष्मी या सगळ्या लक्ष्मी आपल्याला आयुष्यभर पूजाव्या लागतात, तरच आपलं आयुष्य शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम होतं. जीवनामध्ये फक्त घेणंच नाही तर देणं सुद्धा असावं लागतं. दातृत्व असलं तर लक्ष्मी आपल्याकडे वास करते. स्वच्छता, नीटनेटकेपणा हे सुद्धा असलं तर लक्ष्मी घरात वास करते. प्रेमळ पणाने बोलणारे लोक लक्ष्मीला खूप आवडतात हे अरुंधतीला समजल. कारण ती कधीही कोणाशी प्रेमाने दोन शब्द बोलली नव्हती. शेवटी ती सगळ्यांची क्षमा मागायला पुढे आली. नात्यातले लोकं, सून ,मुलगा, काम करणाऱ्या मावशी सगळ्यांनी तिला क्षमा केली पण मनापासून नाही. कारण सगळ्यांना तिचा मूळ स्वभाव माहिती होता. आत्ता तिच्यावर अशी वेळ आली म्हणून काहीतरी जाणीव झाली म्हणून क्षमा मागत होती. शेवटी हेच खरे.