बदल
बदल
"अतुल, अरे आवर लवकर. आपल्याला वकीलकाकांकडे जायचंय." अस्मिता सुन्न मनाने अतुलला तयार करता करता म्हणाली.
"आई कोण गं वकीलकाका?" बालसुलभ औत्सुक्याने अतुल.
"ए, तुला काय करायचंय कोण वकील?" अभय खेकसला.
"अरे तो किती लहान आहे. किती ओरडतोस त्याच्या अंगावर!!"डोळ्यात पाणी येऊन अस्मिता म्हणाली.
खरंतर अभय अस्मिता आणि अतुल यांचे त्रिकोणी सुखी कुटुंब!! एकाच ऑफिसमधे काम करणारे दोघे. प्रेमविवाह केल्याने दोघेही खूष!! एक मुलगाही झाला. एकाच परीक्षेला दोघे बसले आणि अस्मिता पास झाली आणि अभय न झाल्याने तो मनात खट्टू झाला. आता अस्मिताला वरची पोस्ट मिळाल्याने कधी लवकर निघावे लागे तर कधी थांबावे लागे. साहजिकच अतुलला पाळणाघरात सोडणे, आणणे, तिला उशीर झाल्यास कुकर लावणे अशी कामे करावी लागत. त्यात अभयचा इगो दुखावला जाई. दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले आणि एका असहाय्य क्षणी दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले.
घोरपडे वकीलांकडे आल्यावर अभयनेच सर्व केस सांगितली. वकीलसाहेब हादरलेच. एक लहान मुलगा असताना दुसरे कोणतेही गंभीर कारण नसताना हे घटस्फोट कसे काय घ्यायला निघाले?
चर्चा सुरु असताना अतुल एकदा वकीलसाहेबांकडे, एकदा अभयकडे, एकदा अस्मिताकडे केविलवाण्यासारखा पाहायला लागला.
वकीलसाहेबांच्या चाणाक्ष नजरेने सर्व काही अचूक हेरले. दोघांशीही ते स्वतंत्रपणे बोलले.
नंतर मुलाला जवळ घेऊन म्हणाले, "मला तुमची सर्व केस समजली आहे. इगो प्राॅब्लेममुळे दोघे सैरभैर झाले आहात. पण वेळीच सावरा. तुम्ही दोघे पण थोडे ऍडजेस्ट केलेत तर, या बाळाचे जीवन किती सुखी होईल याचा प्लीज विचार करा. तुम्ही नुसते इथे आलायत तर अतुल बघा किती कावराबावरा झालाय!! पुढच्या गोष्टी खूप अवघड होतील. तुम्ही मी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर शांतपणे रात्री विचार करा आणि उद्या मला सांगायला या..."
वकीलसाहेबांनी चतुराईने त्यांना एक दिवस देऊन विचार करायला सांगितले. अतुलचा विचार मनात येताच दोघेही चरकले.
दुसऱ्या दिवशी तिघेही संध्याकाळी पेढे घेऊन आले. वकीलसाहेबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. दोघांनीही त्यांना नमस्कार केला. "सुखी रहा. आनंदात प्रपंच करा," असे म्हणून त्यांनी हसून हलकेच डोळे पुसले.