" 'वट'स्अप सावित्री "
" 'वट'स्अप सावित्री "
कशी आहेस?
परवा सत्यवान आला होता..
खूप चिडलेला होता..
वडाला फेऱ्या मारायच्या नाही
असं सांगणाऱ्या एका फेसबुक पोस्ट ला तू लाईक केलंस म्हणून.
मी म्हटलं त्याला
फार मनावर घेऊ नकोस
नंतर तिला होईल पश्चाताप वगैरे.
काही दिवसांपूर्वी तुलाही लाईक केलं होतं तिने...
आणि
वडापेक्षा मनाला सुतवून ठेवणं जास्त महत्वाचे रे.
ती नसेल गुंडाळणार तर तू मार फेरे.
तू बांधून ठेव तिच्या मनाला!
असो. आणखी कुरकुरत होता
तू खूप अॉनलाईन असतेस.
व्हाटसप फेसबुक ट्विटरवर म्हणून.
बोललो त्याच्याशी.
बघ ना सत्यवाना,
तिचं मन अॉनलाईन असतं.
अन् नेमका तू अॉफलाईन.
मग जो अॉनलाईन असेल त्याच्याशी कनेक्ट होणारच ना रे ती!
आणि सावित्री
सात जन्म वगैरे सगळं झूट असतं गं.
मला तू हवा आहेस इतकंच सांगण्याची ही परंपरा..
बघ आजवर तू दोरे बांधलेस वडाला..
अन् बांधून मात्र स्वतःलाच घेत राहिलीस!
आजकाल सगळेच दोरे कमकुवत झालेत.
ते गुंडाळले काय
नाही गुंडाळले काय.
वडाला फेरे मारले काय
नाही मारले काय.
त्याने फारसा फरक नाही पडत.
फक्त मनाचे मनाशी जोडलेले धागे तुटू देऊ नकोस.
आणखी एक सांगू..
फक्त नवऱ्याशीच नातं बांधून ठेवायचं असतं ना तर
अंगणातल्या कण्हेर जास्वंदी लाही दोरे बांधता आले असते.
तुला अवघं कुटूंब बांधून ठेवायचंय..
म्हणून वड.. आणि त्याचं विस्तीर्ण खोड!
बाकी तू सूज्ञच आहेस.
मी काही सांगीतलेच पाहिजे असेही नाही.
पण तू, तुझा सत्यवान आणि मी.
आपल्या तिघांचा हा सण.
आणि आपल्यातच संवाद नाही.
हे जरा खटकले, म्हणून बोललो.
बाकी क्षेम!
*तुझाच*
*वड...*
*ता क.*--
माझी संख्या खूप कमी होत चाललीय गं.
मनात सत्यवानासाठी
अन् अंगणात माझ्या साठी एक जागा राखून ठेव.
कारण उद्या तू असशील, तो असेल, दोरा असेल,दोरा असेल, फेरी मारण्याची इच्छाही असेल पण मीच नसेन
असं व्हायला नको. म्हणून एक झाड लाव आजच!