विरह भैरवी
विरह भैरवी
( परदेशी निघाला मुलगा
ज्योत मायेची काजळली
आई-बापाची विरह व्यथा
कागदावर मूक रडली)
डोळ्यातील पाणी मी
हलकेच परतवताना
कळ क्षीण हृदयी माझ्या
अच्छा तुला म्हणताना
म्हणावे वाटले थांब थोडा
पण अभिमान माझा पेटला
अंगणातील छोटा पक्षी
आज समुद्रापार झेपावला
((मुल परदेशी जाते आणि आई-वडिलांना विसरते. पण त्यांना मात्र मुलांशिवाय जगणे असह्य असते))
कर्तृत्वाचा आलेख तुझ्या
कसा उंच उंच गेला
आमच्या एकाकी जीवनाचा
अंधार दाट झाला
मन चिंब ओले माझे
अश्रू ओलांडीती माप
देहभर ही अगतिक थरथर
तव पाठीवर आशीर्वादाची थाप
परतुनी येतो म्हणता म्हणता
उशीर फार झाला
नको लावू वेळ आता
संध्या-समय आला
विरही हातात आमच्या
आता वाट पहाणे
कवटाळुनी हृदयी
जिवापाड जपलेले तुझे बाळलेणे
तुझे बाळलेणे.................