यमुनेच्या तीरी भाग - २
यमुनेच्या तीरी भाग - २
उन्हाळा आला की चाळीतल्या समद्या बायकांना पापड बनवण्याचे वेध लागायचे. "माझ्या रम्याला आन रोहिणीला पापड लय आवडतात" आसं दरवर्षी पापड घालताना यमुना आजी सांगायची. जेमतेम धा पापड घालून झाले व्हते तिचे, तेवड्यात चाळीतल्या दुसऱ्या मजल्यावरुन कोणीतरी खाली पाणी टाकलं, ते थेट तिच्या पापडावर पडलं. आता काय ज्यांनी कोणी पाणी टाकलं त्याचे वर गेलेले पितृ परत जमिनीवर नाय आले तर ती यमुना आजीचं नाय.
यमुना आजी - "कुणाचं मड उटलय रं..., डोळे फुटले का काय, ए कोनयरे तिकडं वर? ए मंगे, आगं, कुणी पानी ओतलं गं खाली? मंगे... ए मंगे.... . मंगला भाएर येऊन ईचारते "काय ग मावशे, काय झालं?" "आगं वरुन कुणी पानी टाकलं बग, समदे पापड भिजले ना माजे" यमुना आजी सांगू लागली.
मंगला - "नाय गं, माला नाय म्हाईत काय, मी तर आत व्हते कामात. आता आजी लईच खवळली.
यमुना आजी - कोन व्हता रं तो भा_ _ व, माला घावू दे, मेल्याच थोबाड फोडते बग".
मंगला - "अगं इथं कुणीच नाहीये मावशे, कुणीतरी मस्करी केली आसन बग".
आजी बडबड करत, शिव्या घालत परत पापड घालायला लागती. तेवढ्यात दुसऱ्या मजल्या वरचाच आप्पा (चंदू) येतो, आन आजीला सांगतो,
आप्पा - "आग आजी त्या रुप्यानं (रुपेश)ओतलं पानी वरुन आणि हासत पण होता.
यमुना आजी - माला वाटलंच व्हतं, ह्यो मेला जोपर्यंत माज्या शिव्या नाय खानार तोवर त्याला घास नाय जायचा. येउदे मेल्याला, आज चांगल पानी पाजते भा_खावाला". आस बोलत बोलत आजी पापड घालून संपवून टाकती.
तेवड्यात आरुणा (रुपेशची आई) येती. आरुणा म्हंजी चाळीतलं दुसरं जुनं झाड. पण या झाडाला चष्मा पण आहे बरं का. यमुना आजीच्या एकदम इरुद, म्हंजी यमुना आजी खाष्ट तर आरुणा लई शांत, यमुना आजी तिखट तर आरुणा आजी गोड.
यमुना आजी तिला बगून परत बोलायला लागती,
यमुना आजी - "काय गं ए आरुणा, तुज्या रुप्याला काय शिकवलस का नाय, हा, कुणाची मस्करी करायची, कुणाची नाय, ल्हान - मोठं काय बी समजत नाय तुझ्या पोराला? माज्या समद्या पापडावर पानी टाकलं ह्या मेल्यानी, क्येवडं नुकसान केलंय बग माज, हा, काय करु आता ह्याला, मी काय ह्याच्या वयाची हाय व्हय, माजी मस्करी करायला.
आरुणा आजी - "आग यमुने, जाऊदे माफ करुन टाक एक डाव त्याला, तुला म्हायते ना त्याचा तुज्यावर केवडा जीव हाय ते, तुज कसलं बी काम करतोय त्यो, तुला काय झालं की धावत येतो बगायला तुला.
यमुना आजी - "आसला कसला जीव हाय, मेला जवा बगाव तवा माज नुकसान करतू तुजा लेक. मी काय त्याची म्हेवनी बिवनी हाय व्हय, माजी मस्करी करायला?
आरुणा आजी - आग, मला बी लय कंटाळा आला बग ह्या पोराचा, काम धंदा सोडून लोकांच्या शिव्या खात फिरतोय मेला. मी सांगती त्याला त्यो नाय वाटेला जायचा तुज्या आता".
यमुना आजी - तू बोलतीस म्हणून आता सोडून देती बग".
आसं म्हणून आजी नेहमी सारखी बडबडत घरात जाते आन अरुणा पण तिथून निघून जाते.
पण जोपर्यंत सगळ्या चाळीला तिच्या पापडाच कौतुक कळत नाय तोवर यमुनाबाईंना काय चैन पडत नाय. लगीच सांच्याला अलकाकडं जाऊन तिला समदं रामायण सांगत बस्ती. आन बोलता बोलता जेवड्या बायका जमा होतात त्या समदयांना पण बारी बारी तेच सांगून मोकळी व्हती. आता तिला दिवसभरातलं समदं काम संपल्यासारखं वाटलं आसल आणि रात्रीच जेवण पण चांगलं जिरल.