साऱ्या विश्वाचे दैवत - आई
साऱ्या विश्वाचे दैवत - आई
मेरे तकदिर में एक भी गम ना होता
अगर तकदिर लिखने का हक मेरी माँ को होता।
खरचं आहे, आई ते दैवत आहे जे देवा पेक्षाही श्रेष्ठ आहे. जर नशीब लिहिण्याचा अधिकार प्रत्येक आईला असता तर सगळं जग सुखी आणि कष्टमुक्त झालं असतं. कारण आई आपल्या मुलांना कधीच दुःखात बघू शकत नाही.
मी 5 वर्षांची असतांना माझे वडील वारले. दोन मोठे भाऊ आणि मी असा तिघांचा भार माझ्या आईवर पडला. माझी आई पुण्याची त्यात शिक्षण कमी. शिकायची तिला भारी आवड पण वडील व सावत्र आई यांनी लहान वयातच, मुंबईच स्थळ आल्यामुळे तीच लग्न लावून दिल. 14 वर्षांत तिला काही कळत नव्हतं. लग्नानंतर अशी परिस्थिती येईल आणि इतके कष्ट करावे लागतील ह्याचा स्वप्नात पण विचार केला नव्हता. नोकरी नाही म्हणून ती बसून राहिली नाही.
मुलांचा सांभाळ कसा करायचा या विचाराने ती अस्वस्थ झाली पण हिम्मत न हारता सुरुवातीला एका जैन घरात जेवण बनवण्याचे काम करु लागली. नंतर आईला सरकारी कोट्यातून तात्पुरती माळी खात्यामध्ये कामाला ठेवण्यात आलं. घरात जेवण बनवून झालं की, माळी काम करायला जायची तिथून आल्यावर ती घर कामाला जायची. असं करत ती मुलांचा सांभाळ करु लागली. थोड्या दिवसांत तिला नवऱ्याची सरकारी नोकरी सुद्धा मिळाली जे त्याकाळी शक्य होत. आता आई थोडी निर्धास्त झाली. नोकरी जशी रुळावर आली तशी ती ऑफिस मधल्या लोकांसाठी बटाटेवडे, डाळ वडे, चपाती भाजी असे जमेल तसे पदार्थ करुन विकायची. कधी कधी बिर्याणीची पण ऑर्डर यायची मग ते ही बनवून द्यायची. अश्याप्रकारे आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.
मुलांचं शिक्षण, सणाला नवीन कपडे, अश्या अनेक प्रसंगांना तीने कधीच तिच्या मुलांना निराश केलं नाही, किंवा वडिलांची कमतरता भासू दिली नाही. अशीच असते आई, स्वतःला कितीही कष्ट आणि मेहनत करावी लागली तरी ती थकत नाही. आज ती 62 आहे पण आजही मुलांसाठी काही बनवायचं असलं तरी ती अगदी उत्साही असते. आज तिघही मुलं नोकरीत चांगल्या पदावर आहेत. जसं तिने मुलांना वाढवलं त्याच प्रमाणे तिची मुलंही तिला आदर, सन्मान तर देतातच पण फिरायला घेऊन जातात, 5 स्टार हॉटेल्स मध्ये घेऊन जातात. तिच्या दोन सुना आणि एक जावई पण तेवढाच आदर करतात. तिने जे कष्ट केले त्याचे चीज झाले कारण आज ती माऊली सुखी व समाधानी आहे.