आनंदाचा रंग
आनंदाचा रंग
डोळ्यात पाणी, हातात गजेंद्रचे पत्र वाचत पार्वती खिडकी जवळ बसली होती. पत्राचा मजकूर असा होता, " प्रिय पार्वती, तुझं पत्र मिळालं, तुमची खुशाली कळाली, बरं वाटलं. माझी सुट्टी मंजूर झाली होती आणि मी निघणार होतो पण आमच्या भागात पुन्हा आतंकवादी हल्ला झाला आणि मला आपल्या साथीदारांना सोडून निघणं बरोबर नाही वाटले म्हणून मी सुट्टी नाही घेतली. काळजी करु नकोस मी ठीक आहे. लवकरच सुट्टी घेऊन तुझ्या आणि आपल्या होणाऱ्या बाळाजवळ येईल, तोपर्यंत तुझी आणि आई बाबांची काळजी घे." पार्वतीच्या चेहऱ्यावर अभिमानही होता आणि डोळ्यात दुःख ही होते.
एक महिन्यानंतर, होळीच्या दिवशी पार्वती घरात पुरणपोळीचा स्वयंपाक करत असते. गजेंद्र पार्वतीला कोणतीही खबर न देता त्याच दिवशी घरी यायला निघतो. अचानक पार्वतीला पोटामध्ये कळा सुरु होतात. पुरण पोळीचा बेत तसाच राहून जातो. तिला गावातल्याच छोट्याशा इस्पितळात घेऊन जातात. पण रात्री पर्यंत पार्वती काही सुटत नाही. पहाटे पुन्हा पार्वतीला कळा येऊ लागतात. तिला डिलिव्हरीसाठी घेऊन जातात. गजेंद्र पहाटे गावात पोचतो. गावातली होळी संपण्याच्या वाटेवर थोडी थोडी जळत होती. गजेंद्र होळीला नमस्कार करतो आणि घरी जातो. घरात कुणीच नाही पाहून तो थोडा घाबरतो मग शेजारी चौकशी केल्यावर त्याला कळते की घरातले सगळे इस्पितळात आहेत. तो ही ताबडतोब तिथे पोचतो, आपल्या आईवडिलांना भेटतो. दोनच मिनिटांत सिस्टर बाळाला घेऊन बाहेर येते, गजेंद्र पुढे होऊन बाळाला हातात घेतो.
होळी नंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते, आणि रंगपंचमी चे सगळे रंग एकाच दिवशी ह्यांच्या आयुष्यात उधळले गेलयाचा आनंद गजेंद्र, पार्वती आणि त्याच्या आई वडिलांना होतो. सुनेला खायला बनवण्यासाठी गजेंद्रचे आई वडील घरी निघतात. गावात जे भेटतात त्यांना आनंदाची बातमी देत जातात. थोड्या वेळाने गजेंद्र पार्वतीसाठी जेवण घेऊन जायला घरी येतो. त्याचे सगळे मित्र त्याला पाहून खुश होतात, त्याला अभिनंदन करुन रंग लावतात. त्याच वेळी कोणाच्या तरी घरातून 'रंग बरसे' हे सर्वांच्या आवडीचं गाणं वाजत आणि गजेंद्रचे मित्र त्याला खांद्यावर घेऊन नाचू लागतात. तो पूर्ण दिवस गजेंद्रच्या मनात आनंदाच्या भरात
# "रंगबरसे" हेच गाणं चालत राहतं. सगळीकडे आनंदी आनंद होतो.