विध्वंस
विध्वंस


एकांकिका
(पात्र-विद्यार्थी, शिक्षक, कविता सुधाकर, सुप्रिया,प्रियंका)
दृष्य-सर्व मुले रांगेत बसतात. शिक्षक येतात.
शिक्षक : मुलांनो आज आपण नवीन पाठ शिकणार आहोत.
सर्व विद्यार्थी : कोणता सर?
शिक्षक : विध्वंस
सर्व विद्यार्थी : अरे बापरे, विध्वंस! म्हणजे सर्वनाश! पण आपल्या कोणत्याही विषयांच्या पुस्तकात हा पाठ आम्ही तरी वाचलेला नाही.
शिक्षक : मुलांनो हा पाठ जरी तुमच्या पाठ्यपुस्तकात नसला तरी हा पाठ समजून घेणे काळाची गरज आहे आणि तोच मी तुम्हाला शिकवणार आहे.
सुधाकर : विध्वंस म्हणजे काय?
शिक्षक : जगाचा सर्वनाश.
कविता : होय सर, आम्ही पण ऐकले आहे की पृथ्वीवर फार मोठी संकटे येणार आहेत.
शिक्षक : मुलांनो, जगाने तंत्रज्ञानात प्रगती केली. आज प्रत्येक देश नवनवीन शोध लावत आहेत. पृथ्वीतलावर जागा कमी पडेल म्हणून तो वेगवेगळ्या ग्रहावर अंतरीक्षात यान पाठवत आहेत. पाण्यासाठी वेगवेगळ्या मोहीमा हाती घेण्यात येत आहेत. पृथ्वीवर अनेक अणुस्फोट केले जात आहेत. त्यापासून फायदे आणि तोटे ही आहेत. अनेकजन आपले शक्ती प्रदर्शन घडविण्यासाठी अनेक देशात अणु चाचणी घेतली जाते. त्याचा परिणाम पृथ्वीतलावरच्या तापमानकक्षेत होत आहेत. जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे ऋतुवर परिणाम होत आहेत. अति दुष्काळ, अति महापुर ही बदलणाऱ्या हवामानाचा इशारा आहे.
सुप्रिया : सर, एकदा आपण एकत्र येऊन संशोधन केंद्रातून प्रत्यक्ष पृथ्वीच्या सर्वनाशाची माहिती निसर्गावर आधारित चित्रपटातून पाहू या.
(सर्व विद्यार्थी एका हॉलमध्ये एकत्र येतात.)
सर्व विद्यार्थी : बाप रे, सर ती डोंगरावरची आग कशाने लागली?
शिक्षक : मुलांनो स्वार्थी मानवाला राहण्यासाठी जागा कमी पडू लागली म्हणून जंगलाला आग लावली आणि देखावा काय तर आपोआप आग लागली. असे करून थोड्या हव्याशी माणसानी अनेक लोकांचे जीव धोक्यात घातले. आता त्या ठिकाणी थोड्या दिवसांनी मोठमोठे टॉवर दिसतील.
प्रियंका : मग त्यातील प्राण्यांचे काय?
शिक्षक : त्यातील प्राणी आगीचे शिकार झाले असणार. औषधी वनस्पती नष्ट झाल्या असणार. जे वाचले असतील ते क्रोधाने मानवावर हल्ला करणार.
सर्व विद्यार्थी : का सर?
शिक्षक : जर त्या मुक्या प्राण्यांनी तुमच्यावर हल्ला केला नाही तरी त्यांची आश्रयस्थाने मानवाने उजाड करुन टाकली.
सर्व विद्यार्थी : सर त्या शहरात पाणी कसले? ते वेगवेगळे प्राणी कोणते?
शिक्षक : मुलांनो समुद्रात मिळणाऱ्या खाड़यांचे रस्ते बंद झाले. छोट्या, छोट्या नद्यांचे अचानक अस्तित्व संपले. त्यामुळे त्या शहरात पूर आलाय. त्यात असलेले प्राणी म्हणजे पूरात जीवाच्या आकांताने मेलेली माणसे, जनावरे, सरपटणारे मेलेले प्राणी. हे सर्व आपण अनधिकृतरित्या केलेले आक्रमण.
सुधाकर : सर त्या रांगा कसल्या आहेत?
शिक्षक : मुलांनो आपल्या देशात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. स्वार्थी मानवाने म्हणजे आपल्या बांधवानी जंगले नष्ट केले. हवेचा समतोल बिघडला. ओझोनचा थर कमी होऊ लागला. हवा दूषित झाली. पाऊस गेला आणि दुष्काळ आला. निसर्गाचे चक्र हळूहळू बदलू लागले. पावसाचे प्रमाण कमी होवू लागले. अवेळी पाऊस पडत आहेत ऋतुचक्रावर परिणाम होत आहेत. त्यामुळे आपले गरीब बांधव पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
सर्व विद्यार्थी : बाप रे! म्हणजे पाण्यासाठी एवढा त्रास?
शिक्षक : होय मुलांनो, पाण्यासाठी माणसामाणसात हाणामारी होत आहेत. शेतीला पाणी नाही म्हणून पिके येत नाही. थोडी पीके येतात तर त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही. जगण्यापेक्षा मरण स्वस्त झाले!
कविता : सर, संपूर्ण पृथ्वीवर असेच असणार?
शिक्षक : होय, अशाचप्रकारे त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, पूर येत राहणार. निसर्ग इशारा करत राहणार. मानवाने अतिरेक केला की त्याचा सर्वनाश नक्कीच होणार! आता तरी निसर्गाचा ऱ्हास थांबवा आणि मानवाला प्राण्यांना, वनस्पतींना वाचवा.
सर्व विद्यार्थी : खरोखर आपण विध्वंस हा पाठ शिकलो.
शिक्षक : आता आपण पृथ्वीला वाचविण्याची शपथ घेऊया.
सुप्रिया : लोकसंख्यावाढ ही सर्वनाशाला कारणीभूत नाही का?
शिक्षक : होय अप्रत्यक्ष कारणीभूत आहे.
सुधाकर : ते कसे काय सर?
शिक्षक : आताच पाहा ना, अन्नासाठी लोक चोऱ्या, दरोडे टाकत आहेत. तरुण पिढी व्यसनाकडे झुकली आहेत. अंधश्रद्धा वाढत आहेत. हवा, पाणी प्रदूषित होत आहेत. लोकसंख्येमुळे लोकवस्ती वाढत आहेत. लोक किड्या, मुंग्यासारखे जीवन जगत आहेत. ही सर्व विध्वंसाची लक्षणे आहेत.