तुपासाठी उष्ट खाणे
तुपासाठी उष्ट खाणे


आज आपण एका मजेशीर म्हणीचा कसा उगम झाला ते पाहू या.
म्हणीचं नाव आहे "तुपासाठी उष्ट खाणे" किंवा तुपासाठी उष्ट खाल्लं.
एक जावई असतो त्याचं काहीतरी सासुरवाडीला काम निघतं .तो सासुरवाडी च्या गावाला जातो त्याचं जे काही सरकारी ऑफिसात काम असतं ते करतो, आणि येता येता सासरवाडी च्या घरामध्ये डोकावतो. आता गोष्ट अशी असते घरात एकट्या सासुबाई असतात. सासुबाई ची दोन्ही मुले, सुना शेतावरती गेल्या असतात.
आता जावई आला म्हटल्यावर, त्याला काहीतरी गोडधोड केलं पाहिजे त्यामुळे सासुबाई बोटव करायला घेतात. बोटव हा गावाकडील शब्द आहे. बोटव म्हणजे शेवया ज्या पाटीवर न करता हातावरती केलेल्या असतात.
सासुबाई बोटव शिजायला टाकते आणि त्यामध्ये तूप घालण्यासाठी तूपाच गाडग तुप पाघळण्यासाठी चुली वरती जी पाठीमागे रिकामी जागा असते तिथे होते ठेवते. हळूहळू कडेने तूप पातळ व्हायला सुरुवात होते. सासुबाई एका पितळी मध्ये (पितळी म्हणजे काठ असलेली गुजराती लोकांसारखी थाळी)
जावईबापूला बोटव वाढते आणि तूप एखाद्या वाटीत कींवा भांड्यात न काढता कडेच पाघळलेलं तूप वाढण्यासाठी तुपाचं अख्ख गाडगं हातात घेऊन कडेकडेच पाघळले तूप वाढायला जाते परंतु तुपाचा मोठाच्या मोठा गोळा त्या शेवया वरती पडतो. जवळ जवळ अर्धा गाडग तूप जावयाच्या ताटात पडतं.
आता एकटा जावई एवढ सगळ तूप खाणार म्हणून सासूचा जीव खालीवर व्हायला लागतो. मग ती विचारते जावईबापू राग मानू नका एक गोष्ट बोलू का?
जावई म्हणतो मामी बिंदास सांगा. त्यावर ती म्हणते जावयाच्या ताटात पाच घास जेवीन असा मी नवस केला होता. त्यावर जावई गालातल्या गालात हसतो, त्याला मामीची चाल कळते. तो म्हणतो त्यात काय विचारायचं मामी? बिंदास माझ्या ताटात जेवा. सासू ताटात जेवायला बसते खरी पण मनात आपण जावयाच्या ताटात जेवायला बसलो याची लाज पण वाटत होती.
जावई विचारतो दोन्ही मेव्हण्यांचे कसं चाललंय?
सासूला कारणच पाहिजे असतं, ती जेवणाच्या ताटातील शेवयांचे दोन भाग करते आणि सांगते काय सांगायचं जावईबापू! एकाचं तोंड इकडं, एकाचं तोंड तिकडं! असं म्हणून ती शेवयाचे दोन भाग करते. म्हणजे जावयाचं उष्ट खावं लागणार नाही परंतु जावईदेखील हुशार असतो.
ती त्याला विचारते तुमच्याकडे कसं काय चाललंय जावईबापू? तो म्हणतो काय सांगायचं मामी! आमच्याकडे सगळ्यांची नुसती च्यावच्याव, च्याव चाललीये. कुणाचा कुणाला मेळ नाही असे म्हणून तो सर्व शेवया पुन्हा एकत्र कालवतो. तरीपण सासूबाई त्याच्या ताटात जेवते...
असं म्हणतात की या किश्श्यावरून म्हण पडली तुपासाठी उष्ट खाल्ले.