सोशल मीडियावर चे पाहुणे
सोशल मीडियावर चे पाहुणे
सोशल मीडियावर चे पाहुणे
(रात्रीचा एक दीड वाजले ला हळूच चोरपावलाने ती उठली, तिने त्याला उठवले, त्यानंतर दोघांनी आपल्या मुलांना उठवले .दोघेपण हातामध्ये एक एक बॅग घेऊन चोरपावलाने आवाज न करता घराच्या बाहेर पडत होते. आता स्वतःच्या घरातून ते असे चोरपावलाने का बाहेर पडत होते? आणि स्वतःच्याच घरातून का पळून जात होते? असा प्रश्न पडला की नाही.तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे खालील कथेमध्ये)
कोणीतरी दरवाजा ठोठावत होतं. मी जाऊन दार उघडले तर दारात एक अनोळखी सरदार फॅमिली उभी.त्यातला एक चेहरा ओळखीचा वाटला.माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून तो म्हणाला अरे भूल गया क्या? मै तुम्हारा फेसबुक फ्रेंड हू/ रोज रोज फेस देखते हो फिर भी नही पहचाना? त्याबरोबर माझी ट्यूब पेटली अरे हा तर सुखविंदर सिंग, दिल्लीला राहतो.
आओ! आओ! सुखविंदर भाई , मी त्याला घरात घेतलं खरं, पण माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह कायम होतं.की हा असा अचानक माझ्या घरी कसा काय आला ? अरे ऐसा क्या देखते हो भाई, हम लोग तो रोज रोज मिलते है/ हमारे सुखदुःख एक साथ मे बाटते है/ तेरे घर मे कोई प्रोग्राम बना तो तूम फेसबूक डालते हो / हम उसको लाईक करते है/ कमेंट करते है/ तुम्हारे पिताजी गुजर गये तो हम सब ने उनके लिए आर आय पी लिखा था.उनके शांति के लिए भगवान से प्रार्थना की थी.तुम्हारे बर्थडे के दिन हमने तुम्हारे सेहत के लिए भगवान से प्रार्थना की, तुमको बडे बडे केक भेजे, फुल भेजे, वो भी फेसबुक पे पे, तो क्या हमारा इतना भी हक बनता नही? हम बंबई देखणे आये तो तुम्हारे घर में रहके बॉम्बे घुमे.अरे! माझी आई म्हणत होती मुंबई कैसे जाने का? मैने बोला, अरे अपने यार का घर है, मुंबई में चलो हम ले जायेंगे. हक से जायेंगे!
हा! हा !भाई क्यू नही? इसे अपना ही घर समजो. मी त्यांचे स्वागत केले पण मला ते भारी पडले. यानंतर त्या सरदारजी फॅमिलीने माझ्या घराचा कब्जा घेतला माझ्या घरात आपले बस्तान चांगलेच बसवले.त्यांच्या एकेक फर्माईशी पुऱ्या करता करता माझ्या नाकी नऊ आले.लच्छा पराठा, लस्सी, पंजाबी भाज्या असे सर्व करता करता माझे महिन्याचे बजेट कोलमडले.कामवाल्या मावशी काम सोडून निघून गेल्या.पत्नी माझ्याकडे जाता-येता डोळे वटारून बघू लागले.किचनमध्ये भांड्यांची आदळआपट होऊ लागली.गेले पंधरा दिवस आमची बेडरूम त्यांनी बळकावल्या मुळे मी हॉलमध्ये, तर बायको मुलांच्या खोलीत असे आम्ही झोपत होतो.अगदी एकमेकाला ओझरता स्पर्श देखील केला नव्हता.मुलांचे अभ्यास होत नव्हते घरात टीव्हीवर सगळे पंजाबी चॅनेल दिसत होते.बायकोची "माझ्या नवऱ्याची बायको" माझा होशील ना? अगं बाई सासूबाई ! इत्यादी डेलीसोप बुडत होत्या.मुलांना कार्टून किंवा डब्ल्यूडब्ल्यूएफ बघायला मिळत नव्हते.बायकोला पंजाबी डिशेश येत नाहीत म्हणून, मला दम आलू, छोले भटूरे इत्यादी गोष्टी बाहेरून मागवावे लागत होत्या.तशा तिला पंजाबी डिशेश करता येत होत्या, तिने हौसेने तीन दिवसाचा कोर्स देखील केला होता पण नोकरी सांभाळून रोज रोज असल्या" मान न मान, मै तेरा मेहमान" टाईप पाहुण्यांची सरबराई कोण करणार? हॉटेलचा खर्च वाचविण्यासाठी तिने कधीतरी घरात ट्राय करावा असे मी आडून आडून सुचविले.किमान तिच्या हातचे खाल्ल्यानंतर तरी पाहुणे पळतील असा माझा अंदाज होता. पण बायकोने वटारलेले डोळे आणि आपटलेले भांडी पाहून माझी काही पुन्हा तिला घरात काहीतरी कर म्हणण्याची हिम्मत झाली नाही.सुखविंदर च्या माॅजी ला मुंबईची हवा मानवत नाही ,म्हणून मला भाड्याची कार करून त्यांना मुंबई दर्शन करावे लागले.बायकोच्या मुलांच्या भीतीने मी जास्तीत जास्त घराच्या बाहेर राहू लागलो.सर्वांची एकमेकांवर चिडचिड होत होती.पण आपल्या "अतिथी देवो भव" या परंपरेनुसार आम्ही फक्त एकमेकांवरच राग काढत होतो, आणि पाहुण्यांच्या पुढे मात्र हसून साजरे करत होतो. एकंदरीत माझी सर्व प्रकारची पिळवणूक झाल्यानंतर एकदाचे पाहुण्यांनी जाण्यासाठी सूतोवाच केले.आमचा आनंद गगनात मावेना.मला तर त्या डान्सिंग अंकल सारखा नाचून नाचून आपला व्हिडिओ व्हायरल करावा असे वाटू लागले.सुखविंदर आणि फॅमिली आम्हाला दिल्लीला येण्याबाबत आग्रहाचे आमंत्रण देऊन एकदाची चालती झाली आणि मी या sssहु म्हणत घरात आनंदाने उडी मारली.आता बायको मुलांचा राग काढण्यासाठी त्यांना एका छानशा हॉटेलमध्ये पार्टी दिली.एक नवा मूवी अरेंज केला.सर्व जण दिवसभर मजा मजा करून घरी आलो.आता मस्त मूडमध्ये बेडरूमचा दरवाजा बंद करणार, तोच डोअरबेल वाजली.आता या वेळी कोण आले असेल? असा विचार करून दार उघडले तर दारामध्ये चेन्नईचा स्वामीनाथन" उभा, त्याच्या फॅमिली सहित. पुन्हा आपले तेच पालुपद
अय्यो! अय्यो! अन्ना पहचाना की नही. अरे एफबी पे इतना चॅट करते हो, सब फोटो डाल देते हो, तुम्हारी बेटी टेन्थ मे अच्छा मार्क लाई तो सबसे पहले मैंने उसका काँग्रॅट्स किया था, और तुम हमको पहचानते नही? हमने सोचा अपना फ्रेंड बॉम्बे मे रहता है तो दुनिया का "वंडर सिटी" देखेंगे वगैरे वगैरे आणि पुन्हा एकदा माझ्या "अतिथी देवो भव" या मराठी माणसाच्या स्वभावाला अनुसरून त्यांचे स्वागत केले. आमची बेडरूम त्यांना खाली करून दिली. परत एकदा पंधरा दिवस आमच्या घरात इडली, डोसा, अपम, सांबर इत्यादी पदार्थांचा सुगंध दरवळू लागला. आम्ही त्यांना कळावे म्हणून त्यांच्यासारखे हेल काढून हिंदीमध्ये बोलू लागलो. पुन्हा एकदा पंधरा दिवस मला रजा मारून घरात बसावे लागले .आणि त्यांची सरबराई करावी लागली. आम्हाला एकमेकापासून वेगळं व्हावं लागलं .त्यानंतर आमची डोअरबेल वाजत राहिली. कधी बंगाली, कधी आसामी, कधी बिहारी, असे या भारत देशात भरलेले नानाविध संस्कृतीचे, जाती-जमातीचे जे जे लोक माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर होते, त्यांनी सर्वांनी माझ्या घरी हजेरी लावली. जणूकाही ठरविल्याप्रमाणे एक गेला आणि एक येत राहीला माझ्या वरती सूड काढल्याप्रमाणे माझ्या घरी पंधरा पंधरा दिवस ठिय्या देऊन राहत होते. आणि मला लुटून जात होते. माझे घर म्हणजे" मेरा भारत महान" चे मिनी रूप झाले होते. हे कमी होते म्हणून की काय? आता परदेशातली मित्रमंडळी देखील माझ्याकडे हजेरी लावू लागली. ऑस्ट्रेलियातला मार्कोस, इंग्लंडमधली सुझान, अमेरिकेतली डॉली, लिंडा, जेम्स, अबुधाबी चा शेख, श्रीलंकेची भंडारनायके, चायना मधले चिनी सगळं जग माझ्याजवळ येऊ लागलं, आणि प्रत्येकाला एण्टरटेन करता करता मला वेड लागण्याची पाळी आली. आपल्या लोकांना तरी फक्त मुंबईच बघायची होती. परंतु या परदेशी लोकांना मात्र संपूर्ण भारत फिरायचा होता, भारतीय संस्कृती बघायची होती. सर्व काही बघायचे होते. माझे घर म्हणजे एक धर्मशाळा झाली होती. गेले सहा महिने मी कामावर गेलो नव्हतो, मला कामावरून का काढून टाकण्यात येऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस घरी येऊन पडली होती. शेवटी एका मध्यरात्री आम्ही आमचं घर सोडून पळून जायचा निर्णय घेतला. ठरलेल्या प्लॅनिंग नुसार आम्ही दोन दिवस आधी आमच्याच घरातील महत्त्वाचे सामान बॅगेत भरले. घरातील दागिने वगैरे बँकेत लॉकर मध्ये टाकले. आणि एका मध्यरात्री आम्ही आमच्या घरातून पळ काढला. मात्र मुंबईतच एका बर्यापैकी हॉटेलमध्ये राहू लागलो. बाहेर पडल्या पडल्या मी पहिले काय केले असेल तर सगळे एफबी वरचे फ्रेंड अनफ्रेंड केले. व्हाट्सअप वरचे ब्लॉक केले. तरीही धोका नको म्हणून माझा 35 हजाराचा मोबाईल महालक्ष्मीला समुद्रात फेकून दिला. ते पंधरा दिवस आम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जगलो. गेले पंधरा दिवस आम्हाला एकदम मोकळं मोकळं छान वाटत होतं. घरात एकत्र असलो तरी इतर वेळी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असायचा आणि जवळची नाती सोडून जो-तो वर्च्युअल दुनियेच्या मागे लागायचा, आणि आभासी जगातले नाती जोडू पाहायचा पण आता खूप दिवसांनंतर मुले आणि आम्ही दोघे एकत्र आलो होतो. बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. लग्नानंतर चे नवे नवे दिवस, मुले लहान असतानाचे दिवस, त्यांच्या खोड्या, त्यांचे आजारपण इत्यादी विषयांवरती मनसोक्त गप्पा मारल्या. आत्तापर्यंत पाहुण्यांना मुंबई दर्शन घडवले पण आता मात्र स्वतःसाठी फिरलो. आम्ही सर्व ग्रुप डिलीट केले व फक्त चौघांचा एक ग्रुप ठेवला जो वेळे काळेला उपयोगात येईल. आता आम्ही साधे मोबाईल वापरतो. बाहेर सिनेमा नाटकाला जाऊन एन्जॉय करतो. मुलांना लायब्ररीतून चांगली चांगली पुस्तके आणून देतो. आम्ही तर वाचतोच, पण मुलांना देखील त्याची गोडी लागली. आता आम्हीच बाहेर पडलो म्हणल्यानंतर घरातील पाहुणे देखील घर सोडून गेले हे काही वेगळे सांगायला नको! त्यातून एक धडा मात्र आम्ही शिकलो वर्च्युअल लाईफ पेक्षा वास्तवात जगा. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मोबाईलच्या वेडापायी ते तासन्तास वाया घालवू नका.
मंडळी हा झाला कल्पनाविलास, पण खरोखर तुमच्या वास्तव आयुष्यात असे घडले तर? काय होईल विचार करा! आता अशी वेळ आली आहे मनो विकार उपचार विभागात मोबाईल ॲडिक्शन चे सेल उघडायची वेळ आलेली आहे बेंगलोर येथील निम्हान्स या राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेमध्ये असा सेल उघडला गेला आहे. तेव्हा विचार करा बरं!