Nagesh S Shewalkar

Inspirational

5.0  

Nagesh S Shewalkar

Inspirational

** समूदादा **

** समूदादा **

5 mins
1.5K


              

  हरिनाम संकुलात आठ सदनिका होत्या. त्यापैकी सहा कुटुंबीय एका नंतर एक राहायला आले होते. त्यापैकी एक कुटुंब म्हणजे तांडेकाका आणि तांडेकाकू ! तांडेकाका प्राथमिक शिक्षक ते प्राध्यापक असा शैक्षणिक प्रवास करून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघांचीही लग्नं झाली होती. तांडे यांच्या समोरच्या सदनिकेत महेश तावडे यांचे कुटुंब राहात होते. दोघेही पती-पत्नी हसतमुख, मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना समीर नावाचा सुंदर, लाघवी,गुटगुटीत मुलगा होता. समीरच्या आईचे नाव मंगल होते. त्यांच्या शेजारी शेख या आडनावाचे कुटुंब राहात होते. त्यांना एक मुलगा होता. विशेष म्हणजे शेख यांनी आपल्या मुलाचे नाव राम ठेवले होते. त्यांच्या बाजूला सावळे आडनावाचे कुटुंब राहात होते. त्यांचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय होता. शेख आणि सावळे शाळेत असल्यापासूनचे मित्र! दोघांची ही लग्न झाली होती. हरिनाम संकुलात सदनिका घेण्यापूर्वी दोघेही त्याच शहरातील एका गल्लीत राहात होते. दोघांच्या ही घरी नवीन बाळ येण्याची चाहूल लागली. दोन्ही कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झाले. 
  त्यादिवशी रात्री जेवणे झाल्यानंतर शेख आणि सावळे शतपावली करण्यासाठी बाहेर पडले.बोलता बोलता शेखने विचारले,
" सावळ्या, तुला काय वाटते, आपल्याला काय होईल?"
" मुलगा होईल किंवा मुलगी होऊ देत, मी ठरवले आहे की, बारसे धुमधडाक्यात करायचे आहे."
"आपण असे करूया का, म्हणजे बघ हं...आपल्या दोघांच्या ही घरी छानशी, गोडुली बालके येणार आहेत. मला काय वाटते, आपण एकाच दिवशी दोघांचे ही बारसे केले तर?" शेखने विचारले.
"अरे वा ! छान कल्पना आहे की. मला सांग, तू बाळाचे नाव काय ठेवणार आहेस?" सावळेंनी विचारले.
"आमचा निर्धार पक्का, बाळाचे नाव...... राम!" शेख आत्मविश्वासाने म्हणाले.
"काsssय ? काय म्हणालास तू? राम ?" सावळेंनी आश्चर्याने विचारले.
"होय. नाव म्हणजे काय रे, एक ओळख. या पलीकडे काय असते?" 
" ते बरोबर आहे. पण समाजाचे काय? असा क्रांतिकारी निर्णय घेताना तू समाजाचे सोड, पण वहिनींंचा सल्ला घेतला का?"
" तुला सांगू का, मुलगा झाला तर राम आणि मुलगी झाली तर सीता अशी नावे ठेवायची इच्छा तुझ्या वहिनींंची आहे. मला सांग,तुम्ही काय विचार केला आहे?"
" नाही. अजून तरी काही ठरवले नाही. पण तुमच्यापासून प्रेरणा घेऊन मी आत्ताच बाळाचे नाव ठरवले आहे...."
" अरे, असा जोशमध्ये येऊन काहीही निर्णय घेऊ नकोस. वहिनीला सांग आधी आणि मग ठरव."
" मला खात्री आहे. तुझी वहिनी नाही म्हणणार नाही." सावळे ठामपणे म्हणाले.
   झालेही तसेच सावळेंचा विश्वास खरा ठरला. बाळाचे नाव 'रहिम' असे ठेवण्यासाठी सावळेंच्या पत्नीने आनंदाने संमती दिली. ती चर्चा सावळेंंच्या आईबाबांना समजली.बाबांनी लगेच सहर्ष होकार दिला. आई मात्र थोडी नाराज झाली. परंतु बाबांनी समजवताच तीही तयार झाली.
   योग्य वेळी शेख आणि सावळे यांच्या पत्नींना मुलगे झाले. दोन्ही मुले गुटगुटीत होती. दोन तीन दिवसांनंतरची गोष्ट. नेहमीप्रमाणे शेख आणि सावळे फिरायला बाहेर पडले असताना सावळेंनी विचारले, " काय मग शेखभाई मुलगा झाला. आता बारसे थाटामाटात करावे लागणार."
"अगदी बरोबर! सावळ्या आपण आपल्या मुलांचे बारसे एकत्रच केली तर ?" शेखने विचारले.
" माझ्याही मनात तोच विचार चालू होता. मला सांग बाळाचे नाव काय ठेवणार आहेस?"
"काय म्हणजे? ठरले ते ठरले त्यात बदल नाही. बाळाचे नाव....राम ! तुमचे काय ठरले?"
"आम्हीही ठाम....बाळाचे नाव रहिम... मला सांग, तू मागे म्हणालास त्याप्रमाणे बारसे एकत्रच करूया का ?" सावळेंनी विचारले.
" नक्कीच करूया. आणि हो, बारशाला की नाही आपण पुरणपोळी आणि शीरखुर्मा असा बेत केला तर ?" शेखने विचारले.
" लै भारी! ठरले तर मग. " सावळे म्हणाले आणि दोघे वेगळ्याच समाधानाने घरी परतले.
   ठरल्याप्रमाणे दोघांनीही एकाच दिवशी, एकत्रितपणे बारशाचा कार्यक्रम पार पाडला.सर्वांंना रुचेल, भावेल असे जेवण असल्यामुळे प्रत्येकाने समाधानाचा,त्रुप्तीचा ढेकर दिला. त्याचबरोबर त्या आगळावेगळ्या प्रयोगाचे मनापासून कौतुक केले. बारशाचा कार्यक्रम आनंदाने, समाधानाने, उत्साहाने पार पडल्यानंतर दोघांनीही स्वतःचे घर घेण्याचा निर्णय घेतला. शहरात शोध घेत असताना दोघांच्या ही कुटुंबाला हरिनाम संकुलातील समोरासमोर असलेल्या दोन सदनिका पसंत पडल्या......  
   हरिनाम संकुलातील दुसऱ्या मजल्यावर असलेले एक कुटुंब म्हणजे मालिनीचे.तिच्या वडिलांचे आडनाव तुमाने असे होते. ते एका कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या शेजारी जोशी आडनावाचे कुटुंब राहात होते. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. एकूण काय तर 'छोटे कुटुंब सुखी कुटुंब ' याप्रमाणे 'छोटे संकुल सुखी संकुल !' असे हरिनाम संकुलातील एकोप्याचे, सर्वधर्मसमभावाचे वातावरण होते. संकुलातील चार बालके हा त्या संकुलाचा आत्मा होता तर छोटा समीर हा सर्वांंचा जीव की प्राण होता. समूदादा, समू, सँम, सँमी, सुमो, सम्या, सर, मीर, समी इत्यादी अनेक नावांनी ओळखला जाणारा समीर अतिशय हुशार, चाणाक्ष, तीक्ष्ण बुद्धीचा, एकपाठी, चतुर, प्रेमळ, लावकी, लाघवी, रसाळ इत्यादी अनेक गुणांमुळे सर्वांंचा आवडता, लाडका होता.समीरच्या बाललीलांंनी सर्वांंना जणू वेड लावले होते. विशेषतः तांडेकाका-काकू यांना समीरचा विशेष लळा होता. समीर आणि काकाकाकूंमध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. काकाकाकूंची नातवंडं दूर राहात होती. सणासुदीला येत असली तरीही ते येणे कसे घाईगडबडीचे, धावपळीचे असे. दुसरीकडे समीरचेही तसेच होते, त्याचे दोन्ही आजोबा- आजी दूर गावी राहायचे. सणानिमित्त तावडे कुटुंबीय गावाकडे गेल्यानंतरच समूची आणि त्याच्या आजोबा-आजींची भेट होई. त्यामुळे तांडेकाका - काकू यांच्यामध्ये निर्माण झालेले नाते सर्वांंना आश्चर्यात टाकणारे असेच होते. काकाकाकू त्यांच्या मुलीकडे किंवा मुलाकडे काही दिवसांसाठी गेले की, समीर हिरमुसला होत असे. तो व्यवस्थित जेवायचा नाही की, बरोबर झोपायचा नाही. दिवसभर अधूनमधून काकांच्या दरवाजाकडे बघायचा. काकांच्या दाराजवळ जाऊन दार ठोठावताना कुलूप ओढून पाहायचा. एक दोन वेळा तर काकाकाकू गावाला जाताच समीर आजारी पडला. मधूनच आईचा भ्रमणध्वनी घेऊन त्यावर बोटाने टकटक करताना कानाला लावून...' काका... तांदेकाका.... काकू ' अशा हाका मारायचा.
    नातवंडांकडे गेलेल्या तांडेकाका-काकूंना त्यांची नातवंडं जवळ असूनही पदोपदी समीरची आठवण येत असे. .... ' समीर असा. समीर तसा. समीरने असे केले समीरने तसे केले..' अशा त्याच्या आठवणी काढत असत. तांडेकाका समीरची आठवण आली की लगेच त्याला फोन करून बोलत असायचे. त्यांची समीरबद्दलची काळजी, त्याचा लागलेला लळा पाहून इतर नातेवाईक आश्चर्य व्यक्त करत असत. त्यांची सून आणि मुलगी गमतीने म्हणायच्या,
" बाबा, तुमचा खरा नातू समीर! आमची मुलं म्हणजे तुमच्यासाठी जणू शेजाऱ्याची मुलं !सारखं आपले एकच... समू.. समूदादा आणि समीर ! "
" अग,खरेच ते पोर आहेच तसे लाघवी ! तुम्ही दोन - चार दिवस राहायला या मग बघा तुम्हालाही त्याचा लळा लागतो की नाही ते ?" तांडेकाकू हसतहसत सांगायच्या.
   समीर गावाला गेला की,काकाकाकूंना हरिनाम संकुलात करमायचे नाही. विशेषतः काका सारखी फोनवर त्याची चौकशी करून त्याच्याशी बोलायचे. घरी असताना समीर खेळण्याच्या नादात तास - दोन तास आला नाही की, तांडेकाकांंना करमायचे नाही. ते लगेच काकूंना म्हणायचे,
" अग, किती वेळ झाला समू आलाच नाही. काय करतोय? इतका वेळ आल्याशिवाय राहात नाही."
" अहो, आत्ताच तर येऊन गेला....."
"आत्ता ? अग, चांगले तीन तास झाले, त्या जाऊन..." असे म्हणत काका दारात जाऊन आवाज द्यायचे, " समू, ये समू, समीर...."
काकांचा आवाज ऐकून समीर जेवत असला तरी तसाच खरकट्या तोंडाने धावत यायचा आणि काकांच्या गळ्यात पडायचा. त्याचे जेवणाने माखलेले ओठ कधी काकांच्या गालावर तर कधी ओठांवर विसावयाचे पळंतच दोघांनीही त्याचे काही वाटत नसे. तांडेकाका- काकू जेवत असताना समीरही बहुतेक वेळा त्यांच्याकडेच असायचा. त्यावेळी त्या दोघांच्या तोंडातला घास समीर आनंदाने खात असे. समूला घास भरवून उरलेला घास खातांना काकाकाकूंनाही काही वाटत नसे आणि समीरच्या आईवडिलांनाही काहीही वाटायचे नाही.....
   

                  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational