Niranjan Niranjan

Horror Action Fantasy

3  

Niranjan Niranjan

Horror Action Fantasy

शापित कॅमेरा - भाग एक

शापित कॅमेरा - भाग एक

11 mins
739


'निखिल महाजन'. फोटोग्राफी विश्वातलं उभरते नाव. जर निखिलने त्याच्या आई - वडिलांचे ऐकले असते तर आज तो एखाद्या नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत असता. निखिल पहिल्या पासूनच हुशार होता. दहावी - बारावीला बोर्डात आला होता. बारावीनंतर त्याला पुण्याच्या COEP मध्ये computer engineering शाखेत ऍडमिशन मिळाली. फर्स्ट आणि सेकंड इयर ला तो टॉप पाच मुलांमध्ये होता. थर्ड इयर ला गेल्यावर त्याला फोटोग्राफी चा नाद लागला. निखिलने त्याच्याच वर्गातल्या काही मुलांबरोबर फोटोग्राफी ग्रुप बनवला. सुटीच्या दिवशी हि मुलं कॅमेरा घेऊन कधी पुणे शहरात तर कधी शहराबाहेर सिंहगड, खडकवासला ई. ठिकाणी फोटो काढत फिरू लागली. निखिल वर फोटोग्राफीचे भूत सवार झाल्यापासून त्याचं अभ्यासातलं लक्ष्य उडत चाललं होतं. आता कॉलेज बुडवून हि मुलं फोटॊ काढत फिरू लागली. निखिलच्या घरच्यांनाही लक्षात आलं कि तो आता पहिल्यासारखा अभ्यास करत नाही. निखिलच्या फोटोजना फेसबुक, इंस्टाग्राम वर लाईक्स, कंमेंट्स मिळत होते. जस जसं त्याच्या फोटोजचं कौतुक होत होतं तसा त्याचा उत्साह अजूनच वाढत होता. पहिली सेमिस्टर जवळ आली होती, पण निखिल फोटोग्राफीत एवढा गुंतला होता कि त्याला कशाचेच भान नव्हते. पूर्वी तासनतास खोलीत बसून अभ्यास करणारा हा मुलगा, तहान भूक विसरून आभ्यास करणारा निखिल आज आपण इंजिनीयरिंग चे विद्यार्थी आहोत हेच विसरून गेला होता. पहिली सेमिस्टर आठवड्यावर येऊन ठेपली होति. आता निखिल जागा झाला. त्याच्या लक्षांत आले कि फोटोग्राफीच्या नादात आपण काहीच अभ्यास केलेला नाही. आता निखिलला खरंच टेन्शन आलं होतं. परिक्षा संपेपर्यंत कॅमेऱ्याला हात लावायचा नाही असं निखीलने ठरवलं. पुढचा पूर्ण आठवडा त्याने अभ्यास केला, पण पूर्वीसारखं त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. परिक्षा संपली. निखिलने पेपर कसे बसे लिहिले होते. निकाल आला, निखिल चार विषयांत नापास झाला होता. त्याच्या आई - वडिलांसाठी हा फार मोठा धक्का होता. आज पहिल्यांदाच निखिलचे वडील त्याच्यावर ओरडले. कारण आत्तापर्यंत तशी वेळच निखिलने येऊ दिली नव्हती. इतका साधा सरळ मुलगा जो यापूर्वी कधीच नापास झाला नव्हता त्याची आज जी आवस्था झाली होती त्यामागचं कारण निखिलच्या वडिलांना माहित होतं. निखिलची फोटोग्राफी बंद होऊन तो परत अभ्यासाला लागण्यासाठी काय करता येईल याचा ते विचार करत होते. त्यांना निखिलचा कॅमेरा सहज काढून घेता आला आसता, पण तसे केल्यामुळे जे हावे आहे ते साध्य होण्याऐवजी त्याचा उलट परिणाम झाला असता. अशा आडमुठ्या वयातील मुलांबरोबर कसे वागायचे हे निखिलच्या वडिलांना चांगलं माहित होतं. त्यांनी निखिलला सांगितलं कि जर तू लास्ट सेमिस्टरला पहिल्या पाच मुलांमध्ये आलास तर मी तुला हवा तसा तुला हवा त्या किमतीचा कॅमेरा घेउन देईन. निखिलनेही वडिलांचा प्रस्ताव मान्य केला व वडिलांना परत टॉप फाईव्ह मध्ये येण्याचा प्रयत्न करिन असे आश्वासन दिले. 


     निखिल पुन्हा अभ्यासाला लागला. त्याने कॅमेरा कपाटात ठेवला व कपाटाच्या दाराला कुलूप लावले. जोपर्यंत परीक्षा संपत नाही तोपर्यंत कॅमेऱ्याला हात लावायचा नाही असं निखिलने ठरवलं. चार-पाच दिवस निखिलने खरंच चांगला अभ्यास केला. त्याच्या आई-वडिलांना निखीलला अभ्यास करताना पाहून बरं वाटलं. पूर्वीचा निखील परत आला असं त्यांना वाटलं. 


     पण निखिलचा उत्साह चारच दिवस टिकला. तो शरीराने जरी त्याच्या रूममध्ये असला तरी त्याचे मन कपाटात कैद केलेल्या कॅमेऱ्यात गुंतले होते. नापास होऊन आधीच त्याने आई-वडिलांना दुखावले होते आणि प्रणिताही त्याच्यावर नाराज होती. आधीच तिला निखिलच्या कॅमेऱ्याबद्दल राग होता, कारण निखिलच्या हातात कॅमेरा असला कि त्याला दुसरे  काहीच दिसत नसे.  


      त्याच्या एका मनाला हे सारं पटत होतं पण दुसरं मन कॅमेऱ्याकडे धाव घेत होतं. शेवटी त्याचा कॅमेराचा जिंकला. कॅमेऱ्याला हात न लावण्याचा निर्धार निखिल विसरला होता. परीक्षेला दोन महिने बाकी असताना परिक्षेला न बसण्याचा निर्णय निखीलने घेतला. तो इंजिनीरिंगला कायमची सोडचिठ्ठी देणार होता. 'फोटोग्राफी' जे त्याचं पॅशन होतं ते आता त्याच प्रोफेशन होणार होतं. पण आई-वडिलांना आणि प्रणिताला पटवणं अवघड होतं. उद्या सकाळीच तो वडिलांशी बोलणार होता.


      निखिलने त्याचा निर्णय वडिलांना सांगितला. ते कसे रिऍक्ट होतील याचा अंदाज निखिलला येत नव्हता. पण ते चिडणार एवढं मात्र नक्की. पण निखिलला जे वाटल होतं तसं काहीच झालं नाही. निखिलचे वडिल शांतपणे त्याला म्हणाले, "तुझ्या आयुष्याबद्दल निर्णय स्वतः घेण्याएवढा तू मोठा झाला आहेस असं जर तुला वाटत असेल तर तुझ्या मनाला जे पटतंय तेच तू कर. मी किंवा तुझी आई तुला अडवणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षांत ठेव, मी कांही आयुष्यभर तुला पुरणार नाही, कधीनाकधी तुला स्वतःच्या पायांवर उभे रहावेच लागेल. आयुष्यभर फोटोग्राफी करून तू तुझं पोट भरू शकशील का याचा एकदा विचार कर.”           निखिलच्या आईलाही त्याचा हा निर्णय पटला नव्हता. तिला निखिलची काळजी वाटत होती. तिने निखिलला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही आता आपला निर्णय बदलणार नाही हे तिला कळून चुकले. शेवटी ती आई होती आणि मुलाला आईपेक्षा जास्त कोण ओळखतं? प्रणितालापण त्याने इंजिनिअरिंग सोडून पूर्णवेळ फोटोग्राफी करणार असल्याचे सांगितले. तिने निखीलला समजावण्याच्या खुप प्रयत्न केला पण आता तो परत मागे वळणार नव्हता. आता त्याला त्याचे भविष्य, त्याची फोटोग्राफी दिसत होती. स्वतःच्या कलेवर त्याचा पुर्ण विश्वास होता.


      निखिल पुन्हा फोटोग्राफी करत गावोगावी फिरु लागला. कधी मित्रांना सोबत घेउन तर कधी एकटाच. काही वेळा एकटा असताना तो पुर्ण दिवस एकाच ठिकाणी घालवायचा. पुर्ण दिवस घालवून सुद्धा काही वेळा त्याला चांगले फोटॊ मिळायचे नाही तर कधी खुप चांगले फोटॊ मिळायचे. पण फोटोग्राफी तो खरच एन्जॉय करत होता. फोटोग्राफी साठी वडिलांकडे पैसे मागायचे नाहीत असे त्याने ठरवले होते. पण फोटोग्राफी हे काय पैस्याशिवाय होणारं काम नाही. निखिलला नवीन लेन्स घेण्यासाठी पैसे हवे होते. त्यामुळे त्याने प्री-वेडींग फोटोग्राफीचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला चालू केले. त्यात त्याला फारशी मजा येत नव्हती, पण आता त्याला पैशांची गरज होती. 


      मुळात निखिलला नेचर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ची जास्त आवड होती. नॅशनल जिओग्राफिक चॅनेल साठी काम करायचे निखिलचे स्वप्न होते. पण हे काम सोपे नाही हे निखीलला चांगलं माहित होतं. त्याने त्याचे बेस्ट फोटोज एका फोटोग्राफी कॉन्टेस्ट साठी पाठवले होते. देशभरातल्या फोटोग्राफर्सनी त्या कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता. पण निखिलचे फोटॊज खरच उत्तम होते. त्याचा एक फोटॊ टॉप थ्री फोटॊजमध्ये सिलेक्ट झाला होता. त्या फोटोत दोन पक्षी होते. एका पक्ष्याच्या चोचीतून मासा निसटला होता व दुसरा पक्षी तो मासा पकडण्याच्या तयारीत होता. त्या दोन पक्ष्यातील भांडण निखिलने खुप चांगलं टिपलं होतं. हा फोटॊ निखिलने कोल्हापूरच्या रंकाळा तलावात काढला होता. तब्बल दहा दिवस प्रयत्न केल्यावर त्याला हा परफेक्ट शॉट मिळाला होता. निखिल दहा दिवस कोल्हापूरला त्याच्या एका मित्राकडे राहिला होता. निखिलला निकॉन D750 हा DSLR कॅमेरा बक्षीस मिळाला. निखिलच्या कामगिरीमुळे त्याचे आई-वडिल, मित्र आणि प्रणिता खुप खुश होते.


      देशभरात बऱ्याच वर्तमानपत्रात निखिलचे नांव व त्याने काढलेला फोटॊ आला होता. एक उत्तम फोटोग्राफर अशी निखिलची ओळख देशभर झाली. पण निखिल एवढ्यावरच संतुष्ट नव्हता. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. एखाद्या दुर्गम भागात जाऊन जिथे अत्तापर्यंत कोणीच गेले नसेल अशा ठिकाणी जाउन त्याला त्या भागाचे आणि त्या भागातील रहिवाशांचे फोटॊ काढायचे होते. गूगल वर खुप सर्च केल्यावर त्याला हवे असलेले ठिकाण सापडले. 


       'मेणवली' गावाजवळचे जंगल त्याने निवडले होते. जंगलामध्ये अघोरी साधुंची वस्ती होती. त्या वस्तीत चार-पाच दिवस राहून त्या साधुंची जीवनशैली तो जाणून घेणार होता व त्यांचे फोटॊ काढुन त्या फोटोजद्वारे त्या साधूंचे जीवन त्याला सामान्य लोकांसमोर आणायचं होतं. 


       'मेणवली' गाव सातारा शहरापासून ३९ किमी अंतरावर आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे गांव तेथील शिवमंदिर व पोर्तुगीजांनी बनविलेल्या पंचधातूच्या प्रचंड आकाराच्या घंटेसाठी प्रसिद्ध आहे. तसेच 'मेणवली' नाना फडणवीसांचे गांव म्हणून सुद्धा प्रसिध्द आहे. नाना फडणवीस पेशवाईतील मराठा साम्राज्याचे मंत्री होते. मेणवली घाट नाना फडणवीसांनी बांधला होता. बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या घाटावर झाले आहे. तसेच मेणवलीतील फडणवीस वाडा सुद्धा खुप प्रसिद्ध आणि महत्वाची वास्तू आहे. 


       निखिल मेणवलीला पोहोचल्यावर तेथील सरपंचाच्या घरी थांबणार होता व सकाळी लवकर सरपंचांची बाईक घेउन जंगलात जाणार होता. दिवसभर अघोरी साधूंच्या वस्तीत घालवून रात्री झोपायला तो परत सरपंचांकडे येणार होता. 


       आता निखिलसाठी सर्वात अवघड काम होत आई-वडिलांना पटवणं. ते सहजासहजी त्याला जाउ देणार नव्हते. इतर कुठली जागा किंवा गांव असतं तर एकवेळ ठीक होतं. पण मेणवलीचं जंगल तिथे राहणाऱ्या अघोरी साधूंमुळे कुप्रसिद्ध होतं. आत्तापर्यंत बरेच लोक त्याभागात हरवले होते. एवढच नाही तर निखिलच्या खुप जवळची एक व्यक्ती देखील हरवली होती. त्यामुळे मेणवली गावातील लोकसुद्धा त्या जंगलांत कधी जात नसत आणि निखिल तर तिथे एकटा जाणार होता. त्याने काही मित्रांना विचारलं होतं, पण एकही मित्र बरोबर यायला तयार झाला नाही. तसही निखिल आई-वडिलांचं ऐकणार नव्हता. त्यांनी कितीही विरोध केला तरी तो जाणारच होता. मेणवलीचे सरपंच पाटील साहेब यांनाही त्याने खुप कष्टाने पटवलं होतं. 

             निखिलने त्याच्या वडिलांना सांगितलं, "बाबा मी उद्या सकाळी मेणवलीला जायला निघणार आहे. तिथं चार-पाच दिवस राहुन तिथल्या जंगलात राहणाऱ्या अघोरी साधूंचे फोटॊ काढणार आहे."  


        ते निखिलला म्हणाले, "तुझ्या आईची हरकत नसेल तर मी तुला अडवणार नाही."

        निखिलची आई त्याला जाऊ देणार नाही हे निखिलला आणि त्याच्या वडिलांना चांगलंच माहित होतं. तरीपण निखिलने आईला सांगितलं, "आई मी उद्या मेणवलीला चाललोय. तिथं कांही दिवस राहून परत येईन. मला माहित आहे कि तुला आणि बाबांना माझी काळजी वाटतीये. पण खरंच काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही. मला अडवू नकोस." आई निखिलला म्हणाली, "बाळा आम्ही आधिच तुझ्या दादाला गमावलं आहे. आता तूच आमच्यासाठी सर्वकाही आहेस. तुझ्या पाया पडते पण जाऊ नकोस." निखिलच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. निखिल न बोलताच निघून गेला. 

        सकाळी उठल्यावर निखिलचे वडिल निखिलला उठवायला त्याच्या खोलित गेले, पण निखिल तिथे नव्हता. रोज नऊ वाजता उठणारा मुलगा आज लवकर कसा उठला? हा प्रश्न त्यांना पडला. ते हॉल मध्ये आले. तिथे त्यांना TV च्या स्क्रीनवर एक चिट्ठी लावलेली दिसली.     

     

       त्यावर लिहिलं होतं - 


मी मेणवलीला जात आहे. खरंच माझी काळजी करु नका. हे प्रोजेक्ट माझ्यासाठी खुप महत्वाचं आहे. मी चार-पाच दिवसात परत येईन. कदाचित माझा फोनही लागणार नाही, मीच तुम्हाला फोन करत जाईन. 


                       तुमचा लाडका   

                         निखिल 


      निखिल साताऱ्याच्या एस. टी. स्टॅन्डवर पोहोचला. निखिलने प्रणिताला फोन लावला आणि त्याचा प्लॅन तिला सांगितला. प्रणितालाही काळजी वाटत होति. पण आपली काळजी व्यक्त करण्याशिवाय ती काहिच करू शकत नव्हती. रोज फोन करण्याचे आश्वासन देऊन निखिलने फोन ठेवला. 

      साताऱ्यात नाष्टा करुन निखिल मेणवलीच्या बसमध्ये चढला. मेणवलीच्या एस. टी. स्टॅण्डवर पाटील साहेब स्वतः निखिलची वाट पाहत उभे होते. गळ्यात हार घालून पाटलांनी निखिलचं स्वागत केलं. निखिलनेही नमस्कार करुन त्यांचं स्वागत स्वीकारलं.  

      दोन्ही बाजूनी पिळलेल्या भरगोस मिश्या, पांढऱ्या शुभ्र रंगाचा सदरा - पायजमा, तालमीत कमावलेलं बळकट शरीर, डाव्या हाताच्या बोटांवर चार सोन्याच्या आंगठ्या, मनगटावर चांदीचं जाड कड असं भारदस्त व्यक्तिमत्व पाटलांचं होतं. 


      पाटिल निखिलला म्हणाले, "आमच्या गावात तुमचं स्वागत हाय. प्रवासानं दमला असाल. आमच्या वाड्यावर पैलं इश्रांती घ्या. झ्याकपैकी जेवन करा. मग राम्या तुमास्नी घाटावर घेउन जाईल. माजं पोरगं बी लई दिसापास्न तुमची वाट बघतंय. त्यो कॅमेरावाला दादा कधी येणार आस रोज इचारतंय." 

           पाटील चांगलेच बोलके आणि दिलखुलास होते. पाटलांची जीप वाड्यापाशी आली. गाडीचा आवाज ऐकताच पाटलांचं पोरगं 'कॅमेरावाला दादा, कॅमेरावाला दादा' असं ओरडत बाहेर पळत आलं व निखिलकडे कॅमेरा बघायचाय म्हणुन हट्ट करायला लागलं. तसं ते पोरगं आगदी लहान नव्हतं पण चांगलच लाडावलेलं होतं. निखिलला त्याच्या कॅमेऱ्याला कोणी हात लावलेलं बिलकुल खपत नसे. पण "दादा आत्ता दमलाय, त्येला त्रास देऊ नगस" असं म्हणून पाटलांनी निखिलला धर्मसंकटातून वाचवलं. तरीपण ते पोरगं आपला हट्ट सोडेना. शेवटी राम्या त्या पोराला आत घेउन गेला.


      पाटलांनी निखिलला पुर्ण वाडा दाखवला व आपल्या घराण्याचा इतिहास सांगितला. एवढा मोठा वाडा निखिलने यापुर्वी कधिच पाहिला नव्हता. वाडा जुना असला तरी बांधकाम अजूनही मजबूत होतं आणि सगळ्या भिंती दगडी होत्या. वाडा फिरून होईपर्यंत स्वयंपाक तयार झाला होता. 

            कितीतरी दिवसांनी निखिल पुरणपोळी खात होता. जेवण झाल्यावर पान खाऊन निखिल झोपाळ्यावर बसला. वडिलांना काय वाटत असेल, आई काळजी करत असेल, आपण त्यांच्या मनाविरुद्ध इथे येऊन बरोबर केलाय का? हे विचार राहूनराहून त्याच्या मनात येत होते. पण आता त्याचं काम झाल्याशिवाय तो परत जाणार नव्हता. त्याने वडिलांना फोन लावण्यासाठी मोबाईल काढला, पण नेटवर्क प्रोब्लेममुळे त्याला फोन लावता आला नाही. थोड्याच वेळात निखिलला डुलकी लागली. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा राम्या चहाचा कप हातांत घेउन उभा होता. निखिल चहा पीपर्यंत राम्या तिथेच उभा होता. निखिलचा चहा पिऊन झाल्यावर राम्या निखिलला म्हणाला, "सायब नदीवर जौयाका? परंत अंधार पडल्यावर परत यायला लागल." "हो, मी कॅमेरा घेउन येतो मग आपण निघूया." निखिल म्हणाला.

            घाट पाटलांच्या वाड्यापासून फार लांब नव्हता. राम्या आणि निखिल चालत चालत मस्त गप्पा मारत घाटावर पोहोचले.  कृष्णा नदीचं पाणी स्वच्छ होतं. आज निखिलला नदी आणि गटार यातला फरक समजला, कारण पुणे शहरातून वाहणारी मुठा नदी पाहिल्यावर ही नदी आहे का गटार असा प्रश्ण निखिलला कायम पडत असे. मावळत्या सूर्याचे नदीच्या प्रवाहावर पडलेले प्रतिबिंब अतिशय सुंदर दिसत होतं. निखिलने काही फोटॊ काढले. थोडावेळ घाटावर बसून निखिल आणि राम्या वाड्यावर परतले. 

            रात्रि अंथरुणावर पडल्यावर निखिल उद्या काय काय करायचं याचा विचार करत होता. घाटावरून येताना राम्यानं निखिलला त्या साधूंबद्दल सांगितलं होतं की त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी आहेंत, कसे ते लोकांना संमोहित करतात, माणसाचं कच्च मांस खातात. पण या गोष्टींवर निखिलचा विश्वास नव्हता. तो असल्या अफवांना बधणार नव्हता. किमान यासर्व गोष्टी अफवा आहेत असं निखिलचं मत होतं.

           सकाळी लवकर उठून निखिल निघायची तयारी करत होता. आवरून झाल्यावर तो झोपाळ्यावर पाटलांची वाट पहात बसला. राम्या दुपारच्या जेवणाचा डबा घेउन आला व त्याच्या मागोमाग पाटिल पण आले. ते निखिलला म्हणाले,"तुमी जे करताय ते वाघाच्या तोंडात हात घालन्यासारखे आहे. परत येकदा इचार करुन बगा."

           निखिल म्हणाला, "पाटील साहेब आपल्या देशात लोक अफवांना लगेच भुलतात. चमत्कार, काळी जादू अशा खोट्या गोष्टिंवर लोकांचा लगेच विश्वास बसतो. माझ्यावर विश्वास ठेवा मला काहिही होणार नाही."

          राम्यान गाडीची चावी निखिलला दिली. जंगलाकडे जाण्याचा रस्ता राम्यान आधिच निखिलला सांगितला होता. निखिल जंगलाकडे जायला निघाला. जस जसं जंगल जवळ येत होतं तशी वस्ती कमी होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची झाडं होती. रस्ता कच्चा होता. 

            निखिल जंगलापर्यंत पोहोचला. तिथेच गाडी लावून, पायवाटेवरून निखिल पुढे जाऊ लागला. जंगलात इतक्या वेगवेगळया प्रकारची झाडं निखिल पहिल्यांदाच बघत होता. थोडे आंतर चालल्यावर निखिलला दोन पायवाटा लागल्या. डाव्याबाजूने जायचे का उजवीकडे वळायचे याचा निखिल विचार करत होता. निखिलने डाव्याबाजुने जाण्याचा निर्णय घेतला. 

            थोडं पुढे गेल्यावर निखिलला एका झाडाखाली एक साधू बसलेला दिसला. साधूचे डोळे उघडे होते, पण नजर कुठेतरी शून्यात पहात असल्यासारखी होती. नजर अतिशय भेदक होती. साधूचा चेहरा उग्र होता. साधूच्या डोक्यावरचे केस खुप लांब व करड्या रंगाचे होते. डोक्यावरचे आणि दाढीचे केंस अतिशय राठ होते. किती वर्ष या माणसाने आंघोळ केलेली नाही? असं निखिलला वाटलं. साधुच्या चेहऱ्यावर राख फसली होती व दोन भुवयांच्या मध्ये काळ्या रंगाचा नाम होता. गळयात वेगवेगळया आकाराच्या हाडांची माळ होती. साधूने कंबरेभोवती केवळ एक भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळले होते. बघून कोणालाही धडकी भरेल असे त्या साधुचे रूप होते. पण निखिल घाबरणाऱ्यातला नव्हता, त्याला फोटॊ काढण्यासाठी आयतीच संधी मिळाली होती.  


            निखिलने बॅगेतून कॅमेरा काढला. निखिल साधुपासून थोडा लांब उभा होता. प्रथम लांबूनच त्याने साधुचा फोटॊ काढला, पण साधु जागचा हलला नाही. साधु समाधी अवस्थेत होता. निखिलचं धाडस अजून वाढलं. निखिल पुढे गेला व त्याने अजून एक फोटॊ काढला. पण साधु जगाचा हलला नाही. त्याने काहिच प्रतिक्रिया दिली नाही. आता निखिलला साधुच्या भेदक डोळ्यांचा फोटो काढायचा होता. टेलीफोटो लेंन्स वापरून लांबूनही निखिलला साधूचा क्लोज अप फोटॊ काढता आला असता पण त्यांत तेवढी मजा नव्हती, त्याला 35MM चिच प्राईम लेंन्स वापरायची होती. निखिल साधुच्या जवळ गेला, इतका कि निखिलच्या कॅमेऱ्यात आणि साधूच्या डोळयात केवळ एक फुटांचेच अंतर होते. निखिलच्या ह्रिदयाची धडधड वाढली. निखिलने फोटॊ काढला व साधुचे डॊळे हलले. निखिल एकदम मागे सरकला. जंगलांत अंधार असल्यामुळे निखिलने फ्लॅश ऑन ठेवला होता. तो फ्लॅश साधुच्या डोळयात चमकल्यामुळे साधूची समाधी तुटली. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror