kishor zote

Inspirational

4.3  

kishor zote

Inspirational

राजर्षी शाहू महाराज नसते तर.

राजर्षी शाहू महाराज नसते तर.

4 mins
25K


 

   चौथे शाहू, अर्थात राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर राज्याचे इ.स.१८८४ ते इ.स. १९२२ छत्रपती होते. त्यांचा अधिकारआधकार काळ हा भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक स्वर्णिम कालखंड होय. जो या आधी व या नंतरही कोण्या राजाच्या नशिबी आला नाही. इतिहासाची जी स्वर्णिम पाने आपण म्हणू ती राजर्षी शाहू महाराज  यांच्या कारकिर्दीनेच पूर्ण होवू शकले. सामाजिक न्यायाचे पहाटेचे स्वप्न म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत.

     त्यांच्या बद्दल जे काही लिहावे ते थोडेच व वर्णावे तेवढेही कमीच होईल. तरी या निबंधातून माझ्या कुवती नुसार व मला भावलेल्या त्यांच्या जीवनचरित्रातील काही बाबींवरून ते जर नसते तर.... या बद्दल विचार मांडण्याचे अल्प असे प्रयत्न करत आहे.

   तर भारताचाच नव्हे तर या जगाचा इतिहासच पूर्णत्वास गेला नसता, हे मी प्रामाणिकपणे प्रथमतःच नमूद करू इच्छितो. त्यांच्या अधिकार काळातील २८ वर्ष म्हणजे २८ ऐतिहासीक कालखंडच होते असे म्हटले तरी वावगे ठरू नये. प्रत्येक निर्णय हा ऐतिहासिक असाच ठरलेला आहे. प्रत्येक घटना, कृती या इतिहासातील पहिल्या च घटना म्हणून पाहिल्या जातात.

पूर्वपिठीका -

     कोल्हापूर नगरीतील कागल येथील आप्पासाहेब घाटगे यांच्या घराण्यात २६ जून १८७४ ला या यशवंत रुपी अनमोल रत्नाचा जन्म आई राधाबाई यांच्या पोटी झाला. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांचे मृत्यू नंतर त्यांच्या पत्नि राजमाता आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ ला या यशवंतला दत्तक घेतले. त्यानंतर यशवंतचे नामकरण शाहू झाले आणि आपल्या २८ वर्षांच्या अलौकीक काराकिर्दीत जगभर डंका गाजवला. त्यांच्या या अद्वितिय कारकिर्दीचा गौरव म्हणून कानपूरच्या कुर्मी या क्षत्रीय समाजाने त्यांना राजर्षी ही लोकपदवी सन्मानाने दिली आणि यशवंत ते शाहू व शाहू ते राजर्षी शाहू असा त्यांचा प्रवास झाला. त्यांचा हा प्रवास "महाराजांचे महाराज" असा चढता होत गेला. असे एकही क्षेत्र नसेल ज्याचा विचार त्यांनी केला नसावा. ते जर नसते तरआज महाराजांचा महाराज आपणास दिसला नसता.

शैक्षणिक क्रांती घडली नसती -

      बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार २००९ अंमलबजावणी या देशात राबवणे सुरू झाले आहे. त्याला यश येत नाही तो कायदा राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम राबवला. स्त्री शिक्षणासाठी राजज्ञा काढणारा राजा तोच.

     १९१९ पासून अस्पृश्यता नष्ट साठी सवर्ण व अस्पृश्य यांच्या वेगवेगळ्या चालणाऱ्या शाळा बंद केल्या, सर्व समाजास एकत्र शिक्षण घेण्याची संधी या जातीय रचनेवर आधारीत समाजात प्रथमच उपलब्ध करुन दिली.

     ५०० ते १००० ची वस्ती असेल तेथे त्यांनी शाळा सुरु केली. तसेच वस्तीगृह संकल्पना रुजवली. शिक्षणासाठी ते एवढे जागरूक होते की जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना प्रतिमाह १ रु. दंड सुध्दा त्यांनी ठेवला. आतापर्यंत असा निर्णय घ्यायला कोणाचीच हिंमत झालेली नाही. स्वतःच्या मुलांना परदेशी शिकताना स्काउट - गाइड अभ्यासक्रम याचा त्यांनी स्वतः अभ्यास केला व ती चळवळ सर्व प्रथम भारतात आणली. आजही कोल्हापूर सोनतळी येथे भारत स्काउट आणि गाईड याचे कार्यालय कार्यरत आहे. ती त्यांच्या सैन्याची व घोडे बांधण्याची जागा होती. ती दान दिली. या चळवळीला भारतात आज जो प्रतिसाद मिळतो तो केवळ या द्रष्टया राजामुळेच.

     त्यांच्या या शैक्षणिक क्रांती मुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण परदेशात घेण्याची संधी उपलब्ध झाली. मूकनायक या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० ला सुरू केलेल्या वृत्तपत्राला नवसंजीवनी देण्याचे काम राजर्षी शाहू महाराज यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नुसती मदतच केली नाही तर खंबीर पाठीराखे देखील ते झाले आणि त्यामुळेच या देशाला जागतिक स्तरावरील नं. १ चे संविधान भारताला मिळाले. राजर्षी शाहू महाराज नसते तर, हे संविधान या देशाला मिळालेच नसते.

जातीयता मिटवण्यास पुढाकार -

    जातीभेद मिटवण्या साठी त्यांचे प्रयत्न सर्वश्रृत आहेतच. जातीभेद मिटवण्या साठी आंतरजातीय विवाह याला त्यांनी मान्यता दिली. तेवढयावरच थांबले नाही तर १९१७ ला विधवा विवाह यास कायदेशीर मान्यता देखील मिळवून दिली. १०० मराठा व धनगर विवाह त्यांच्या संस्थानात घडवून आणले.

     बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी १९१६ मधे निपाणी येथे "डेक्कन रयत असोशिएशन" ची संस्था स्थापली.

      चोर दरोडेखोर यांना शिक्षा न करता त्यांना पहारेदार, रखवलदार, रथ व गाडी यांचे सारथी अशा नोकऱ्या दिल्या. घरे बांधून दिली. दुर्लक्षित समाजावर संस्कार केले. दंड करण्यापेक्षा वर्तनबदल घडवून आणले. राजर्षी शाहू नसते तर, असा महान समाज शास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ समाजाला भेटला नसता.

आरक्षणाचे जन्मदाते -

  ६ जुलै १९०२ ला मागास जातीस ५० % आरक्षण लागू केले. हा ऐतिहासीक निर्णय घेताना अनेक समाज घटकांनी त्यांवर आरोप प्रत्यारोप केले, मात्र दूरगामी विचारी या राजाने अतिषय काटेकोर अंमलबजावणी तर केलीच परंतू सतत आढावा देखील घेतला. राजर्षी शाहू महाराज नसते तर हा आरक्षण मुद्दा रुजला नसता.

 

इतर बाबी -

   शिक्षण, शेती, उदयोग, कला, क्रिडा, आरोग्य सर्वच क्षेत्रात भरीव असे काम राजर्षी शाहू महाराज यांनी केले आहे.

      बेळगाव, कोल्हापूर येथील स्वातंत्र्यवीरांना आर्थीक मदत करताना तिजोरीवर पडणाऱ्या बोजाकडे कधीच लक्ष दिले नाही, राजा असूनही  स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ते होते.

      चित्रकार आबालाल रहिमान याला राजाश्रय दिला. प्रत्येक कला व क्रिडा प्रकार याला राजाश्रय दिला. देशाची या बाबतीत जी काही घोडदौड सुरू आहे, त्याची सर्व पाळमुळे ही कोल्हापूर नगरीत आहे.      

      राजश्री शाहू महाराज नसते तर यांच्या या कलात्मक दृष्टिला आपण मुकलो नसतो का?

समारोप -

      स्वातंत्र्यता पूर्वी कैक वर्ष अआधीच समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची संधी ही तत्वे राजर्षी शाहू महाराज यांनी करवीर संस्थानात अंमलात आणली.

  म्हणूनच २६ जून हा आज आपण "सामाजिक न्याय दिन" म्हणून पाळतो. अखेर असा हा लोक राजा राजर्षी शाहू महाराज नसता तर सामाजिक न्याय आपणास मिळाला नसता एवढेच सांगावेसे वाटते.

    अशा या महाराजांचे महाराज, लोकराजा,राजर्षी शाहू महाराज यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा.

 

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational