पैज आणि मानाचा फेटा
पैज आणि मानाचा फेटा
तुकाराम आणि रामभाऊ दोघेही खास मैतर ,दोघांच्या नावात देखील राम, अगदी शाळेपासून चे मित्र, यथावकाश दोघे मोठे झाले, लग्न झाले ,आपल्या शेती वाडीमध्ये कष्ट करू लागले. संसार सुरू झाला,
आता त्या तुकारामाला मुलगी झाली, तिचं नाव जानकी ठेवले.
रामभाऊ ला मुलगा झाला त्याचे नाव ठेवले राघव! आणि दोघांनी पण आणाभाका घेतल्या की जानकी राघवला द्यायची.
लहानपणी ठीक होतं ,पोर एकत्र खेळली, वाढली, पण मोठा झाल्यानंतर राघव शिकायला शहरांमध्ये गेला. जानकी मात्र गावातल्या गावात दहावी पर्यंत शिक्षण घेऊन, नंतर आईला घरकामात मदत करू लागली.
घरकाम ,शेती काम, त्या काळानुसार भरत काम, विणकाम, उत्तम स्वयंपाक, हे सारे तिला येत होते.
पण आता काही राघव तिच्याशी लग्न करणार नाही, तो शहरात गेला, शिकला, सवरला, तो शहरातली मुलगी करेल असेच जानकी च्या घरच्यांना वाटले. आणि त्यांनी राघवच्या वडिलांना न विचारता जानकी चे लग्न ठरवले.
रामभाऊला याचा फारच राग आला, आणि तुकारामा शी अबोला सुरू झाला.
अरे तुझी पोरगी माझ्या पोरीसारखी, मी म्हणतो
तू मला न विचारता तिचं लग्न कस काय ठरवलं?
अरे बाबा आम्हाला वाटलं तुझा पोरगा शिकला सवरला आहे, तो गावच्या पोरी शी काही लग्न करणार नाही. म्हणून आम्ही तिचं लग्न ठरवलं.
पण एक डाव विचारायचं तर होतं !
त्याने ताबडतोब आपल्या पोराला कार्ड धाडल ,आणि जानकीच लग्न ठरल्याचं कळवलं .
पोराने फोन करून बापाला सांगितल,
"बाबा झालं ते बरंच झालं" नाही तरी मी अजून शिक्षण घेतो आहे. मला एवढ्यात लग्न करायचे नाही. आणि केली तरी ,मी आता शहरातली शिकलेली मुलगी करणार आहे.
तुम्ही काही तिच्या लग्नात आडकाठी करू नका, माझ्या वतीने पाहिजे तर पैसे पाठवतो ,चांगला आहेर करा.
पोराचं हे उत्तर ऐकून बाप अचंबित झाला.
असं कसं होतं ?
शिकल्यावर माणसे एवढी बदलतात? नातेसंबंध विसरतात .त्या पोरीला मी लहानपणापासून सून म्हणून बघत आलो.
आणि "आता ती दुसऱ्या घरी जायची ",आता मला तुकारामाला तोंड दाखवण्याची देखील हिंमत नाही. माझ्या पोराने माझं नाक कापलं.
त्यानंतर काही दिवस गेले, जानकी च लग्न आता दोन महिन्यावर येऊन ठेपल.
तुकारामाने पण साऱ्या गावाला पत्रिका वाटल्या. पण रामभाऊ ला काही पत्रिका दिली नाही.
त्याला राग आला होता.
पोरीचं लग्न ठरवलं म्हणून? पण त्याच्या पोराने पण नाही म्हणून सांगितलं ना!
मग आला का मला सांगायला? माझ्याशी बोलायला,? झाल्या गोष्टीची माफी मागायला, तुकाराम आपल्या मनाशी बोलत होता .
त्याची अपेक्षा होती रामभाऊंनी एकदा येऊन खरं खरं सांगावं, माझा मुलगा नाही म्हणाला , चुकी झाली म्हणून माफी मागावी, मी त्याला मानाने लग्नाला बोलावेन.
असे तो लोकांमध्ये सांगू लागला.
तुकारामाची बायको दुर्गाबाई !तिला प्रश्न पडला कारण, तुकारामाची बायको दुर्गाबाई आणि रामभाऊ ची बायको शेवंताबाई चुलत चुलत बहिणी होत्या.
त्यांचं एकमेकींशी चांगलं होतं, पण आता नवरा नाही म्हणतो तर काय करणार?
अहो राम भाऊजींनी काय केलंय? त्यांचा मुलगा नाही म्हणाला आणि, आपण पण त्यांना विचारलं नव्हतं ना! "वाईट वाटल असेल त्यांना" लहानपणापासून ते आपल्या जानकीला सुनबाई म्हणत होते.
जाऊद्या ना!
त्यांना लग्नाला बोलवा ना!
हे बघ दुर्गे,
तू मला शहाणपणा शिकवू नकोस .एक तर त्याचा पोरगा नाही म्हणाला, आणि वरून ह्याचा तू रुबाब कोण ऐकून घेणार?
मी काय त्याला लग्नाला बोलवणार नाही.
तिकडे रामभाऊची बायको शेवंता पण आपल्या नवऱ्याला समजावीत होती.
अहो आपली चूक आहे!एक तर आपलाच पोरगा नाही म्हणाला, वरून तुम्ही त्याला चार माणसात वाटेल तसं बोललात,
आता जाऊ द्या ना!
सोडून द्या!
मोठ्या मनाने माफी मागा.
हे बघा कोणाच्या पण मरणाला आणि तोरणा ला कधी चुकवायचे नसते. आता आपली सुन नाही झाली ,तरी आपली मुलगी आहे ना?
मग आपण स्वतःहून तिच्या लग्नाला जाऊ या.
हे बघा तुम्ही बायका बायका काय वाटेल तो गोंधळ घाला, पण मी मात्र आमंत्रणा शिवाय लग्नाला येणार नाही.
रामभाऊ च ठाम मत होतं.
**********************
या एका कारणावरून दोन मित्रांमध्ये अबोला सुरू होता. तुकारामाने साऱ्या गावाला पत्रिका वाटल्या.
लेकीच्या लग्नाचं आमंत्रण साऱ्या गावाला दिलं.
पण मला मात्र बोलवलं नाही ..
ती माझ्या पोरीसारखी होती, मग रामभाऊ ने देखील गावाशी पैज लावली.
बघा याला आणि याच्या सगळ्या गोतावळ्याला नाक घासत माझ्या पायाशी यायला लावेल, आणि मला लग्नाच रीतसर निमंत्रण द्यायलाच लावेल. मानाचा फेटा त्याच्याकडून घेतल्याशिवाय मी सोडणार नाही.
बघू !बघू! मी नाही बोलावलं तर तो कुठून येईल? आणि मी कशाला नाक घासत जाऊ.
बघता बघता दरवाजा मध्ये मांडव उभा राहिला ,दुसऱ्या दिवशी लग्न.
स्पीकर वाजायला लागला, बँड बाजा वाजू लागला.
मैत्रिणींनो विसरू नका ग
या ग या तुम्ही या ग या
उद्या जाईन मी माझ्या गावा
माझ्या अंगाला हळद लावा
माझ्या लग्नाचा बँड बाजा वाजतो
अशी गाणी स्पीकर वर वाजू लागली.
सकाळी नवरी देवाला पाया पडून आणली.
मग हळदीचा कार्यक्रम झाला.
सकाळी मंडळींना लाडू चिवड्याचा नाश्ता मिळाला.
हळद झाल्यानंतर दुपारची पंगत पडली.
दुपारच्या जेवणामध्ये तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे गोड मीट्ट शिरा ,अर्धा कच्चा भात, आणि तिखट जाळ आमटी, शिवाय 1/1 बुंदीचा लाडू .
जेवण केले जेवून खाऊन नवरा श्री वंदनाला गेला.
गावाबाहेर मारुतीचे देऊळ होते.
चांगले प्रशस्त आवार ,आणि गावचा देव मारुती, असल्यामुळे त्याचे बरेच प्रस्थ होते.
असे प्रत्येक गावात एक मारुतीचे देऊळ असतेच, परंतु गावदेव वेगळा ,गाव देवी वेगळी, असंही असतं.
पण इथे मारुतीची उपासना होती.त्यामुळे त्या गावची अशी प्रथा होती, की तिथे एक दगडी गदा ठेवलेली आहे .ती गदा नवरदेवाने आपल्या खांद्यावर घेऊन, मंदिराला तीन प्रदक्षिणा मारायच्या.जर नवरदेव हडका कुडका पाप्याचे पितर असेल ,तर त्याच्याऐवजी त्यांच्या बाजूच्या कोणीही हि गदा खांद्यावर घेऊन प्रदक्षणा करायच्या ,किंवा नवरा फिरत असताना बाकीच्यांनी त्याला मदत करायची. त्याचे खांद्यावरची गदा पाठीमागे सावरून धरायची. असा रिवाज होता.
सगळ्यांनी मंदिराबाहेर आपल्या चप्पल काढल्या आणि आतील आवारात प्रवेश केला.
मारुतीला लग्नासाठी रितसर आमंत्रण केले. त्याच्यापुढे नारळ वाढवला, कापूर उदबत्त्या जाळल्या, तेल शेंदूर पुजाऱ्याच्या स्वाधीन केला.
तो नवर देवाच्या नावाने मूर्ती वरती चढवला. आणि आता मुख्य परीक्षेची वेळ, कदाचित त्या काळी यवनांचे राज्य होते.
त्यामुळे किमान 🐦पक्षी, आपल्या मुलीची सुरक्षा करणारा तरी मुलगा असावा.
या अपेक्षेनेच गदा उचलून मंदिराच्या तीन फेऱ्या मारण्याची पद्धत असेल.
आपण बघतो आपल्याकडे नवऱ्याच्या आणि नवरी च्या पाठीमागे मामा हातामध्ये कोयता किंवा तलवार घेऊन उभे राहतो .त्याच्या टोकाशी लिंबू लावलेले असते.
मला तरी त्याचा अर्थ असा वाटतो ,त्यावेळी एकतर नवरा-नवरी खूप लहान असायचे .आठ/ दहा वर्षाचे शिवाय आपल्या लग्नामध्ये मुसलमान लोक आक्रमण करायचे, नवरीला पळवून न्यायचे, नवऱ्याला मारून टाकायचे. अशा वेळी त्यांचे संरक्षण करण्यासाठी पाठीमागे मामा तलवार किंवा कोयता घेऊन उभा राहत असे, आणि त्याच्या टोकाशी लिंबू का? त्याचे कारण लिंबाने त्या हत्याराला उत्तम धार करता येते. त्यामुळे दोन मिनिटात ते खोचलेले लिंबू काढून त्या हत्याराला धार करता येत असे.
म्हणूनच ही पद्धत असावी.
तसेच ही गदा उचलून तीन फेऱ्या मारण्याची पद्धत, त्यानुसार नवरदेव ताकतीने बरा होता.
त्याने आपला जोर एकवटून ही गदा उचलली, आणि मग बाकीच्या मित्र आणि पाहुणे मंडळीनी ती खांद्यावर उचलून धरली ्.म्हणजे गदा जरी नवर्याच्या खांद्यावर असेल, त्याच्या खांद्यावर आधी एक टॉवेल टाकलेला असतो.
त्यामुळे ती खांद्याला रुतत नाही. आणि पाठीमागच्या बाजूने दोन-चार मंडळी तिला पेलून धरतात.
अशा हळूहळू तीन प्रदक्षिणा झाल्या. एका प्रदक्षिणेला दहा मिनिटे धरली, तरी तीस मिनिटे त्यातच गेली.
त्यानंतर ती गदा होती तशी हळुवार जाग्यावर ठेवली, नमस्कार केला, बजरंग बली ला साष्टांग नमस्कार केला.आणि नवरदेवा कडची आणि गावची सर्व पाहुणे मंडळी मंदिराच्या बाहेर आली.
बाहेर पाहतात तो त्यांची प्रत्येकाची उजव्या पायातली चप्पल गायब झाली होती .
प्रत्येकाची डावी चप्पल मंदिराबाहेर पडलेली होती.
सगळी वऱ्हाडी मंडळी अचंबित झाली. प्रत्येकाच्या तोंडातून आश्चर्य उदगार उद्गार बाहेर पडले.
आॅ चप्पल कुठे गेली?
कोणी चोरली?
चोरली तर जोडली एकाच पायाची कशी चोरली?आपल्याला पण त्याचा फायदा नाही,! त्याला पण त्याचा फायदा नाही! असा वेडा फकीर कोण असेल? असा वेडापीर कोण असेल?
सगळ्या वर्हाडी मंडळींमध्ये खळबळ माजली. आणि जो तो इकडेतिकडे आपली चप्पल शोधू लागला.
नवरदेवाच्या तर दोन्ही मोजड्या गायब होत्या. तेवढ्यात एक लहान मुलगा हातामध्ये चिठ्ठी घेऊन उभा होता.
तुमच्या सगळ्या वऱ्हाडी मंडळींच्या चपल्या मी चोरलेल्या आहेत .आणि जोपर्यंत मला मानाने लग्नाला बोलवून फेटा नेसवत नाही. तोपर्यंत त्या कुठे आहेत ते कळणार नाही.
आता मात्र तुकारामाच्या लक्षात घडलेला प्रकार आला . जर तुमच्या सगळ्यांच्या चप्पल पाहिजे असतील तर ,गावाच्या नदीकिनारी सर्वांनी आपापली एक चप्पल घेऊन येणे.
आता कोणाकडे काही पर्याय उरलेला नव्हता. त्यामुळे प्रत्येकाने आपली चप्पल हातात घेतली ,आणि नदीकाठचा रस्ता धरला.
हे दृश्य मोठे मजेशीर होते. नवरदेव घोड्यावर बसलेला असल्यामुळे त्याला काही अनवाणी चालायची पाळी आली नाही .आणि प्रत्येक जण आपल्या हातात एक चप्पल धरून नदीकाठी च्या रस्त्याला निघाला. प्रत्येक वऱ्हाड्याच्या हातात एक चप्पल बघून सगळे गावकरी हसत होते.
नदीच्या काठाला रामभाऊ एका झाडाखाली उभा होता. तुकाराम त्याला सामोरा गेला, आणि सगळे वऱ्हाडी त्याच्याभोवती जमा झाले.
काय रे रामभाऊ ?मैतर! मैतर! म्हणतोस आणि वराडी मंडळींसमोर माझी मान खाली घालायला लावतोस?
यात कसली मान खाली घालायची, जे काय केले ते मी केले .
"माझ्यामुळे सगळी वराडी मंडळी नदीकाठाला आली. आपल्या गावचा एवढा सुंदर निसर्गरम्य भाग माझ्यामुळे त्यांना बघायला मिळाला.
तू मला रितसर लग्नाचे आमंत्रण देऊन मानाचा फेटा नेसव"
नाही बोलावले तर काय करशील ?
तुमच्या चप्पल देणार नाही. मग तू आताच्या आता तालुक्याला जाऊन एवढ्या वऱ्हाडी मंडळींना नव्या चप्पल घेऊन दे.
मला काय करायचे!.,नको मला लग्नाला बोलावूस!
मंडळी त्या एवढ्याशा खेडेगावात एकही चपलांचे दुकान नव्हतं. आणि त्या काळात बहुतांश माणसे चामड्याच्या कमावलेल्या, नाल ठोकलेल्या, चप्पल वापरत असत. .त्या ऑर्डर दिल्यावर ती पंधरा-वीस दिवसांनी बनवून मिळत. लग्नघटिका जवळ आल्यानंतर, तालुक्याला टेम्पो पाठवून एवढ्या लोकांच्या मापाच्या चप्पल आणणे पण शक्य नव्हते. शेवटी तुकारामाला शरणागती पत्करावी लागली.
अरे बाबा तुला बोलावतो. पण तू चप्पल कुठे ठेवल्यात हे तरी सांग .आणि सगळी वऱ्हाडी मंडळी एका चप्पलने कशी चालणार?
नवरदेव मोजड्या न घालता लग्नाला कसा उभा राहणार?
आधी मला मानाचा फेटा नेसव, मग सांगतो चप्पल कुठे आहेत.
आधी मला सगळ्यांसमोर माफी मागून निमंत्रण दे! तरच तुझ्या चप्पल मिळतील.
अशी दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक चालू असताना, बाकीच्या मंडळीने काय झाले? काय झाले ?म्हणून विचारले.
तेव्हा त्यांना घडलेली गोष्ट सांगितली .
मग नवरदेवा कडची मंडळीदेखील तुकारामाला नावे ठेवू लागली.
अहो एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही लहानपणापासूनचे मैतर त्यांना कसं काय बोलावलं नाही?
आणि रामभाऊ पहिली चुकी तुमच्याकडून झाली होती, तुमचा मुलगा नाही म्हणाल्यावर तुम्ही जाऊन माफी मागायला पाहिजे होती .
आता झालं गेलं सोडून द्या! दोघेही मैतर गळाभेट घ्या! मग दोघांनी गळाभेट घेतली.
त्यानंतर तिथेच रामभाऊ ला पोरीचा चुलता म्हणून मानाचा फेटा नेसवला. सगळ्यांसमोर पत्रिका देऊन आमंत्रण दिले.
"बाबा रे! तुझ्या पोरीचं लग्न आहे "तू नाही आलास तर कसं होईल?
तू अवश्य लग्नाला ये!