न्याय अन्याय - अंतिम भाग
न्याय अन्याय - अंतिम भाग
ती आत येऊन शामली जवळ बसली. शामली शांत झोपली होती. एखादे लहान मुल झोपतांना जसे दिसते तशीच ती अगदी निरागस अबोध मुलं दिसत होती. रात्रीच्या शामली मधे आणि आत्ता च्या ह्या शामली मधे किती फ़रक दिसत होता हे सुमी निरखून बघत होती. रात्रीची शामली सुडाने पेटून उठलेली होती. तेव्हा त्या डोळ्यात एक आग दिसत होती. चेहरा लालबुंद दिसत होता. पण ती शांत झोपलेली शामली खूप निरागस वाटत होती. झोपेतही शामालीला जाणवले की कुणीतरी आपल्याकडे बघते आहे. आपले निरीक्षण करते आहे. स्त्रियांचा सिक्स्थ सेन्स झोपेतही जागा असतो त्याचेच हे उदाहारण होय. तिने डोळे उघडले, सुमीने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला. ती उठून बसली. सुमीने सांगितले
तू न्याय मिळवलास बेटा, तू जिंकलीस. त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा तू दिलीस त्यांना.
शामली डोळे फाडून सुमी कडे बघत होती.
शामली:- हे... हे... काय बोलते आहे तू काकू... कसली शिक्षा झाली त्यांना. मी... मी काही नाही केले काकू... मी... ते... काकांनी बनवून दिलेले विष... मी नाही दिले त्या मुलांना.
सुमी:- म्हणजे?.....
शामली:- सुमीच्या दंडांना घट्ट धरून तिला सांगते...
शामली:- काकू, मी ते विष घेऊन रागा रागात गेले... आणि खिडकीच्या खाली लपुन बसले. तेवढ्यात मला शिपाई काकांचा आवाज आला. ते आपली रात्रपाळी संपवून नुक्तेच घरी आले होते. ते त्यांच्या मुलाला सांगत होते, चांगला अभ्यास कर, हे तुझे शिक्षणाचे शेवटचे वर्ष आहे. चांगली नौकरी मिळव. खूप मोठा हो.
त्यांचा मुलगा म्हणाला हो बाबा मी चांगली नौकरी मिळवतो आणि मग मी तुम्हाला इथे अशी रात्रपाळी ची डयूटी नाही करू देणार. खूप कष्ट केले तुम्ही माझ्या साठी. आता या पुढे मी कमावणार आणि तुझी आरामात बसून खाणार. खूप सुख द्यायचे आहेत् बाबा तुम्हाला. शिपाई काका रडत होते. म्हणाले, हो रे माझ्या लेकरा... तू म्हणशील तसे करू...
त्यांचा रडवेला आवाज माझ्या कानी आला. त्यांचे बोलण ऐकून मला फार वाईट वाटले आणि मला वाटले आपण जे करतो आहोत ते चुकीचे आहे. त्या मुलांच्या गुन्ह्याची शिक्षा नकळतपणे आपण काकांना देत आहोत. मुलाने केलेल्या पापांची शिक्षा काकांना कशी देणार न. त्यांचा तो एकुलता एक मुलगा आहे. म्हणून मग मी ते विष तिथेच मातीत खड्डा करून ओतून टाकले आणि परत येऊन ती रिकामी बाटली काकांच्या हातात दिली. माझ्या स्वार्थापोटी मी नकळतपणे काकांनाही पापात सहभागी करुन घेणार होते. सुमीला हे सर्व ऐकून खूप बरे वाटले.
पुढे शामली म्हणाली, काकू मी तुझे ऐकायला पाहिजे होते. तू किती नाही नाही म्हणत होतीस.
तिला आश्चर्य वाटते, जर मी ते विष त्या मुलांना दिलेच नाही तर्...
त्या मुलाना काय झाले असेल्.? कुणी केली त्यांना शिक्षा?
नियतीने... असे म्हणत काका आत आले. हो नियतीने केली त्यांना शिक्षा बेटा...
ती मुलं सकाळी शहराकडे जायला निघाली होती. पण गाव सोडण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. त्यांची गाडी उतारावरून जात असतांना त्यांच्या गाडी वरचा ताबा सुटला आणि गाडी सरळ दरीत कोसळली. गोल गोल उलटी पलटी करत गाडी खूप खाली गेली आणि त्याचा मोठा विस्फ़ोट झाला. गावातील लोक म्हणत होती की कुणीही बचावले नाही त्यात पापाला शिक्षा असतेच बेटा!... ती आपण नसते ठरवायची ती नियती ठरवत असते. इथल्या कर्मा ची फळे इथेच भोगावी लागतात बेटा... तुम्ही आम्ही ठरवणारे कुणीच नसतो... असे म्हणत त्यांनी शामलीच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा तिघांचे ही डोळे पाणावले होते.