न्याय अन्याय - भाग 3
न्याय अन्याय - भाग 3
शामलीला असे घाबरलेल्या अवस्थेत बघून ती पटकन तिच्या जवळ गेली. शामलीला जवळ घेत तिला शांत केले. शामली रडत होती, तिने सुमीला प्रश्न केला,
शामली:-काकू माझ्या जागेवर तुझी लेक असती तरी तु हेच म्हंटले असते का ग, की विसरून जा सर्व म्हणून.... लालबूंद डोळ्यांनी सुमीला बघत शामलीने विचारले.
सुमीने तिचे अश्रु पुसले. आणि म्हणाली
सुमी:-हो! मी तिला ही हेच सांगितले असते. आणि कोण म्हणत की तु माझी लेक नाही म्हणून,तुला जन्म नाही दिला मी पण तु माझ्या काळजाचा तुकडा आहेस ग! तुझ्या मनात का असा विचार आला. हे खेडे गाव आहे, इथे चुक कुणाची ही असली तरी दोष मुलींवर, स्त्रीयांवर देण्याची जणु रितच आहे. तुझ्या काळजी पोटीच बोलते पोरी.
शामली:-मग माझ्यावर जो अन्याय झाला त्याचे काय? त्यांना असेच सोडायचे का"?
शामली चिडुनच म्हणाली, ते काही नाही काकु, मी त्यांना असे नाही सोडणार. गुन्हा सहन करने हा देखील गुन्हाच आहे हे तुच मला शिकवले ना. शाळेत न जाता ही तू मला लिहायला,वाचायला शिकवले , चांगले काय अन वाईट काय हे तुच समजून सांगितले. उठणे, बसणे, खाणे, पिणे, चांगले शुद्ध बोलणे तूच शिकवलेस ना मला ......आणि आता....... म्हणजे तू जे शिकवले होते ते केवळ बोलण्यापुरते होते का?
सुमी:- नाही ग पोरी तसे नाही,
शामली:- मग कसे आहे तुच सांग ना, पण तू काहीही म्हंटले ना का काकू तरी मी आता ऐकणार नाही आहे, मी त्या नराधमांना नाही सोडणार, त्यांच्या कुकर्माची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. शामली चे बोलणे ऐकून सुमी घाबरली,,,,
सुमी:- तुला पोलिस स्टेशन ला जायचे आहे का? त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवायची आहे का तुला?
पोलिसांचे नाव ऐकून ती चिडली
शामली:- नाही काकू .......
आपण पोलिसात नाही जाऊ शकत कारण ........ज्या मुलांनी हे कुकर्म केले त्यात त्या जंगल शिपायाचा मुलगा पण आहे. जो शहरात शिकायला असतो. त्याच्याच शहरातल्या काही मित्रांनी मिळून..... ती दात ओठ खात होती.तिच्या डोळ्यात सुडाची भावना स्पष्ट दिसत होती. पोलिसात आपल्याला जाता येणार नाही आणि गावाच्या पंचायतीत पण जाता येणार नाही...... लोक मलाच नावे ठेवतील. मला खराब समजतील मी काय करू काकू आता सांग ना......
ती सुमीला पकडून रडायला लागली. काका शामलीकडे निरोप देऊन आले. ते घरात येणार तेवढ्यात सुमीने त्यांना हाताच्या इशाऱ्याने बाहेरच थांबायला सांगितले. तिला वाटले काकांसमोरे कदाचित शामली मन मोकळे बोलू शकणार नाही. तिच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेणे गरजेचे होते. म्हणून त्यांना बाहेरच थांबवले. सुमीला वाटत होते जे झाले ते विसरण्यातच शहाणपणा आहे. म्हणून ती शामलीला परत परत समजून सांगत होती, पण शामली मात्र सूडाच्या भावनेने जणू पेटून उठली होती. ती सुमीला म्हणाली की, त्या नराधमांना असेच कसे सोडायचे, आज हा प्रसंग माझ्यावर ओढवला आहे उद्या गावातील कुठल्या ही मुलीवर, स्त्रीवर येऊ शकतो. जंगलात गेल्याशिवाय गावातील चुली पेटत नाहीत. तेव्हा त्यांना काय आणि कसे सांगणार की जंगलात जाऊ नका? आणि कारण विचारल्यावर काय उत्तर देणार आपण........
शामली म्हणाली..... काकू तुझी शिकवण कशी विसरली तू....... अन्याय सहन करणारा ही गुन्हेगारच असतो, हे तूच शिकवले ना..... मग आता या विरुद्ध आवाज उठवायचा, न्याय कसा मिळवायचा हे सोडून तू सांगते आहेस तसे तोंडाला कुलुप लावून गपगुमान बसायचे का?. तूच सांग ना काय करायचे ते? ती चिडून बोलली. पण जे बोलत होती ते फार कळकळीने बोलत होती. आपल्या दुःखाला विसरुन ती गावकऱ्यांबद्दल विचार करत होती. तिने जे भोगले ते कुणीही भोगू नये याची काळजी तिला होती. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तिला लढायचे होते. त्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना शिक्षा द्यायची होती. आपल्यासाठी न्याय मिळवायचा होता तिला. त्यासाठी ती सुमीला तिची साथ देण्यासाठी विनवत होती. पण सुमीला भीती वाटत होती, ती नेमकी काय म्हणते आहे, कसा न्याय मिळवायचा आहे शामलीला. ती शामलीला विचारते...
सुमी:-तुला नक्की काय म्हणायचे आहे? पोलिसात न जाता, कसा मिळवायचा आहे तुला न्याय? तुझ्या डोक्यात नेमके काय सुरू आहे जरा स्पष्ट बोल शामली...
(क्रमशः)