नवरात्रीचे बदलते स्वरूप
नवरात्रीचे बदलते स्वरूप
आज कालच्या काळामध्ये सणवारांचे रूप खुपच बदललेले आहे .
जसे इतर सण बदलले, तसेच नवरात्र किंवा दसरा याच्यामध्ये देखील बदल झाला.
आता प्रत्येक सणाचा इव्हेंट केला जातो, त्याला नवरात्र देखील अपवाद नाही .
आता स्टेटस अपडेट करण्यासाठी का होईना! पण सणवार केले जातात. "हेही नसे थोडके" पूर्वी नोकरीच्या किंवा जबाबदारीच्या नावाखाली, वेळ नाही वेळ नाही असे म्हणून ,या सर्व गोष्टींना फाटा दिला जायचा.
पण आता स्टेटस अपडेट करण्यासाठी का होईना ,पण वेळात वेळ काढून घरातली गृहिणी आपले सणवार साजरे करते.
आता रंगातच बघा ना!
पूर्वी एकदा एका कोनाड्यात घट बसवला, की त्याला माळ घालायची, आणि दोन वेळा आरती, एवढेच मर्यादित होते.
पण आता नऊ दिवस, नऊ रंगाचे ,छान छान कपडे परिधान करून, स्त्रिया आणि पुरुष देखील अगदी नोकरीवर सुद्धा जातात.
अगदी महाराष्ट्र टाइम्स ने, आपला पेपर खपावा म्हणून ही जरी रंगांची टूम काढली असेल, तरी ती काही वाईट नाही.
तसे तर ते आपल्या ग्रहांचेच रंग आहेत. त्या /त्या दिवशी तो /तो रंग अगदी वर्षभर परिधान केला, तरी नक्की त्याचे चांगलेच परिणाम दिसतील. शिवाय हे रंग कॉमन असल्यामुळे, प्रत्येकाकडे असतात.
सोमवार पांढरा
मंगळवार लाल
बुधवार निळा
गुरुवार पिवळा
शुक्रवार हिरवा
शनिवार राखाडी किंवा करडा
आणि रविवार नारंगी
असे ठरलेलेच रंग आहेत.
तसेच पूर्वी ठिकठिकाणी गरबा होत नव्हता. फक्त जिथे गुजराती लोक जास्त राहतात, तिथेच गरबा व्हायचा. त्याला धार्मिक अधिष्ठान होते. देखावा केला जात नव्हता ,
त्यांचा तो एक मध्ये देवाचा खांब रोऊन ,त्याच्याभोवती गुजराती बायका त्यांच्या भाषेमध्ये गाणी म्हणत गरबा करायच्या.
हळूहळू फाल्गुनी पाठक आली ,आणि आता तर गल्लोगल्ली देवीची मूर्ती नसेल तरी चालते, पण मैदानामध्ये गरबा खेळला जातो.,आणि हिंदी मराठी इंडस्ट्रीतले "चांदोबा आणि चांदण्या "आपली हजेरी लावतात. सुपारी घेऊन का होईना ते येतात ,आणि लोकांना याची देही याची डोळा बघायला मिळतात. लोकांच्याही जीवाची मन: शांती होते .
प्रत्येक गोष्टीकडे जर पॉझिटिव्ह नजरेने पाहिले तर, त्यानिमित्ताने कपड्याचे मार्केट चालते, त्यानिमित्ताने ऑर्केस्ट्रा ,बेंजो वाले ,यांना धंदा मिळतो . कुंभारांना रंगीबेरंगी माठ बनवण्याचा सीजन येतो, पैसा मिळतो. शेतकऱ्यांची फुले विकली जातात.
छोट्या कलाकारा पासून, ते मोठ्या कलाकारापर्यंत सर्वांना पैसा मिळतो.
शिवाय मंडप, डेकोरेटर, लाइटिंग ,देवीच्या मूर्ती, ओटी ,नारळ, वेण्या ,ब्लाउज पीस, साड्या यातून लाखोंची उलाढाल होते.
त्यामुळे सर्वांना रोजगार मिळतो. पैसा वाहाता होतो.