नाते तेच नियम वेगळे...
नाते तेच नियम वेगळे...
तू नाही गेलीस का ग पिकनिकला? शेजारच्या रमा काकूंनी अगदी खोचटपणे शलाकाला विचारले..
शलाकाचा भिशी ग्रुप पिकनिकला गेला होता.. सोसायटी मधील सर्व तिच्या वयाच्या मैत्रिणी गेल्या होत्या, पण काही कारणाने तिला त्यांच्या काही गोष्टी खटकल्या म्हणून त्यांच्यामध्ये मतभेद झाले होते. याची कुणकुण रमा काकूंना होती म्हणून मुद्दामून त्या खोदून खोदून विचारत होत्या.. काय ग तुम्ही सर्व मैत्रिणी ना.. मैत्रीचे नाते ना तुमचे मग्..
काकू, तुमचे काही काम होते का? शलाकाने विषय बदलला.. पण काकू काय हलत नव्हत्या, फिरून फिरून परत तोच विषय काढत होत्या.. शेवटी शेखरला समजलेच. तिने मुद्दाम लपवून ठेवला होता हा विषय.. पण ह्या काकू गप्प बसतील तर ना..
शेवटी शलाका चिडुन म्हणाली, हो आहे आमचे मैत्रीचे नाते, पण त्यांचे नियम माणसं बघून ठरतात मला नाही आवडत तें.. मुळात मैत्री ही मुक्त असावी, हे नाते इतकं सुंदर आहे ना की ह्यात नियमावली घालूच नये.
पण इथे प्रत्येकाच स्टेटस, पैसा बघून नियम ठरवले जातात, जे मला नाही पटत आणि हो काकू ग्रुप मध्ये राहून एकट राहण्यापेक्षा आधीच वेगळे राहणे केव्हाही चांगलेच.. जिथे आपल्या मताला किमंत नाही तिथे न जाणं केव्हाही चांगलेच..
मला वाटतंय काकू, तुम्हाला तुमच्या प्रश्नांच उत्तर मिळाल असेल.. रमा काकू तिथुन खजील होऊन निघून गेल्या..
शेखर मात्र तीच्यावर ओरडला, तूला ना कोणाशी जूळवून घ्यायला नको असे म्हणून त्याने तिलाच दोष दिला.. ती म्हणाली बसं झाल शेखर.. मला दोष देणे बंद करा.. मला जे पटत नाही ते मी करणार नाही. तुमचे मित्र आहेत म्हणून त्यांच्या बायकांशी मी जूळवून घ्यायच असे का? प्रत्येक गोष्टीत त्यांचे सो कॉल्ड स्टेटस अन् तो दिखावा मला नाही जमत.. याचा अर्थ मी मागासलेल्या, बुरसटलेल्या विचारांची आहे असे नाही.. माझ्या आवडी- निवडी वेगळ्या आहेत, माझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, अन् माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचा मला पूर्ण अधिकार आहे, एक व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य आहे, त्या मैत्रिणी असल्या म्हणून त्या त्यांच्या आवडी-निवडी माझ्यावर लादू शकत नाहीत, माझ्या छंदाना, माझ्या आवडी-निवडींना त्यांना प्रोत्साहन द्यायला जमत नसेल तर त्यांनी नाव ठेवू नये इतकंच...
हो, हो शांत हो.. शेखर म्हणाला, काय झालंय मला सांग? माझे चुकले, मी तूला तुझी बाजू जाणून न घेता दोष दिला... सांग मला..
शेखरने तिला पाणी दिले, शांत केले.. शलाका म्हणाली, ह्या बायका दुपारी पत्ते खेळतात, मलाही बोलवतात..
मग् चांगले आहे की जात जा.. शेखर म्हणाला
मी गेले होते, पण रोज रोज मला नाही आवडत. म्हणुन मी म्हणाले तुम्ही रोज खेळा, मी आठवड्यातले एक- दोन दिवस येत जाईन.. मला पुस्तक वाचायच असते, आपले गार्डन सजवायला आवडते, आपल्याकडे बाई येते तीच्या मुलाला मी गणित आणि सायन्स शिकवते.. त्यावरून त्यांनी माझे स्टेटस काढले, मी कशी डाउन मार्केट आहे, मला त्या गरीब माणसांमध्ये रहायला आवडते, त्यामुळे मी कशी बावळट आणि त्या कशा शहाण्या हेच म्हणत मला हिणवले, समाजकार्य करते म्हणजे ते कसे कमी दर्जाचे काम आहे हे त्यांना दाखवायचं असत.. म्हणुन त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले आणि मुद्दामून गरीबांना मदत करायचा दिखावा केला तेव्हा मी म्हणाले, फोटो काढून, बातमी पेपर मध्ये देऊन कोणाला मदत केली ती सांगू नका, तुमच्यासाठी तो मोठेपणा असेल पण त्या व्यक्तीसाठी तो कमीपणा असतो.. झालं ह्या एका वाक्यावरून त्यांचे माझ्याशी असलेले नाते बदलून गेले, नियमावली चालू केली, मला वगळू लागल्या.
त्यांनी मला जे बोलले तें मैत्रीच्या हक्काने अन् मी त्यांना जरा बोलले तर लगेच असा नियम.. मला पटले नाही म्हणून बोलले, सक्ती केली का? नाते मैत्रीचे पण नियम मात्र वेगळे.. मग् काय करायचे असली मैत्री, जी आडून आडून टोमणे मारते.. आणि हो मी काही मैत्री तोडली नाही आहे, फक्त काही दिवसांचा ब्रेक घेतलाय त्यांच्या पासून आता थोडी लांब राहणार इतकेच...
शेखर म्हणाला, शलाका तुझे विचार खरच किती वेगळे आहेत, मी समजू शकलो नाही.. तूला हवा तेवढा वेळ घे, मी काहीच बोलणार नाही. तूझं म्हणणं पटले आहे मला नाते तेच पण नियम वेगळे अस असेल तर त्या नात्याला काहीच अर्थ नसतो, मन दूखावले असताना तें नाते टिकावे म्हणून प्रयत्न कर असा आग्रह मी नाही करणार.. आपल्या नात्याचे नियम मी वेगळे नाही करणार..
शलाकाला आज मनातली सल बोलून दाखवल्याने खूप बरे वाट्त होते.