माय व्हॅलेन्टाईन
माय व्हॅलेन्टाईन
व्हॅलेन्टाईन डे, प्रेमिकांचा दिवस. हा दिवस म्हटल्यावर मला माझ्या प्रेमाचा तो दिवस आठवला.....
त्या दिवशी सकाळी उठायलाच थोडा उशीर झाला होता. रोज मी आईला स्वयंपाकात थोडी मदत करत असे पण आज आईनेच सगळी घरातली कामे केले होती. चहापाणी स्वयंपाक करून तिने माझा डबा ही भरून ठेवला होता. तो घेऊन मी घाई घाईने निघाले. पण व्हायचा तो उशीर झालाच व माझी नेहमीची बस चुकली. आता रिक्षाने जाणेच भाग होते. अशा अडचणीच्यावेळी रिक्षा मिळेल तर शप्पथ!
माझ्या सारखे बरेच जण रिक्षा करता थांबले होते. माझा जीव वरखाली होत होता. आता बॉसची बोलणी खावी लागणार व लेट मार्क ही लागणार ह्याची धास्ती वाटू लागली. थोडं मागे जाऊन रिक्षा पकडू म्हणून मी गेले आणि खरोखरंच एक रिकामी रिक्षा आली. मी हात दाखवताच ती थांबली. मी घाईघाईने त्यात बसले. एवढ्यात दुसऱ्या बाजूने एक हॅण्डसम माणूस येऊन रिक्षात बसला. मी चक्रावले. रिक्षा सोडावी तर ऑफिसला कसे पोचणार? रिक्षात बसलेल्या माणसाची स्थिती माझ्यासारखीच झाली होती. ते बघून रिक्षावाल्यानेच विचारले कुठे जायचं आहे तुम्हाला? एकाच दिशेने जात असाल व तुम्हा दोघांची संमती असेल तर मी घेऊन जातो. 'अडला हरि, गाढवाचे पाय धरी' अशी आमची स्थिती होती म्हणून त्याला 'चल बाबा, लवकर चल' म्हटले. रिक्षात आम्ही दोघं शांत बसून होतो. एक सुध्दा अक्षर बोललो नाही.
माझ्या ऑफिसची ईमारत दिसताच दोघांच्या तोंडून शब्द फुटले, 'अहो, थांबवा थांबवा'. रिक्षावाल्या सकट आम्ही दोघं ही चकित झालो व तिघांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. मी रिक्षावाल्याला त्यांचे भाडे देऊ केले तेवढ्यात रिक्षावालाच हसून बोलला, 'चला पळा. उशीर होतोयं ना. आज माझ्या मुलांनाच सोडलंय मी' असे म्हणून त्याने रिक्षा सुरू केली. तेवढ्यात माझ्या बरोबरच्या माणसाने त्याच्या खिशात पैसे कोंबले व मला बघून एक गोड स्माईल दिली. मी त्यांना अर्धे पेसे देत होते तेव्हा तेच म्हणाले, 'असू द्या हो माझं ऋण तुमच्यावर. येथेच तर आपलं ऑफिस आहे. भेट होईलच की पुन्हा' असे म्हणून ते इमारतीच्या दुसऱ्या बाजूच्या लिफ्टने गेले. मी ही मनात म्हटलं, 'देऊन टाकू कधीतरी भेटतीलच'. मी ही कामात मग्न झाले. रिक्षा, पैसे मी सगळे विसरून गेले. त्या माणसाला मात्र विसरले नाही. पण पुन्हा तो कधी मला दिसलास नाही.
अशी माणसे आयुष्यात बरीच भेटतात. एकदोन दिवसा नंतर आपण विसरून ही जातो. पण तो हॅण्डसम माणूस काही माझ्या मनातून जात नव्हता. रोज सकाळी व संध्याकाळी घरी जाते वेळी माझी भिरभिरती नजर त्या माणसाला शोधायची पण पुन्हा तो मला दिसलाच नाही. पुन्हा तो दिसावा, भेटावा, असे मात्र वाटत होते. रिक्षा स्टँडवर ही एकदा मुद्दाम जाऊन बघितले. पण नाहीच दिसले महाशय. वाटलं इमारतीत त्याच्या लिफ्टने जाऊ, दिसतील. एकदा तर वर खाली जाऊन ही आले. पण हट्! सगळं पालथ्या घड्यावर पाणी. नाव गाव काही माहीत नाही तरी मन त्याला शोधायचे थांबत नव्हते.
आणि एके दिवशी सकाळी मी बस करता थांबले होते तेव्हा महाशय समोर हजर झाले. "चल, आज जायचं ना रिक्षाने?" माझ्या तोंडातून शब्दच फुटला नाही. मी अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिले. एवढ्यात रिक्षा आली व आम्ही त्यात बसलो. मला खूप छान वाटले. आपली बरीच ओळख असल्यासारखी आमची बोलणी सुरू झाली. ऑफिस सुटल्यावर बरोबरच जाऊ असे त्याने सांगितल्यावर तर मी अतिशय खुश झाले.
माझ्या मनात एकसारखे त्यांचेच विचार येत होते. मला असं काय होतंय मला कळेचना. मला सगळं छान छानच वाटत होतं. माझ्या बोलण्यात वागण्यात खूपच फरक पडला होता. माझा हा फरक आईच्या लक्षात आलाच आणि त्यामुळे तिने मला विचारले ही. तेव्हा मी 'काही नाही' असं म्हणाले. पण आईच ती माझी, तिने विचारल्यावर माझ्या चेहऱ्यावरचे भाव तिने ओळखले होते. आईने एक दिवस मला सरळच विचारले आणि मी ही तेव्हांं आईला सगळे सांगितले. तेव्हा आईच म्हणाली, "म्हणजे तू त्याच्या प्रेमात पडलीय म्हण ना!"
ह्यालाच प्रेम म्हणायचे? तो कोण, कुठला, कुठे राहतो, काही काही मला माहीत नाही, तरी मी त्याच्या प्रेमात पडले? प्रेम म्हणजे काय असतं ते मला तेव्हा कळलं. माझ्या मनाचा मोर, पिसारा फुलवून आनंदाने नाचू लागला. पण, मनात शंका आली. "अगं वेडाबाई, तू प्रेम म्हणतेस ते तुझं असेल त्याच्यावर, पण त्याचं काय? त्याला तुझ्याबद्दल काय वाटत असेल? नको बाबा जास्त फंदात पडायला. त्याला माझ्याबद्दल काही वाटत नसेल तर माझी फजिती व्हायची. नकोच ही भानगड." तर दुसरं मन म्हणालं, "आपण पुढाकार घेऊन विचारले तर काय हरकत आहे!" असा मी रात्रभर विचार करत बसले. शेवटी मनात निश्चय केला, उद्या रमेशला विचारायचं आणि देवालाही विनवलं की देवा, माझ्यासारखेच त्याला ही माझ्याबद्दल वाटू दे.
दुसऱ्या दिवशी मी मुद्दामच रमेशला विचारायचे म्हणून लवकर गेले. पाहते तर काय! रमेशही माझीच वाट पाहत होता. मी दिसताच त्याने रिक्षा केली आणि नवल म्हणजे, तो तोच, पहिली भेट घडवलेलाच रिक्षावाला! मी माझे प्रेम रमेशकडे व्यक्त करायच्या अगोदर रमेशच म्हणाला, "नयना, मला तुझा हात देशील?
"म्हणजे, तुला ही माझ्या बद्दल असंच वाटतं!"
आमच्या दोघांच्या बोलण्यावरून रिक्षावाल्याने बरोबर जाणले आणि उतरते वेळी त्याने आम्हाला तोंडभरून आशीर्वाद दिले.
आम्ही एकमेकांना जाणायच्या अगोदरच 'लव्ह ऍट फर्स्ट साईट' म्हणतात तसे झाले. खरंच, प्रेम आंधळे असते म्हणतात ह्यावर माझा विश्वास बसला.
हळुहळु आमच्या भेटीगाठी वाढल्या. आमच्या दोघांच्या घरी ही आम्ही आवडलो आणि पुढच्या दोन महिन्यात आमचे लग्न ही उरकले.
प्रेम होणे, प्रेम जूळणे, कधी मैत्रिणीच्या चिडवण्यामुळे तर कधी कोणाच्या लग्न समारंभात नजरा नजर होऊन असे प्रेमाचे कितीतरी प्रकार मी पाहिले होते, एकले होते व पुस्तकात ही वाचले होते. पण आम्हा दोघांचे प्रेम अजबच! अनोळखी सहप्रवासी, पहिल्यांदा आम्ही दोघांनी एकत्र केलेला तो रिक्षातला प्रवास, त्या रिक्षावाल्याने नाकारलेले भाडे, त्यावेळी रमेशने जबरदस्तीने त्याच्या खिशात कोंबलेले पैसे आणि पुढच्या खेपेस त्याने आम्हा दोघांना दिलेले आशीर्वाद. हे सगळे मला बऱ्याच वेळा आठवत असते. आता एवढी वर्षे आमचा सुखाचा संसार चालला आहे. खरंच, रिक्षावाल्याच्या रुपाने देवानेच आमच्या गाठी जुळवल्या होत्या.
संसार, नवरा बायको म्हटले की कुरबुर होतेच असते असे म्हणतात, पण ह्याला आम्ही दोघं अपवाद आहोत. आम्ही कधीच भांडलो नाही. राग रुसवा, आदळ आपट काही काही नाही. आम्ही दोघं जिवाला जीव लावतो. काळजी, माया, आदर सारखाच वाटतो. आम्ही दोघंही कमावतो. जास्त श्रीमंत नाही की गरीब ही नाही. आवडी निवडी ही बेताच्याच. आहे त्यात सुखी समाधानी आहोत. फक्त प्रेम हीच आमची संपत्ती आणि आम्ही दोघंही ती संपत्ती जपतो. आमची मुले ही त्याच संपत्तीत वाढलेली असल्याने त्यांच्यावर ही तेच संस्कार झाले आहेत आणि ती ही गुणी आहेत.
खरंच, दृष्ट लागण्या सारखा आमचा सुखी संसार आहे. दोन मुले, सगळ्या सुखसोई आणि आमचे चौघांचे निरंतर एकमेकांवर असलेले प्रेम!!
चौदा फेब्रुवारीला सगळ्यांचा व्हॅलेन्टाईन डे असतो पण रमेशचा व माझा आज चौदा वर्षे झाली तरी रोजचाच दिवस व्हॅलेन्टाईन डे आहे. हेच आमच्या प्रेमाचे वैशिष्ट्य.