माझी ज्येष्ठा
माझी ज्येष्ठा
दक्षा आणि श्रुती दोघी जावा.. दक्षा मोठी तर श्रुती धाकटी... सासूबाईंचा कल मात्र श्रुतीकडे जास्त होता.. धाकटा मुलगा लाडका त्यामुळे धाकटी सूनही... असे दक्षा म्हणायची आणि दुर्लक्ष करायची...
दक्षा लग्न करून या घरात आली.. त्याला आता ५-६ वर्ष झाली.. वर्षाच्या आतच पाळणा हलला त्यामुळे पुरती अडकून गेली.. त्यात सासूबाई सतत दक्षाला बोल लावायच्या.. तसे बघायला गेले तर दक्षा खूप ऍक्टिव्ह होती.. चपळ होती..पण आधी नवखेपणामुळे थोडी बावरून असायची अन् नंतर गरोदरपणात होणारे त्रास.. बाळ झाल्यावर सुद्धा सगळ मॅनेज करून समजून घेईपर्यंत सासूबाईंचा चूकीचा समज झाला.. तीने केलेले कोणतेही काम त्यांना अर्धवटच वाटायचं.. सतत नाव ठेवायच्या.. ती बिचारी मन खट्ट करायची.. पण त्यात तिची काहीच चूक नव्हती हे त्यांना कधी समजलेच नाही..
जेवण करताना असो, भाजी चीरताना असो कि अजून काही.. बाळ रडायला लागले की हातातले काम अर्धवट टाकून तिला त्याला घ्यावं लागे... सासूला नेमक त्याच वेळेस तिने अर्धवट टाकलेले काम दिसे अन् तिला बोल लावे. सुरुवातच अशी झाली की प्रत्येक कामात चूक दिसे.. आता हे लग्न ठरले, त्यात दोन मुले.. श्रुती घरात येणार म्हणून त्या खुश होत्या.. लग्नात तिला दागिने सुद्धा हिच्यापेक्षा जास्त केले.. दक्षाला वाईट वाटले.. पण तूला आता तिच्या सोबत केले ना असे म्हणून नवर्याने तिची समजूत काढली..
श्रुती घरात आल्यावर सुद्धा प्रत्येक गोष्टीत तिला डाव उजवं दिसत होते.. तिने आवरायला वेळ लावला तरी सासू काहीच बोलत नसे.. सासू प्रत्येक गोष्टीत तिची बाजू घेईं.. दक्षाला हे काही पटत नव्हते.. धाकटी त्याचा गैरफायदा घेत होती.. आणि ही मात्र वाईट होत होती... दोन मुलांचे करताना ती दमून जायची.. त्यात घरंच सर्व करत होती.. धाकटी थोड काम केले की दमायची.. सासूबाई तीचं कौतुक.. सवय नाही तिला.. आता मात्र दक्षा थक्क होऊन बघत राहायची.. मनात म्हणायची.. मी ही नवीनच होते, मी पण दमायची.. मलाही काम करायची, साडी नेसायची सवय नव्हती पण मला मात्र कधीच कौतुकाने सवलत दिली नाही.. आम्ही दोघी सूना तरी नियम का वेगळा? हे डाव, उजव का? खुप् रडवेली व्हायची..
माहेरी आली तेव्हा खचलेली तब्येत बघून आजीने विचारले? मायेने हात फिरवला.. तसा तीचा बांध फुटला खूप रडली.. आजीला सर्व काही सांगितले..
आजी म्हणाली, हे बघ बाळा.. मी कुठे तरी वाचले होते तें सांगतें तूला.. एका ठिकाणी लिहिले होते.. एका हॉल मध्ये दोन पंखे असतात.. एक सतत वापरून धूळ साचलेला.. एक स्वच्छ.. सगळे जण त्या साफ़, स्वच्छ पंख्याकडे बघून त्याचे कौतुक करतात.. पण घाण झालेल्या पंख्याकडे बघून नाक मुरडतात.. त्याने घेतलेल्या जबाबदारीमुळे त्याची अशी अवस्था झाले हे विसरून जातात..
गणपतीत आपण गौर आणतो.. दोघीनाही सारखं सजवतो.. तरी डाव, उजवं होतच की... तू तुझ्या मनाला जे पटेल ते कर.. तो वरचा बघतोय बरं.. दक्षाला आजीचं बोलणं पटले..
तीने सासरी आल्यावर या गोष्टी दुर्लक्ष केल्या.. सासू धाकटीला अगदी हातावर झेलत होती.. पण काळ जसा पुढे गेला, तसे सासूबाईंना समजत गेले..
आज इतक्या वर्षांनी त्यांना त्यांची चूक समजली होती.. धाकटी डोक्यावर बसली होती.. गणपतीचा सण आला.. सासूबाईंनी दोघीनाही छान साड्या घेतल्या.. गौरींचे आवाहन, पूजन.. दक्षा अगदी जातीने लक्ष देऊन सर्व करत होती.. स्वयंपाक, पूजेची तयारी.. हळदी कुंकू आमंत्रण.. सासूबाई कौतुकाने पाहत होत्या.. श्रुतीला बोलायची सोय नव्हती.. जरा शब्द खाली पडून द्यायची नाही, माघार घ्यायची नाही.. स्वतःच तें खर..
सर्व बायका हळदी कुंकूला आल्या, श्रुती अगदी दोन तास पार्लरला जाऊन नटून-थटून आली.. दक्षाला मात्र सर्व करे पर्यंत एवढा उशीर झाला की स्वतःला असा वेळ मिळालाच नाही..
सगळे श्रुतीचे कौतुक करत होते.. दक्षा आल्यावर मात्र काही बायका कूजबूजून हसुन म्हणाल्या, तुमच्या ज्येष्ठा.. कनिष्ठा अगदी सारख्याच सजून आल्यात तरी थोड डाव, उजवं आहेच हो...
तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, तो फरक नेहमीच असेल.. कारण इथे सर्व व्यवस्थित व्हावं.. सारं नीट पार पडाव म्हणून माझी ज्येष्ठा आज दिवसभर राबत आहे.. तीच्या नावाप्रमाणेच प्रत्येक काम ती अगदी दक्षतेने करते.. म्हणूनच तिच्या चेहेऱ्यावर आज वेगळेच तेज आलंय..
सासूबाईंनी केलेले कौतुक पाहून दक्षाला खूप आनंद झाला.. गौराई आज इतक्या वर्षाने पावली असे विचार मनात करत असतानाच सासूबाईंनी सर्वांसमोर दक्षाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या माझी हि गौर वर्षानुवर्ष माझ्या या घरासाठी उभी आहे.. आमच्या कुटुंबासाठी प्रत्येक संकटात खंबीरपणे सतत उभी आहे.. आज मी माझ्या या गौराईचे कौतुक मला भरभरून करू दे.. असे म्हणत त्या मनापासून खूप बोलत होत्या.. श्रुती रागाने कधीच निघून गेली होती अन् दक्षा मात्र आजीचे बोल आठवून आनंदाने रडत होती.
कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे. सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी. कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.