कोकणातील आठवणी - भाग २
कोकणातील आठवणी - भाग २
एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा संपल्या आणि मे महिन्याची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, मामाच्या गावी जायचे वेध लागायचे. तसे दरवर्षी आम्हाला गावाला जायला मिळायचे नाही. पण जेव्हा केव्हा आम्ही गावी जात असू. तेव्हा नुसती धमाल, मस्ती आणि मजाच असे.
आजोबांच्या बैलगाडीत फिरायची मजा औरच होती. जेव्हा गावच्या घराचे काम सुरू होते तेव्हा वाळू आणण्यासाठी आजोबा दूर माळरानावर आम्हाला बैलगाडीतून घेऊन जात असत. मला आठवतं तिथे पाम वृक्षाची झाडे होती. किती सुंदर नजारा असायचा तो. तिथे आम्हाला एकदा ससे ही दिसले होते. पण अशा सफारींना गेल्यावर येताना मात्र सगळ्यांना चालत यावं लागे. कारण बैलगाडीत कधी वाळू, कधी कौले, तर कधी लाकडे असायची. पण एका फेरीला बैलगाडीत बसायला मिळायचे याचा ही तितकाच आनंद असे. येताना मग आंबे, करवंद, जांभळं यांचा आस्वाद घेत घेत आम्ही सगळी बच्चेकंपनी मजा करत येत असू. मग घराजवळच्या बोरिंगवर हातपाय, तोंड धुवून घरी जात असू.
गावाला चहा नाश्ता पासून जेवणापर्यंत सगळे काही अगदी वेळेवर असायचे. माझी आजी सुगरण होती. तसे पण गावाला पहाटेच लवकर जाग येत असे. त्यामुळे ब्रश करून, सकाळच्या क्रियाविधी आटपून मग आम्ही सगळे चहा बरोबर बटर, खारी, बिस्कीट खात असू. त्यानंतर नंबर लावून सगळे अंघोळीला जात असत. माझे भाऊ बादली घेऊन सरळ बोरिंगवर अंघोळीला जात असत.
मग अंघोळ केल्यावर आजीच्या हातची भाकरी आणि त्याबरोबर कधी पिठलं, कधी कांद्याची भाजी, तर कधी सुका जवळा असायचा. तर कधी घावणे, आंबोळ्या सुद्धा असत. मग लगेच दुपारी १२-१२.३० पर्यंत जेवण नंतर संध्याकाळी ४ वाजता पुन्हा चहा आणि रात्रीचे जेवण बरोबर ८ वाजता. मुबंईला इतके टाइम टू टाइम सगळं जमत नाही. जास्त भूक ही लागत नाही. पण गावाला भरपूर भूक लागते. ते का हे मला तरी माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा.
पप्पांची मुंबईतली मामी म्हणजे आमची सगळ्यात फेवरेट आजी होती. ती मूळची मुबंईची असल्यामुळे तिला जास्त गावचे माहीत नव्हते आणि कोणाची कोणती झाडे ते तर अजिबात नाही. आम्ही कुठेही फिरायला गेलो तर आजी आमच्याबरोबर असायचीच. एक दिवस आम्ही आमचे कलमाचे आंबे झाडावर किती धरले आहेत ते बघायला गेलो. तर तिथे २ मुले घळ घेऊन आंबे काढताना आम्हाला दिसली. मग काय आम्ही लागलो आरडाओरडा करायला. पण आजीने तर धमालच केली तिच्या हातात नॉर्मल एक काठी होती. ती तिने त्या मुलांना हळूच पायावर मारली. ती मुले तिथून धूम पळाली आणि आम्ही इन शॉर्ट आंबे चोरणाऱ्या मुलांना पळवून लावले म्हणून ऐटीत होतो.
आम्ही फिरून काही वेळाने घरी येऊन बघतो तर ती मुले आमच्या घरी होती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे वडील पण होते. आम्ही आजीकडे आणि आजी आमच्याकडे बघायला लागली. तेव्हा आजोबांना सगळा किस्सा त्या मुलांमुळे आधीच कळलेला. आम्हाला बघून मग आजोबांनी लगेच आमचे कन्फ्युजन दूर केले. ती मुले सुद्धा मुबंईतली होती त्यामुळे ती आम्हाला ओळखत नव्हती आणि ती त्यांच्याच झाडाचे आंबे काढत होती. जे अगदी आमच्या आंब्याच्या झाडाच्या बाजूला आहे. झालं त्यादिवशी आमचा खूपच मोठा पचका झाला होता.
मुबंईच्या आजीबरोबरचे किस्से तर भन्नाट आहेत. आम्हीं एकदा आमच्या शेजारच्या मित्राला घेऊन गावी गेलो होतो. तो थोडा हेल्दी होता. आजी नेहमी त्यालाच काही न काही काम सांगत असे. उठल्यापासून झोपेपर्यंत दोघांमध्ये सारखे वाद होत असत. पण तरीही तो झोपताना आजीच्या आसपास झोपत असे आणि सकाळी उठल्यावर पाहिले तर त्याच्या हातात आजीच्या वेणी असे. आजी असली की पेप्सीकोला, वडापाव, भजी, थंडा हमखास मिळे. त्यामुळे आमची चंगळच असे.
मामाच्या गावाची एक अद्भुत कथा सुद्धा आहे. असे मी ऐकलंय की त्या गावाच्या वेशीवर एक वाघ मरून पडलेला. मग गावातल्या काही जणांनी त्याची समाधी बांधली आणि ह्या वाघावरूनच मामाच्या गावाला नाव मिळाले. ती समाधी अजूनही तिथे आहे. आम्ही लहानपणी लिंगेश्वर पावणादेवीच्या मंदिरात पाया पडायला गेलो की तिथेही नतमस्तक होतो. तिथे ब्राम्हणदेवाच सुद्धा देऊळ आहे. पण तिथे स्त्रियांना जायला मनाई आहे. त्यामुळे तिथे फक्त माझे भाऊ जाऊन पाया पडून येत असत.
कोकणात भरपूर मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे काही ना काही वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर त्यांची माहिती सांगणाऱ्या कथाही आहेत. त्याला तुम्ही दंतकथा ही म्हणू शकता. पण त्यामधल्या काही खऱ्या ही आहेत.