भीमाचा सल्ला
भीमाचा सल्ला
युधिष्ठिर हा पाच पांडवांपैकी सर्वात ज्येष्ठ. धर्माचं कठोर पालन करणारा आणि अत्यंत उदार म्हणून संपूर्ण महाभारतात त्याचा वारंवार उल्लेख आहे. दानशूरतेबाबतही कर्णाखालोखाल त्याची ख्याती आहे. दान मागण्यासाठी आलेल्या कुणालाच युधिष्ठिरानं कधीही विन्मुख परत पाठवलं नाही.
एकदा एक माणूस त्याच्याकडे दान मागण्यासाठी आला. कुठल्याशा कारणानं युधिष्ठिर त्यावेळी फार त्रस्त झाला होता, कंटाळला होता. तो त्या माणसाला नाही म्हणाला नाही, पण त्याला त्यानं सांगितलं, 'बाबा रे, तू उद्या आलास तर बरं होईल. तू मागशील ते देईन.'
भीम जवळच उभा होता. त्यानं युधिष्ठिराचं बोलणं ऐकलं. तो पुढे येऊन म्हणाला, दादा, आपल्याकडून फार मोठी चूक होते आहे, असं मला वाटतंय. आपण उद्याची खात्री देता आहात, ती कुठल्या आधारावर? उद्याचा दिवस कोणी पाहिलाय?'
युधिष्ठिराला आपली चूक समजली. त्यानं त्या याचकाच्या इच्छेनुसार दक्षिणा देऊन त्याला संतुष्ट केलं. म्हणूनच चांगल्या विचाराला ताबडतोब कृतीत आणावं. कुठलंही काम लांबणीवर टाकण्यापेक्षा ज्या त्या वेळीच केलं तर त्याचा उपयोग होतो. चालू क्षण वाया घालवून भविष्याची स्वप्नं पाहण्यानं हाती काहीच लागत नाही.
