आठवणीतला महापूर
आठवणीतला महापूर
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
महापूर महाप्रलय सगळंच इतक भितीदायक होतं की हा पाऊस जर थांबलाच नाही तर महाराष्ट्रातील काही भागात जगबुडी होते की काय ही भीती निर्माण झालेली.. अशी संततधार सतत १२/१५ दिवस सुरु होती.. कोल्हापूर सांगली विभागाला याचा प्रचंड फटका बसलेला आहे.. सावरण्यास वेळ नक्की लागेल पण आपण महाराष्ट्रातील खंबीर कणखर लेकरे आहोत घाबरून चालणार नाही.. सबळतेने पुन्हा उभे राहा.. महालक्ष्मी पाठीशी उभी आहे..
सुरुवात झाली ती बरोबर २६ जुलैला दुपारी २ वाजल्यापासून आणि २६ जुलै २००५ ची आठवण झाली.. २६ जुलैला मी वांगणी येथील फार्महाऊस आणि वॉटरफॉलवर पावसाळी सहलीसाठी गेले होते.. वांगणी-बदलापूर फार काही अंतर नाही साधारण १५ मिनिटे.. दिवसभर खूप धमाल मजामस्ती केलेली.. आणि साधारण ५.३० ला आम्ही तिकडून निघालो.. ६च्या सुमारास बदलापूर गाव परिसरात बस आली, तिथे रस्त्यावर बसचा अर्धा टायर होता इतके पाणी होते.. मग मात्र भीती वाटू लागली.. बदलापूर नदीच्या पुलावरुन आल्यानंतर बदलापूर शहरात येता येतं..
पुलावर आलो तर नदीचे पात्र पुर्णपणे भरलेलं.. पुलाला पाणी लागायला थोडेसेच बाकी होते.. आता मात्र काळजी वाटू लागली ती मुंबईहुन ऑफिसमधुन येणाऱ्या मुलांची.. मी ६.१५ ला घरी पोहोचले.. लोकलचा गोंधळ, पाऊस कमी होण्याचे चिन्हं दिसत नव्हते.. आधी मानसीशी संपर्क केला ती ६ वाजता ऑफिसमधून निघते, तिला लोकल मिळाली होती.. तिच्याशी व्हाॅट्सॲपवरुन संपर्कात होते, गाडी हळूहळू येत होती.. नंतर मयूरचा मेसेज आला, त्याला सीएसटीएमवरुन ८.१५ ची बदलापूर लोकल मिळालेली.. तो सायनपर्यंत आला, ट्रॅकवर पाणी होतं..
मानसी कशीतरी ८ . ३० ला घरी पोहोचली.. पाऊस वाढतच होता.. मयूरची लोकल रडतकढत १०.३० वाजता कल्याणपर्यंत आली आणि कल्याणला लोकल कॅन्सल करण्यात आली.. मग काय कल्याणला उतरला.. गजानन महाराजांचे आशीर्वाद किमान लोकल कल्याण स्टेशनला थांबली.. मग काय रिक्षा नाहीत एक ईको गाडी लालचौकीपर्यंत मिळाली पुढे पुन्हा रिक्षा नाहीत.. पाऊस मुसळधार.. कसाबसा तो आधारवाडी कल्याण येथे माझ्या बहिणीकडे ११.१५ वाजता पोहोचला.. आणि माझ्या जीवात जीव आला..
तोपर्यंत म्हणजे साधारण रात्री १०.३० वाजल्यापासून महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणीच्यामध्ये अडकली होती.. ते आम्हालाही दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता समजले.. माझ्या घरापासून साधारण ६/७ किलोमीटरवर गाडी उभी होती.. हेलिकॉप्टर माझ्या घराच्या आजूबाजूने घिरट्या घालीत होती.. आणि रात्रभर सर्व प्रवासी त्या गाडीत कसे काय राहिले असतील.. गरोदर महिला लहान मुलं वयस्कर माणसं.. पाणी गाडीत शिरले होते.. यावेळी माणुसकी आणि मानवता खऱ्या अर्थाने दिसून आली..
जणूकाही पुढे घडणाऱ्या अनर्थाची चाहुल त्या महालक्ष्मी मातेला आधीच लागली होती म्हणून गाडी अडकली आणि मुंबईतले प्रवासी सुखरूप घरी परतले.. त्याच दिवशी म्हणजे २७ तारखेला अत्रे रंगमंदिरला आम्हाला अश्रूंची झाली फुले नाटकाला जायचे होते.. ६ तिकिटे बुक केलेली होती.. सकाळपासून वाटत होते पाऊस थांबावा किंवा शो कॅन्सल व्हावा.. ईंस्टाग्रामवर मानसीने सुबोध भावे यांनाच शो बद्दल विचारले ते म्हणाले शो होणार आहे.. सुदैवाने माझ्या घरासमोरीलच मुलगा त्याच्या बायकोला रिक्षाने कल्याणला सोडायला निघाला होता मी आणि मानसी त्याच्यासोबत कल्याणला नाटकासाठी पोहोचलो..
नाटक संपल्यानंतर सुबोध भावे यांना भेटलो त्यांना समजले आम्ही बदलापूरहुन आलो आहोत.. त्यांनीही काळजी व्यक्त केली आणि शेकहॅंड करुन काळजी घ्या नीट घरी जा असा निरोप दिला.. पण आम्ही त्यादिवशी कल्याणमध्येच राहिलो दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ तारखेला परतलो.. या परिस्थितीत मला माझ्या अनेक ग्रुपवरील ओळखीतील मैत्रिणी स्नेही नातलग यांचे फोन मेसेज येत होते आपल्याही ग्रुपवरील जे सदस्य कधीही ॲक्टिव्ह नसतात म्हणून ओरड केली जाते असे सदस्य यांनीही आवर्जून फोन मेसेज केले.. मोहिनी, मोहिनीजी, मोहिनी काकु तुम्ही कशा आहात तुम्हाला काहीही मदत हवी असल्यास हक्काने सांगा.. तुमचे बॅंक डिटेल्स द्या.. आम्हाला तुम्हाला मदत करण्याची मनापासून इच्छा आहे..
माझ्या माहेरचे नातलग शाळेतल्या मैत्रिणींचेही फोन येत होते शमु, शमा तू कशी आहेस मुलं कशी आहेत.. तू एकटी असतेस मुले कामाला जातात काहीही प्रसंग आला तरी तुला एकटीला लढायचे आहे.. पण या सगळ्यांनी मला सांगितले स्वतःला एकटी समजू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत.. पण आई-वडिलांच्या पुण्याईने आणि गजानन महाराजांच्या कृपादृष्टीने मी जरी बदलापूरमध्ये राहात असले तरीही माझे घर अगदी सुरक्षित जागी आहे.. बदलापूरमध्ये कुठेही पाणी आले तरी आमच्या बाजुला पाण्याचा धोका नाही तुम्ही कुणीही काळजी करु नका असे मी प्रत्येकाला सांगत होते.. माझी आवर्जून चौकशी करणाऱ्यांचे मी आभार नाही मानणार कारण त्यांचे प्रेम आणि महाराजांची कृपादृष्टी यामुळे सर्वकाही सुरळीत आहे..