आजी# मातॄत्वाचा एक रंगच
आजी# मातॄत्वाचा एक रंगच
मीराताई अतिशय शिस्तप्रिय. त्यांना सर्व अगदी नीटनेटके लागायचे, जरा इकडची वस्तू तिकडे झाली की ह्यांनी घर डोक्यावर घेतलेच समजा. मीराताई म्हंटलं की त्यांच्या आधी डोळ्या समोर येई ती त्यांची शिस्त... घरची परिस्थिती बेताची त्यामुळे दोन्ही मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी केली त्यांनी आयुष्यभर... बर ह्या पाळणाघरात ठेवताना पण सर्व चौकशी अगदी कसून केली, स्वच्छता, शिस्त, संस्कार या कोणत्याही बाबतीत कमतरता काय राहील? मुले पण गुणी होती, आई-बाबा आपल्या साठी किती कष्ट करत आहेत याची जाणीव होती मुलांना..
दोन्ही मुले छान शिकली, मुलगा मंदार लहान होता, त्याचे शिक्षण चालू होते, मुलगी चांगली ग्रॅज्युएट होऊन नोकरी करत होती. मुलीचे लग्न जमवायला सुरवात केली आणि मीराताई यांनीं स्वेच्छेने रिटायर व्हायचं ठरवले, मुलीसोबत काही क्षण घालवता यावे यासाठी.. आता सर्व परिस्थिती अगदी उत्तम होती फक्त या साठी त्यांना त्यांचे आईपण जगायचं राहून गेले असेच वाटायचं... तेवढी एक खंत त्यांच्या मनात होती... दिवस पुढे जात होते, लग्न जमले त्यांचे डोळे भरून आले, तशी दोन्ही मुले गुणी होती... सर्व काही छान चालू होते आता...
मुलगी मेघा लग्न होऊन गेली. सासरी तिचे फार कौतुकच झाले, कारण आईच्या शिस्तीच्या धाकात वाढलेल्या मेघाला सर्वच सवयी खूप चांगल्या होत्या.. आपल्या मुलीची काळजी नाही काहीच आता असे त्या महेशरावांना म्हणाल्या.... दोघेही बऱ्याच वर्षाने असे निवांत बसले होते. हळू हळू मंदारचे शिक्षण पूर्ण होत आले, मुलगी आता भारताबाहेर स्थायिक झाली होती काही वर्षांसाठी...
आईला घाबरत घाबरत मंदारने आपले एका मुलीवर प्रेम आहे, आणि तिच्या सोबत लग्न करणार असे सांगितलं... झाले, मीराताई खूप चिडल्या.. अरे, कोण मुलगी आहे? आपले वळण, रिती, कसे काय करणार इतर समाजातील मुलगी.. आपण ब्राम्हण.. आपल्या घरात मांस मच्छी मला चालणार नाही..
महेशराव म्हणाले, त्याच ऐकून तरी घे.. मंदारने घाबरत घाबरत सांगितलं सर्व.. आणि हो त्यांच्या कडे सुद्धा मांस-मच्छी काही खात नाहीत... वारकरी आहेत तिचे आजोबा त्यांनी माळ घातले, त्यामुळे घरात काही होत नाही... तिचे नाव पण मेघाच आहे..
अरे किती चांगली स्थळ येतं होती, आणि तू काय रे? बर आधी आपण त्यांच्या घरी जाऊ, मग् इकडे बोलवून घेऊ त्यांना... घर बघायला नको का आधी?
मंदार आपल्या आईकडे बघत बसला, त्याने आईला मिठी मारली, मीराताई नाराजीनेच म्हणाल्या, असेच प्रेम कायम ठेवा म्हणजे झाले... बघता बघता लग्न झाले, लग्नासाठी आलेले पाहुणे जायला निघाले, मुलगी, जावई सुद्धा निघाले.. मीराताई म्हणाल्या, ताई ३ वर्ष झाली तुझ्या लग्नाला आता जरा मनावर घ्या... मेघा म्हणाली, ६ महिन्यात येऊ आम्ही इकडे मग् ठरवतो...
मी नसले तरी ही मेघा आहे ना तुझ्या सोबत आता.. माझी कमी जाणवणारच नाही... सर्व सोपस्कार झाले, आणि मीराताईंच्या हाताखाली मेघा-मंदारचा संसार फूलू लागला.. तसे प्रेमविवाह असल्यामुळे ती 2-3 वर्ष मंदारकडून त्यांना ऐकत आली होती, त्यांची शिस्त या बद्दल तिला सर्व माहित होते. एकूण काय तर सर्व बरं चालले होते, वर्षभरातच गोड बातमी आली, त्यांनी खूप काळजी घेतली.. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होते, जुळे आहेत...
नातवंडे झाली ती ही जुळी... मग् काय मीराताईंना खूप आनंद झाला... मुलांचे कपडे, खेळणी यांनीं घर अगदी भरून गेले... दोघांचे एकदम आवरायचे म्हणजे पसारा व्हायचा.. त्यात रात्री जागरण व्हायचं कधी कधी त्यामुळे घरची शिस्त मात्र हरवली होती..
सुरवातीला खूप चिडचिड करायच्या... त्यांना अशी सवयच नव्हती... पण हळू हळू या गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली, नातवंडासोबत दिवस कसा संपायचा हे देखील त्यांना कळत नसायचे,
दोन्ही बाळं हळू हळू मोठी होऊ लागली, त्यांच्या बाळलीला बघण्यात त्यांना या साऱ्याचा विसर पडला...
त्यांची मुलगी मेघा आली, आपल्या घराचे हे रूप बघून तिला विश्वासच बसत नव्हता, आई असताना असे घर.. ती बघतच बसली.. बऱ्याच दिवसांनी पूर्ण कुटुंब एकत्र आले होते.. घर आनंदाने भरून गेले होते...
महेशरावांनी आणि त्यांच्या मुलांनी सहज चेष्टा केली... आजी या नात्यात पडलीस पण तुझी शिस्त हरवली आहे बघ...
त्या हसुन म्हणाल्या, हत्ती गेला अन शेपूट राहिले हो आता.... ह्या एका प्रेमळ स्पर्शाने समजलंय.. "नातवंडांना दूधावरची साय का म्हणतात??"
आपली आर्थिक परिस्थिती बेताची त्यामुळे नोकरी करताना घर पण नीटनेटके राहावे यासाठी हा खटाटोप केला... पण हे सर्व करताना, मुलांसोबतचे जे क्षण हरवले तें आता जगून घेते.. आता या वयात परत एकदा मातॄत्त्वाचा रंग अनुभवताना आई म्हणून निसटून गेलेले क्षण आजी म्हणून अनुभवते आहे....
दोन्ही मुलांनी आईला मिठी मारली, आणि महेशरावांचे डोळे भरून आले... सूनबाई आज तुझ्यामुळे आमची जुनी मीरा, हसरी, प्रेमळ मीरा आम्हाला इतक्या वर्षांनी परत मिळाली.. खरंच माझ्या या नातवंडानी वर्षभरातच आजीला एकदम मवाळ करून टाकली.. आता आजीच्या टाळूवरचे लोणी खाणार हे दोघे... तेव्हा सूनबाईने पुढे येऊन मीराताईंची नक्कल केली, नाही हं.. माझ्या घरात मी असे चालू देणार नाही, जागची वस्तू मला त्या जागेवरच हवी आहे.. मीराताईंनं तिच्याकडे बघताच, तिने कान धरले.. आणि सर्व जोरात हसू लागले...