आईचे रूप-- गोधडी
आईचे रूप-- गोधडी
ओह् हो बाबा सोडा ना आता अशा गोधडी वगैरे वापरणे... ए आई सांग ना बाबांना... अग आता आपण किती छान इंटेरीयर केलंय ना आपल्या या घराचे... आता या रूममध्ये झोपताना तुम्ही ही गोधडी घेणार आहात का बाबा??
आईने डोळे मोठे केले आणि शरु तिथून बाजूला झाली... शलाका तिला समजावून सांगूं लागली... असे,बोलू नको ग... तुला माहीती आहे ना.. त्या तुझ्या....
तेवढ्यात बाबांनी शरूला बोलावले आणि म्हणाले, शरू प्रत्येक मुलीला आपल्या आईची साडी म्हणजे तिची हक्काची सखी असते... कारण त्यात तिच्या आईची ऊब असते... प्रत्येक मुलीने नेसलेली पहिली वहीली साडी ही तिच्या आईचीच असते... ती नेसल्यावर अगदी आई सारखीच दिसतेस ग...!! असे कॊणी बोलले की मुठभर मांस चढते.... नाही का?
शरू हसून म्हणाली हो ना... मला तर आईच्या कितीतरी साड्या खूप आवडतात... पण ही आई ना मला नेसायला देतच नाही... शलाका हे ऐकताच म्हणाली नीट अक्कल येईपर्यंत मुळीच देणार नाही मी...
बाई आणि साडी हे न सुटणार कोड आहे.. शंतनु हसत म्हणाला... पण आईची साडी आणि मुलीचे नाते हे सगळ्यांनाच माहिती आहे.. हो की नाही बाबा... शरु हसत म्हणाली... शंतनु म्हणाला, अगं पण काही मुले सुद्धा या आईच्या साडीला अगदी जीवापाड जपतातच... त्यातलाच मी एक आहे बघ...
तुला हसु येईल पण तुला सांगू का?... "गोधडी ही एक अशी कलाकुसर आहे, जी तिच्या मोठमोठ्या टाक्यांमधुन घरातल्या माणसांची मने जोडते अगदी कायमची... म्हणून तर तें कधीच उसवत नाहीत.. कारण ते टाके एकमेकांच्या मायेच्या धाग्यात गुंफलेले असतात..." शरू सर्व ऐकत होती... आणि तिला सर्व सांगता सांगता... शंतनू मात्र भूतकाळात हरवला...
लहान वयात आई गेली माझी... बाबांनी गरज म्हणून दुसरे लग्न केले... पण त्या आईने मला तेवढा जीव कधी लावलाच नाही... बाबा असताना वेगळे वागायची आणि नसताना वेगळे... बाबा आईच ऐकायचे, त्यांचा नाईलाज होता... त्यामुळे तें तरी काय करणार? पण या सर्वात मी मात्र लहान असल्यापासून मायेला पोरका झालो होतो .... आजी मे महिन्यात न्यायला यायची.. तेव्हा महिनाभर आजी माझे कोडकौतुक करायची... आईविना पोर म्हणून तिचा खूप जीव होता माझ्यावर.. पण मामा-मामी पुढे तिचे काहीच चालायच नाही...
आजी मला सांगायची, पोरा... माझा काय भरवसा... मी आज हाय तर उद्या नाय... मी तिला म्हणायचो, आजी असे नको ग बोलू... आई गेली.. आता तू असे बोलल्यावर मी काय करू ग....?? तेव्हा आजीने जुनी पेटी काढली आणि त्यात तिच्या तसेच माझ्या आईच्या काही साड्या होत्या... ती म्हणाली, मुलगी असतास तर आमचा आशिर्वाद म्हणून दिल्या असत्या... पण तुला याचा कसा उपयोग करता येईल?? तेव्हा मीच आजीला म्हणालो, मी या साड्या आयुष्यभर सांभाळून ठेवेन... म्हणून मग आजीनं या सर्व साड्यांपासून मला या वेगवेगळया गोधड्या शिवून दिल्या... आणि म्हणाली, "आपल्या आई-आजीची कधीही न संपणारी माया अन् सुसंस्कृतेचे संस्कार काहीच न बोलता जी आपल्या पर्यंत पोहचवते ती म्हणजे त्यांच्या साड्यांची, प्रेमाची ऊब असलेली 'गोधडी'...!!!! "
मला खूप आनंद झाला... मी त्या गोधड्या खूप जपायचो... शंतनु म्हणाला, अगं सगळे हसायचे मला, चिडवायचे... या गोधड्या लपवून ठेवायचे... खूप रडवेला व्हायचो मी... कारण या गोधड्या म्हणजे माझ्यासाठी आईच ग.... गोधडी शिवून दिल्या आणि आजी सुद्धा महिन्याभरात गेली पण जाताना माझ्यासाठी हा प्रेमाचा आणि आठवणींचा अनमोल खजिना देऊन गेली... तुम्ही लोकं हे वापरता ते नवीन रूप आहे गोधडीचे... दुसरे काही नाही...
तुला सांगतो... " रजई, दुलई असे आले गोधडीचे नवीन रूप....
पण आई- आजीनं मायेने शिवलेल्या गोधडीचे महत्व वेगळेच आहे खूप..."
त्यात माझ्या आईची ही पैठणी होती... काही खास असले की आई ही साडी घालायची... त्यावर नथ, दागिने किती छान दिसायची माझी आई... आजीने त्या पैठणी पासून ही गोधडी बनवली... म्हणून सण-वार, माझा वाढदिवसाच्या असला की मी ही गोधडी घेतो... मला ही गोधडी घेतली की आईच तें तेजस्वी रूप दिसत ग.... ती अजूनही आहे हे जाणवत मला....
नेहमीं आई साध्याच साड्या घालायची... त्यामुळे साध्या असल्या तरी या दोन साड्या तिला खूप आवडतं होत्या... म्हणुन मी ही गोधडी रोज वापरतो... आणि ही बघ... हि आईची साडी आहे ना ती आईच्या लग्नातली, आणि ही साडी आईने माझ्या बारश्याला घेतलेली... एवढीच आठवण आहे ग तिची माझ्याकडे... प्रत्येक साडीची गोधडी मला तिच्या मायेची ऊब देते ग... तिचा स्पर्श होतो मला यातून.... शंतनुला खूप भरून आले... शरूचे देखील डोळे पाण्याने भरून गेले...
शरू शांतपणे ऐकत होती आपला बाबा एवढा हळवा आहे ती प्रथमच पाहत होती... तिने मनापासून बाबांची माफी मागितली.... आणि म्हणाली खर आहे बाबा तुमचे या गोधडीचे महत्व खूप वेगळेच आहे याची सर कशाला येणार नाही....आईला सुद्धा तिने सॉरी म्हंटले, आणि म्हणाली बाबांमुळे आई आणि तिची साडी याचे महत्व मला नव्याने समजले ग...
तिघेही एकमेकांना मिठी मारून आनंदाने रडत होते... किती दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या म्हणून समाधानाचे एक वेगळेच सुख तिघांच्याही डोळ्यात दिसत होते...
कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
आणि अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....
साहित्य चोरी हा गुन्हा आहे. सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.