स्मरण क्रांतिकारकांचे
स्मरण क्रांतिकारकांचे
9 ऑगस्ट दिन हा क्रांतिकारकांचा,
स्मरण त्यांच्या कार्याचे करण्याचा!
दिडशे वर्षे गुलामगिरीचे सोसून फटके,
प्रतिदिनी बसत होते जणू मनालाच चटके!
घेऊन स्वातंत्र्याची आण, नेते काही सरसावले,
जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग त्यांनी पेटवले!
'करेंगे या मरेंगे'चा दिला मग नारा,
'चले जाव'चा भारतामधूनी इंग्रजांना दिला इशारा!
7 ते 9 ऑगस्टला गोवालिया टँक येथील अधिवेशना,
'चले जाव'ला मिळणार होती मान्यता...
इंग्रजांची झाली धारणा, बंदी केले जर नेत्यांना,
तर काय करेल सामान्य जनता!
8 ऑगस्टला केले गजाआड गांधींना,
नेहरू, मौलाना आझाद, पटेल आदींना!
प्रत्येक कार्यकर्ताच मग निभाऊ लागला नेत्याचा रोल,
तुटून पडले इंग्रजांवर सारे, एकच केला हल्लाबोल!
बालक्रांतिकारक ही पेटून उठले पाहूनी मोठ्यांची चुणुक,
'वंदे मातरम्' च्या घोषणेसह ध्वज फडकावण्या निघाली एक कुमक!
त्यात होता नंदुरबारचा शिरिषकुमार वय त्याचे सोळा,
निडर होऊनी गतप्राण झाला झेलुनी तीन गोळ्या!
लढले असे छोटे-मोठे पुरुष आणि स्त्रिया,
स्वतंत्र झाला भारत बलिदान तयांचे नाही गेले वाया!
संसाराची करूनी होळी पत्करले त्यांनी वीरमरण,
स्वातंत्र्यामध्ये नका माजू, ठेवू त्यांचे सदैव स्मरण!
पारतंत्र्यातून मोकळे करून, त्यांनी नष्ट केली गुलामगिरी!
स्वातंत्र्याचे सुराज्य करण्याची, आता आहे आपली जबाबदारी!
प्रेम, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, जपुनी सारे फुलवूया नंदनवन!
वीर क्रांतिकारकांना, ऑगस्ट क्रांती दिनी शतशः वंदन!