एका कवितेचे रसग्रहण
एका कवितेचे रसग्रहण
कवितेचे रसग्रहण - केवळ माझा सह्यकडा
भव्य हिमालय तुमचाअमुचा,
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा
, मनांत पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना
, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ,
प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला,
बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते
, तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे,
तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी
वाहतसे लाव्हा सगळा
कबीर माझा, तुलसी माझा
, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला
परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो
"एका" हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी
मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली
गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी;
जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा
करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकांठी
भावभक्तिची पेठ खुले
रामायण तर तुमचेंमाझे
भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी
निधान माझ्या हर्षाचें
********************
ही वसंत बापट यांची कविता मला अतिशय आवडते त्या लहान वयामध्ये त्याचा उत्तुंग अर्थ कळत नव्हता परंतु तेव्हाही ती खूप आवडायची.आज देखील माझी ही कविता पूर्ण पाठ आहे
महाराष्ट्र देशा बद्दल ठासून भरलेला अभिमान कवीच्या शब्दाशब्दातून प्रतीत होतो.वसंत बापट यांच्या सर्वच कविता अंगामध्ये एक स्फुरण आणणाऱ्या आहेत.
मग ती सदैव सैनिका असू दे, नाहीतर उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू असू दे सर्वच कविता हृदयाला भिडणार्या आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या असत.
कविवर्य वसंत बापट यांची ही कविता, त्यांच्या सर्व कविता अशा देशप्रेमाने आणि उत्साहाने ठासून भरलेल्या असत. या कवितेमध्ये ते महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल अतिशय अभिमानाने सांगतात.ते सांगतात हिमालय भव्य आहे तो तुमच्या-आमच्या सगळ्यांचाच आहे ,परंतु माझ्यासाठी माझा असा सह्याद्रीचा कडा तो फक्त माझा आहे.
जसे गौरीशंकर शिखर सगळ्या जगाचे आहे, पण माझ्या रायगडावर जे काही घडले ना! जो काही सुवर्ण इतिहास घडला ,त्याला तोड कुठेच नाही.त्यामुळे तो मला गौरीशंकर पेक्षा देखील उत्तुंग वाटतो.
गंगा जमुना तर सगळ्या देशाच्या आहेत, पवित्र आहेत .त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या अख्यायिका आहेत.परंतू माझी वाहणारी रांगडी भीमा, तिचा काठ, भिवरथडी, हे कभिन्न कातळ, लोकांची निधडी छाती, हेच मला प्रिय आहे.
त्या काळात उत्तर प्रदेशाकडून अनुनासिक जाणारी ठुमरी, गझल ,किंवा त्या गाण्यांमध्ये असणारे मधु गुंजन हे तुमचं तुम्हालाच लखलाभ होवो इथे डफाच्या थापेवर कडाडणारा रांगडा पोवाडा, मला प्रिय आहे.
ख्रिस्त आणि बुद्ध हे सगळ्या विश्वात पसरलेले आहेत.त्यांचे ज्ञान, त्यांचे चिंतन, सर्व जगाला मान्य आहे.परंतु इथे अतिशय शांत सोज्वळ, आणि आपल्या घासातला घास काढून देणारा संत तुकाराम याचा मला आधार आहे.
इथल्या माती पुढं मला सातही स्वर्ग देखील तुच्छ आहेत.या मातीचे कण लोहाचे आहेत.
त्यामध्ये ताकत अशी आहे की ,साधी साधी गवताची पाती देखील तलवारीच्या धारे सारखी होतात .
कवींनी याचा फार सुंदर अर्थ इथे लावलेला आहे.साधी साधी गवताची पाती म्हणजे तुमच्या आमच्या सारखी सामान्य माणसे सुद्धा देश प्रेमासाठी तलवार होतात एरवी आपण साधे गवत असतो..इथल्या कृष्णा नदीच्या पाण्यातून कायमच लाव्हा उसळत असतो.
तो लाव्हा म्हणजे कृष्णेच्या काठी, कृष्णा खोऱ्यात तयार झालेले क्रांतिवीर.
देशभरात मोठे मोठे कवी होऊन गेले., कबीरदास, तुलसी, जय देव, परंतु ज्ञानेश्वर , नामदेव, नामदेवांच्या नाचा मध्ये आणि ज्ञानेश्वरांच्या गीते मध्ये आम्ही जे रमतो ते बाकी कुठेच नाही.
सगळ्या जणांमध्ये जनार्दन बघणारा, गाढवाला देखील पाणी पाजून त्याच्यामध्ये परमेश्वर स्वरूप बघणारे संत एकनाथ, जना बाईच्या तुमच्या आमच्या सारख्या व्यवहारज्ञानतल्या ओव्या, साध्या सोप्या रसाळ शब्दात लिहलेल्या, ज्यामध्ये जनाबाई साठी स्वतः परब्रम्ह दळण दळू लागले ते जनाबाईचे अभंग. इंद्रायणीच्या डोहातली ओली गाथा, हे सगळे कायमचे माझे आहेत आणि मी त्यांचाशी माझी जवळीक झालेली आहे.
अहो आमचे संत चोखोबा विठ्ठल त्यांच्या हृदयामध्ये लपलेला होता.अगदी पैरण फाडून त्यांनी विठ्ठलाला आत मध्ये लपवला होता.असे ते चोखोबा, हे मला निर्गुण मानवतेची पूजा करणार्या लोकांपेक्षा भले वाटतात ,जवळचे वाटतात.आणि भिमा काठी भक्ती भावाची पेठ, बाजारपेठ फुलते ,ती मला जास्त जवळची वाटते .
असो रामायण सगळ्या देशाचे आहे.सगळ्या देशात राम आहे, पण तरीही माझ्या छत्रपती ची वीर कहाणी ऐकताना, मला हर्ष होतो.आनंद होतो, माझी छाती अभिमानाने भरुन येते, माझे बाहू स्फुरण पावू लागतात .अशा रीतीने त्या महाराष्ट्रातली प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट दाखला देऊन किती नितांत सुंदर आहे असे या कवितेमध्ये कवींनी दाखवलेले आहे.
ही माझी शाळेपासून आजतागायत अत्यंत जवळची आणि आवडती कविता आहे.