अपूर्ण राहिलेलं आयुष्य
अपूर्ण राहिलेलं आयुष्य
वर्णन
( ही कविता आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या आई-वडिलांच्या मनातील वेदना, असहाय्यता आणि न संपणारे प्रश्न व्यक्त करते. एका क्षणाच्या निर्णयाने संपलेल्या आयुष्यामुळे मागे राहिलेल्या कुटुंबाची तगमग, त्यांच्या मनात कायमची घर करून बसलेली पोकळी आणि "आमचा दोष तरी काय होता?" हा न सुटणारा प्रश्न या कवितेतून उमटतो.
ही कविता कोणावरही दोषारोप करण्यासाठी नाही, तर मागे राहिलेल्या आई-वडिलांच्या भावना, त्यांचं प्रेम, त्यांचा आधार हरवल्याची वेदना आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणींना शब्दबद्ध करण्याचा एक प्रयत्न आहे ) .
कोण होतास तू? काय झालास तू?
रंगलेल्या या डावात अचानक का सोडून गेलास तू?
आमचा अभिमान होतास तू,
आमचा आधार होतास तू...
कीव वाटते आता तुझी,
कारण आत्महत्येसारखं पाप केलंस तू...
कोण होतास तू...
अरे, दोन ओळी लिहून फासावरती चढलास,
जाताना आमचा चेहराही नाही आठवला...
दोष तरी काय आमचा?
हा प्रश्न विचारायचा तरी कोणाला...
कोण होतास तू...
शोधली दोरी, शोधला पंखा ,
पण सापडला नाही तुला तुझा आत्मविश्वास...
जिकूनसुद्धा बाळा, तू हरलास,
कारण जाताना आमचं काळीज घेऊन गेलास...
कोण होतास तू...
रडता रडता हसायचं विसरलास,
जाता जाता सांगून जायचं विसरलास...
माझ्या राजा, रडण्यापेक्षा हसणं सोपं तरी होतं,
जाण्यापेक्षा जगणं गरजेचं होतं...
कोण होतास तू...
कोणी दिली तुला परवानगी?
कोणी दिला तुला अधिकार?
शरीर तुझं होतं, जीव आमचा होता...
आयुष्य आमचं होतं, जगत तू होतास...
कोण होतास तू...
"तू एकटाच गेलास... पण जगण्याची शिक्षा मात्र आम्हाला देऊन गेलास..."
