यमाई देवीच्या दंतकथा
यमाई देवीच्या दंतकथा
यमाई देवीच्या बाबत एक दंतकथा अशी आहे की, औंध गावापासून जवळ किन्हई नावाचे गाव आहे.
त्या गावी कुलकर्णी नावाचे गृहस्थ राहत होते.
त्यांची देवीवर अतिशय श्रद्धा होती, त्यामुळे ते रोज सकाळी लवकर उठून दहा-बारा किलोमीटर अंतर चालत जाऊन देवीचे दर्शन घेऊन, पुन्हा आपल्या गावी येत असत, आणि मग रोजच्या उद्योग व्यवसायाला लागत असत.
एकदा काय झाले त्यांची बायको गरोदर होती.
तिचे दिवस भरत आले होते. आणि घरात करण्यासाठी कोणीच नव्हते. शिवाय पहिली वेळ होती ,आणि आठरा विश्व दारिद्र्य, त्यामुळे सुईणीला द्यायला पैसे पण नाहीत. त्यामुळे त्याने आपल्या मोठ्या बहिणीस म्हणजे आक्कास विचारले होते.
की "तू वहिनीच्या बाळंतपणासाठी माझ्याकडे येऊन राहशील का?
परंतु अक्काने स्वतःच आजारी असल्याचे कळवले होते, आणि येऊ शकत नाही म्हणून सांगितले होते.
इकडे बायकोचे दिवस भरत आले ,त्यामुळे ती नवऱ्याला विनंती करत होती की, "तुम्ही सध्या देवीच्या दर्शनात जाऊ नका, मला एकटीला सोडून जाऊ नका" मात्र त्याला आपला नित्यनेम चुकवायचा नव्हता.
त्यामुळे देवी सारं बघून घेईल ,मी माझा नेम चुकवणार नाही .तूच गावातील एखादी बाई बोलावून बाळंतपण करून घे, असे सांगून सकाळी उठून औंध ग्रामी गेला.
तिकडेच देवीचे दर्शन करता करता अत्यानंदाने त्याची समाधी लागली. आणि जवळजवळ आठ दिवस तो तिकडेच मूळ पिठापाशी राहिला. तिकडे बायको बिचारी एक तर स्वतःच्या बाळंतपणाची चिंता, वरून, नवऱ्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असताना, दारामध्ये एक घोडी येऊन थांबली. आणि त्या घोडी वरून अक्का उतरली.
ती म्हणाली "वहिनी मी आले हो! चिंता करू नका. आणि खारीक, खोबरं, तुपाचे डबे, बाळंत शेपवा, ओवा, असे बाळंतपणासाठी लागणारे सर्व सामान घेऊन नणंद आली.
तिने व्यवस्थित सामान लावले.घराचा ताबा घेतला. भावजयीचे बाळंतपण केले. आणि दररोज तिची सेवा करून, तिचे आणि मुलाचे कपडे धुवायला ओढ्यावर घेऊन जात असे.
त्या अक्काने सगळ्या गावालाच वेड लावले होते. सगळ्यांच्या घरी जाऊन बोलत होती, उठत बसत होती. आणि अक्का! अक्का! करून सगळे गाव तिला वश झालेले होते.
अशावेळी आठ दिवसानंतर त्याची समाधी उतरली ,तेव्हा दर्शनाला आलेले गावकरी सांगू लागले ."अरे बाबा! तू इकडे राहिलास, तिकडे तुझी बायको बाळंतीण झाली. तुला मुलगा झाला, तुझी बहीण आलेली आहे .
अक्का आलेली आहे.
तिने सगळ्या गावाला वेड लावलेले आहे.
सगळे नुसते तुझ्या अक्काचे भक्त झाले आहेत. तू काय इकडे बसलास?
त्याबरोबर त्याला आश्चर्य वाटले, आणि तो ताबडतोब आपल्या गावी आला.
कारण अक्का येणार नव्हती, तसे अक्काचे पत्र आल्याचे त्याला माहीत होते. त्यामुळे आक्का अशी अचानक कशी आली?
याचे त्याला आश्चर्यच वाटले. आणि तो घरात आल्या आल्या बायकोला विचारू लागला आक्का कुठे आहे ?
तेव्हा ती म्हणाली नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्यात.
त्याबरोबर तो गावकऱ्यांना विचारत ,विचारत, नदीकडे निघाला.
तेव्हा प्रत्येक जण सांगू लागले आक्का आत्ता इथेच होती. आत्ता पुढे गेली. अक्का आता इथे होती, आत्ता पुढे गेली आणि शेवटी तो नदीवर जाऊन पाहतो तर! तिथे कपडे वाळत घातलेले आहेत, परंतु आक्का दिसत नाही. त्याला वाटले घरी गेली असेल, म्हणून तो पुन्हा घरी आला. आणि अक्का घरात आली का? विचारू लागला
त्यावर बायकोने सांगितले की नाही! गेल्या दोन तासापासून अक्काबाई मला दिसल्याच नाहीत.
त्यानंतर मात्र त्याला झाला प्रकार समजला, देवी मातेने आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले, आपल्यासाठी नको ते हलके काम केले.
त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या, तो तसाच तडक पुन्हा औंध ग्रामाच्या मूळ पिठावरती गेला, आणि तेथे जाऊन देवीचे चरण धरून प्रार्थना करू लागला.
की आई! आमच्यासाठी तू कष्ट घेतलेस, हलके काम केलेस ,सगळ्या गावाला दर्शन दिले ,आणि मलाच का नाही? मला तुझे दर्शन हवे आहे.
त्यानंतर देवी प्रसन्न झाली, त्याला दर्शन दिले. आणि सांगितले,
"आता तू इथे रोज येण्याचे कष्ट करू नकोस! मी तुझ्या मागोमाग येते, मात्र तू मागे वळून पाहू नकोस.
अशा रीतीने तो कुलकर्णी नावाचा गृहस्थ पुढे चालला, देवी मागे चालू लागली.
तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज येत होता, म्हणजे देवी मागोमाग आहे.
परंतु शेवटी मानवी मन आहे, खरंच देवी आपल्या मागे येत आहे का?
हे बघण्यासाठी तो थांबला, आणि मागे वळून पाहिले.
तोपर्यंत कीन्हई गाव आले होते. आणि देवी गावाच्या सिमेवरच राहिली .
त्याला म्हणाली "आता मी इथेच राहणार, इथेच माझे मंदिर बांध .आणि कीन्हीई गावी आज देखील यमाईचे देऊळ आहे.