या जन्मावर या जगण्यावर
या जन्मावर या जगण्यावर
दुपारची टळटळीत वेळ, त्यात नदीच्या घाटावर कोणीही नाही .अशावेळी ती अनवाणी पायाने, डोक्यावर तापणाऱ्या उन्हाचा विचार देखील न करता, झपाझपा चालत होती.
कधी एकदा गंगामाईला जवळ करते ,आणि तिच्या कुशीत शिरते असे तिला झाले होते्.
आता भर दुपारची वेळ असल्यामुळे गावाकडचे कोणीही नदीकिनारी असणार नाही .
साधारणता कपडे धुवून बायका बाराच्या आत घरात गेलेल्या असतात, किंवा शेतावर गेलेल्या असत. पुरुष मंडळी देखील आपापल्या कामामागे असायची .
अगदीच घरातले म्हातारे कोतारे दुपारचे जेवून आराम करत असायची.
पोरं बाळ शाळेला गेलेली असायची, पाखर सुद्धा हे वैशाखाच ऊन नको म्हणून दुपारी झाडावरती बसून राहायची.
पण तिच्या नशिबाला मात्र वैशाख वणवा लागलेला होता.
लग्न झालं नवरा मरून गेला, कसाबसा दोन वर्ष संसार केला. पदरी पोरबाळ नाही, आणि मोठ्या दिरापासून इज्जत वाचवत, वाचवत गेली पाच वर्ष ती त्या घरात राहिली .
माहेरी आईबाप नव्हतेच, भावाने सांगितलं "दिली तिकडे मेली" पुन्हा इकडे तोंड दाखवू नको.
आता तिला कोणाचा आसरा नव्हता.
मरे मरे तो काम करून देखील कोणाला किंमत नव्हती. जावांना पण वाटायचे कशाला ही
"खायला कहार आणि भुईला भार " इथे राहिली आहे .सोडून जाईल तर बर! शिवाय आपल्या नवऱ्यांची नियत त्यांना पण ठाऊक होती .पण नवऱ्यांना बोलायची त्या काळात पद्धत ही नव्हती ,आणि हिंमत ही नव्हती.
मग सगळा राग तिच्यावर निघायचा.
सगळ्या गावांमध्ये सरस, दिसायला रूपवान ,सुंदर पण तिचं ते सौंदर्य तीचा शाप ठरत होतं ,आणि दिवसभर मरे मरे तो काम करायचं, पण रात्री देखील सुखाची झोप मिळत नव्हती. "कोण कुठून येईल, आणि इज्जतीवर घाला घालेल" अशी तिला भीती वाटायची .
कडेने ती जावेची पोर घेऊनच झोपायची, जेणेकरून कोणी आला तर पोरांना चिमटे काढून रडवता येईल .आणि पोरं जागी झाली म्हटल्यावर तो माणूस निघून जाईल.
असे किती दिवस काढायचे? कुठेच आशा दिसेना ,म्हणून तिने आज ठरवून टाकलं होतं.
आता फक्त कृष्णामाईच्या कुशीमध्ये आपलं जीवन संपवून टाकायचं .
नकोच कोणाला त्रास, घाटावर उभी राहिली, काही क्षण विचार करत होती उडी मारू का? नको!
उडी मारू, का नको!
पण मागे असे कोणतेही पाश नव्हते, तिच्यासाठी धाय मोकलून रडणार कोणी नव्हतं ,,मग काय करायचं असलं जीवन जगून? कोणीतरी म्हटलं आहे ना!
"पुसणारे कोणी असेल तर
रडण्याला अर्थ आहे
नाहीतर त्याशिवाय
जगणं देखील व्यर्थ आहे.
असाच काहीसा तिचा विचार झाला होता. शेवटी तिने मनाचाही हीय्या केला. डोळे बंद केले ,आणि धाडकन त्या पाण्यामध्ये उडी घातली. कृष्णाकाठच्या नदीकाठच्या गावातल्या सगळ्या मुला मुलींना पोहता येतं, तिलाही पोहता येत होतं .म्हणून तिने पोटाला दगडच बांधला होता .
पण तिच्याच पाठी अजून कोणीतरी उडी मारली, आणि तिला केसाला धरून ओढत ओढत किनाऱ्यावर आणलं.
तिला वाचायचं नव्हतं,
म्हणून ती हातपाय मारत होती, आणि पाण्याकडे ओढ घेत होती.
पण अखेर त्यान तिला काठावर आणलंच ,तिच्या पोटचा दगड पहिला सोडवला .
ती एकदमच भ्रमिष्टासारखी करू लागली .
"मला मरायचे, मला मरायचे, मला कशाला वाचवलं? माझ्या जगण्याला काही अर्थ नाहीये ,मला मरू द्या.
असे ओरडत राहिली
जेव्हा ती भानावरच येतच नव्हती, तेव्हा त्याने खाडकन तिच्या कानाखाली एक वाजवली .त्याबरोबर तिच्या डोळ्यापुढे काजवे चमकले, आणि ती निश्चिंंत पडून राहिली.