वृक्षवल्ली आम्हां सोयरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
विराज उंचपुरा देखणा महत्वाकांक्षी मुलगा होता. एखादी गोष्ट मनात आणली तर करायचीच.असा त्याचा बाणा. जिद्दी व विलक्षण धडाडी असलेला मुलगा होता. एका चांगल्या नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर गलेलठ्ठ पगारावर नोकरी करत होता. पण त्याला अधिकारी लोकांच्या हो ला हो मिळवून त्यांच्या मनाप्रमाणे मान तुकवणे जमत नव्हते.जीवाची घुसमट होत असे. पण घर संसार जबाबदाऱ्या असल्याने धीर होत नव्हता इतकेच.पण एके दिवशी स्फोट झाला. कुणालाही न कळवता त्याने पेपर टाकला. घरी आला. घरातील सर्वांना टेंशन आले. पण तो वरुन शांत दिसत असला तरी पुढे काय करावे? हे वादळ त्याच्या मनामध्ये होतेच. सरतेशेवटी त्यानंतर त्याने बांधकाम व्यवसायात जायचे ठरवले. कोणाच्याही हाताखाली मिंधे होऊन काम करण्यापेक्षा स्वतःच मालक बनून इच्छेप्रमाणे कमावणे हेच त्याचे ध्येय होय. त्याप्रमाण फक्त वाटचालच नाही तर तो त्यात यशस्वीही झाला. बिल्डिंगच्या क्षेत्रात त्याचे नाव चकाकू लागले .विराज एंटरप्रायजेस म्हणजे खात्रीलायक घरे हे समीकरणच होऊन गेले .
त्याला एक मोठी संधीच सांगून आली. खूप मोठा मोकळा प्लॉट होता. तिथे छोटी -मोठी खूप झाडे होती.मोठा असूनही स्वस्त असल्याने त्यापासून आजमितीपर्यंत झाला नाही एव्हडा फायदा होणार होता. त्यामुळे तो खूप खूश होता. डिलिंग फटाफट झाले.त्याने झाडे तोडून सपाटीकरण करण्यासाठी माणसे पाठवली.माणसे गेली. कुऱ्हाडीचे घाव घालणार तितक्यात जोरजोरात रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आवाज नेमके कोठून येतात तेच कळेनासे झाले.माणसे तर कुठे दिसेनात. भुताटकी भुताटकी असे ओरडत सगळे पळू लागले. त्याने वेगवेगळ्या माणसांच्या टीम पाठवल्या पण छे!सगळे नुसते घाबरुनच परत येत नसत तर त्यांना ताप भरे. पैसे जास्त घेऊन ही कोणी काम करायला जाईना.
जागा ताब्यात होती म्हणून विराज काही करू शकत नव्हता. भुताटकीची जाग म्हणून एव्हाना ती परत विकत घेणेच काय? तिथे कोणी फिरकतही नसे.
एव्हडे मोठे नुकसान स्वीकारणे विराजला मान्य नव्हते. त्याने एकदा स्वत:च जायचे ठरवले.त्याला खूप जणांनी अडवले. पण पैसा वाया घालवणे त्याला पटणारे नव्हते.
तो सकाळीच प्लॅाटच्या दिशेने निघाला. घाबरून त्याच्या सोबत कोणीही जायला तयार नव्हते. तो एकटाच मनाचा हिय्या करुन निघाला. तिथे पोहोचला .पूर्ण फिरला. झाडांमुळे छान वारे सुटले होते. ए.सी च्या थंडाव्यापेक्षा त्याला ते आल्हाददायक वाटले. चालून दमल्यावर वटवृक्षाखाली तो बसला .त्याला चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू आला. वर पाहतो तर चिमणीचे घरटे होते. नुकतेच जन्माला आलेल्या पिलांना ती भरवत होती. ते पाहून त्याला भरून आले. बरेच पक्षी झाडांवर विसावा घेत होते. त्यालाही भुकेची जाणीव झाली.आपण लवकर परतणार म्हणून सोबत खायला त्याने काहीच आणले नव्हते. तो त्या निसर्गरम्य वातावरणात इतका रमला की त्याला वेळेचे भानच राहिले नाही. आजूबाजूला पाहिले तर रसदार फळांची झाडे होती. त्याने ती फळे खाल्ली व तो तृप्त झाला. पोट शांत झाले. वडाच्या झाडाखाली त्याला शांत झोप लागली. थोड्या वेळाने त्याला पक्ष्यांच्या चिवचिवणाऱ्या आवाजाने जाग आली. शांत झोप लागल्याने तो एकदम फ्रेश झाला. तो करत असलेली चूक त्याच्या लक्षात आली. भुताटकी वगैरे काही नसून कामगारांना त्या झाडाचे रुदन ऐकू आले असावे. संध्याकाळी फ्रेश मूडमध्ये तो ऑफिसला पोहोचला. लगेच मिटिंग लावली. सगळ्यांना दिवसभराचा अनूभव सांगितला. सगळे अवाक होऊन ऐकत होते. पैसे वाया न घालवता त्या जागेचा सगळी झाडे ठेवून रिसॅार्ट बनवायचे त्याने ठरवले. जेणेकरून निसर्गाचा गोडवा ही कायम राहील. त्याने व्यवस्थित प्लॅनिंग केले. जणू झाडांना ही ते समजले. ज्यावेळी विराज त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन तिथे गेल्यावर झाडांनी मान डोलवून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला .जणू काही त्यांनी त्यांच्या आप्तेष्टांचे स्वागतच केले .