तिचं बाहेर बसणं
तिचं बाहेर बसणं
ये पोरा नग शिवू तुझ्या आयला कावळा शिवला आहे तिला. सखू रमेश ला ओरडली. म्हनजी काय असत ग आजे रमेश ने विचारले. तुला नाय कळायच जा तू बाहेर. तू काय आता इथं पुतळा होऊन उभ राहणार हायस जा की गोठ्यात सखू शालू ला बोलली. तशी चुपचाप शालू गोठ्यात गेली. गेली सहा वर्षे जस शालू लग्न करून आली तसं सासरी पाळी आली की सुनेन गोठ्यात पाच दिवस रहायचं ही प्रथा होती. शालू ला त्या गोठ्यात नको नको व्हायच. गुरांचा शेणाचा मुताचा वास जीव घुसमटून जायचा. घशा खाली घास उतरत नसायचा पण नाईलाज होता तिचा.
ती लग्न करून आली तेव्हा सतरा वर्षाची होती. गावा कडे मुलगी वयात आली की तिला लवकरात लवकर उजवून टाकत असत. लग्न म्हणजे काय आणि पाळी काय असते हे माहिती ही नसल्याच वयात मुलींची लग्न व्हायची. शालू लग्न होऊन विकासच्या घरात आली आणि तिला हे अस पाच दिवस गोठ्यात राहायचे नव्यानेच समजले. तिच्या माहेरी पण पाच दिवस पाळत होते पण बाहेर घरा बाजूच्या खोलीत पाळी आलेली बाई राहत असायची इथं मात्र वेगळंच होत.या दिवसात शालू ला खूप त्रास व्हायचा पोट आणि कंबर खूप दुखायचे . पण तिच्या नवऱ्याला विकास ला आणि त्याच्या आई ला काही घेणं न्हवत तिच्या दुखण्याचे . अशा स्थितीत पण ढिगभर भांडी आणि कपडे सासू तिला धुवायला द्यायची.
एकदा ती विकास ला बोलली अव ते मेडिकल मध्ये पॅड का काय मिळत ते आणा माज्या साठी कपडा वापरायला त्रास होतो. ती सुमी तेच वापरती बर असते म्हणत होती. लई शानी झाली ग तू. नको तिथ डोकं लावू नगस आई ला असलं काय बी चालणार नाही. शालू गप बसली. मुकाट्याने तिला हे पाच दिवस त्रास सहन करावा लागत होता. आपल्या पोराला पण ती जवळ घेऊ शकत नवहती. शालू हे बघ काय आणलं तुझ्या साठी म्हणत विकासने स्टेफ्रीचे पाकीट तिच्या हातात दिले. ती खूप खुश झाली. पण अचानक तिला तिची साडी खूप ओली ओली लागली तशी ती झोपेतून जागी झाली. सगळी गोधडी रक्ताने भरली होती. पॅडचं तिला स्वप्न पडले होते तर! आज लोक गाव सोडून शहरात नोकरीला गेली. मोठे मोठे टीव्ही घरोघरी आले. स्मार्ट फोन आले. पण तिच्या गावात बाईचं बाहेर बसणं काही बदलल नाही. असा विचार करत ती अंधारात निपचित पडून राहिली.
आज देशात खूप काही बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञान आले आहे. स्त्री स्वावलंबी बनली आहे पण काही खेड्यात मात्र आजही मासिक पाळीबद्दलची अंधश्रद्धा कायम आहे.