थेंबे थेंबे तळे साचे
थेंबे थेंबे तळे साचे
'अनेक गावावर दुष्काळाचे सावट' या वर्तमानपत्रातील बातमीने लक्ष वेधले.
सध्याच्या काळात मार्च महिन्यातच उन्हाचा तडाखा बसायला लागतो. नद्या, तलाव आटायला सुरूवात होते. वसुंधरा पण मग चिंतातूर होते.
निसर्गाचे चक्र उलटे घुमू लागते. सागर सरितेची विरहता पाहून दिनकराचे मन देखील व्यथित होते. सुर्यनारायण मात्र वसुंधरेचा या दिवसात कातरवेळीच ताबा घेतात.
हे उघड्या डोळ्यांनी पाहणे माझ्यासारख्या निसर्गप्रेमीला कसे शक्य आहे? निसर्गाप्रती आपण पण देणे लागतो हे विसरून चालणार नाही.
सुरुवात आपल्यापासूनच झाली की तर हा विचार मनाला शांत बसू देईना, शेवटी 'थेंबे थेंबे तळे साचे...'
निसर्ग कनवाळू तितकाच कृतघ्नदेखील होऊ शकतो. या विचाराने अंगावर सरसरून काटा आला.
खरंच निसर्ग कोपला तर आटपाट नगराची कहाणी व्हायला उशीर लागणार नाही. शेवटी चांगल्या गोष्टीचा श्री गणेशा मीच करायचे ठरवले.
लेखणी ऊचलली आणि सुट्टीचा उपक्रम म्हणून लिहायला सुरुवात केली.
बच्चे मंडळी या उपक्रमात सहभागी व्हा, स्वच्छ परिसर करूया नवीन झाडे लावू या परीसराशी बोलू या आई-बाबांनो निर्धास्त व्हा, खालील फोन नंबरवर काॅल करा, तुमचा एक काॅल फूलवेल, निसर्गाचा महाल. नोटीस बोर्डवर ही नोटीस चिटकवली.
खरं सांगू! धडाधड काॅल सुरु झाले. बच्चे मंडळीला घेऊन मी कामाला लागली. सोसायटीचा परीसर स्वच्छ झाला.
कंपाऊंडमध्ये रोपट्यांना आळे रूपी घराच्या उपक्रमात चिमुकले हात कामाला लागले.
घरातला ओला सुका कचरा रोपट्याचा खाऊ झाला. घरात आलेल्या फळांच्या बिया छोट्या आळ्यात पडू लागल्या. सांडपाणी आळ्यात झिरपू लागले.
बच्चे मंडळी निसर्गाच्या सान्निध्यात रमली. टिव्ही व मोबाईल विश्वातून बाहेर आली.
'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' हातात हात गूंफून ही बच्चे मंडळी हृदयापासून नाचली, मी पण वय विसरून त्यात सामिल झाले.
बालगोपांळाची निसर्गाशी जवळीक साधून देऊन एक मिशन फत्ते केले.
शेवटी थेंबे थेंबे तळे साचे हे चिमुकल्यांना पटले. माझं मिशन फत्ते झाले. कारण बचतीचे महत्त्व मी भावी पिढीत रुजवले होते.
आता मला उद्याच्या उ:षकालाची भीती नव्हती.