Ujwala Rahane

Others

3  

Ujwala Rahane

Others

माझी शाळा

माझी शाळा

2 mins
182


आमच्या वेळी शाळा एकच होती. गरीबाची आणि श्रीमंताची मुलं एकाच शाळेत शिकत होती.


 दप्तराची पिशवी सगळ्याची सारखीच होती. स्कूल बॅगची पध्दत तेंव्हा अस्तित्वातच नव्हती. 


  शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्याला फक्त नवीन गणवेश मिळायचा. मागचा मोठ्यांचा जुना गणवेश घालून ऐटीत शाळेत जायचा. 


  मोठ्यांचीच पुस्तके बारका वापरायचा.वहीच्या पाठकोरे पानांची रफ वही व्हायची. मागच्या पुढच्या पानावर सुविचारांची नोंद असायची. 


 जुन्या पुस्तकांना छान कव्हर घालून ताई नवीन करून द्यायची.ज्यांचे सुवाच्य हस्ताक्षर त्याच्याकडे वह्या पुस्तकांवर नाव टाकण्यासाठी सगळ्यांची रीघ लागायची. 


  जुना गणवेष, पुस्तके वापरण्यात कोणाकडे कमी पणाची भावना नसायची.


  पहिल्या दिवशी मात्र एक, दोन रूपये पॉकेटमनीची मिळकत वडीलांच्या कडून मिळायची. 


  शाळेच्या आवारात मिळणारी 'सुकी भेळ' पहिल्या दिवशी मनसोक्त खाल्ली जायची. डब्यात पण शिळी पोळी, भाकरी, चटणी, लोणचे याचीच मेजवानी असायची.


  घरातीलच स्टीलचा डब्बा किंवा पितळेचा डब्बा हाच लंच बॉक्स असायचा, कोणाकडे तर तोही नसायचा. मग धोतराच्या फडक्यात बांधून तो घेऊन यायचा.त्यात कमी पणा नाही वाटायचा. 


 प्यायचे पाणी तर एकाच पिंपात भरून ठेवलेले असायचे. साखळी लावलेल्या ग्लास मधून ते प्यायले जायचे.


  आमच्या वेळेस शाळेत सर, मॅडम नव्हते.गुरूजी आणि बाई म्हणूनच शिक्षकांना संबोधले जायचे.शाळेतील शिक्षक मनापासून शिकवायचे. शिकवणीचे अमीष त्यांच्या शिकवण्यात नसायचे.


  आई वडिलांना तर पोर कितवीत शिकते हे देखील माहीत नसायचे. शिक्षकांच्या पूर्ण विश्वासावर मुलं शाळेत सोडले जायचे. 


 रस्त्यावर गुरूजी, बाई दिसले तरी पोरं चळाचळा कापायची. मुलांना का मारलं? म्हणून कोणाच्याही पालकांची शाळेत तक्रार कधीच नाही यायची. 


  शाळा आमची शाळा होती. नादारी अर्ज 

अर्ज भरला कि,शाळेची फी देखील आम्हांला माफ व्हायची. पुस्तके सुध्दा मग शाळेतूनच मिळायची. 


 वर्षेॉकाठी एखादेवेळी ट्रक मधून जवळपास आमची सहल जायची.चाळीस,पन्नास रूपयात होणारी सहल, पण ती देखील द्यायची कोणाकोणाची ऐपत नसायची. 


 आमची शाळा,शाळा होती. ग्रामीण भागात आम्ही शिकलो,तिथेच लहानांचे मोठे झालो. एकजूटीने राह्यलो. मोठे झालो.


 गरीबीची लाज नाही वाटली. श्रीमंतीची पण हाव पण कधीच नाही भासली.अजुनही ती शाळा आठवते. 


 गावी गेल्यावर अपसुकच मनाला शाळेच्या प्रांगणात खेचून नेते. अजूनही ती इमारत तशीच आहे. आठवणींने डोळे भरून येतात. विस्मरणात गेलेल्या आठवणी पुन्हा जाग्या होतात.



Rate this content
Log in