शुभांगी कोतवाल

Inspirational

4.3  

शुभांगी कोतवाल

Inspirational

स्वरसाम्राज्ञी

स्वरसाम्राज्ञी

4 mins
197


स्वर कोकिळा , सुरांची राणी आणि साक्षात माता सरस्वती म्हणून जिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी , नाव , मान मिळालेल्या अशा लतादीदी , लता मंगेशकर .

इतकं भरभरून यश मिळूनही इतकी साधी रहाणी खूपच कमी पाहायला मिळतं , खरंच ! बालपणी वडील गमावण्याच दुःख , लहान वयात कुटुंबाची, लहान चार भावंडांची जबाबदारी आणि त्यासाठी केलेले कष्ट .

जन्मस्थान इंदोर ते कर्मभूमी मुंबई आणि वडिलांकडून संगीत शिकण्याची लहानपणीच केलेली सुरूवात आणि नंतर स्वतःच्या पायावर उभे राहून कामाची सुरुवात . किती सोसलं असेल , त्यात अगदी साधा स्वभाव , पण म्हणतात न " घाव सोसल्याशिवाय दगडाला पण देवपण येत नाही ." आणि खरंच संगीत आणि कलेची देवी माता सरस्वती असा खिताब आणि ओळख लतादीदींना मिळाली .

सिनेमा सृष्टीत पार्श्वगायन आणि अतिशय इमानदारीने , कष्ट घेवून , तहान - भूक सोसून फक्त कामावर लक्ष केंद्रित करून , सुरुवातीच्या काळात पायी चालत जाऊन स्टुडिओला पोहोचत असत . त्यांच्या एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे त्यांना जेव्हा माहित नव्हते की स्टुडिओ मध्ये कॅन्टीन आहे जिथे चहा - कॉफी , जेवण मिळते , तर त्या मोकळ्या मिळणाऱ्या वेळी काहीही न खाता - पीता खोलीत बसून रहात असत . किती साधेपणा आणि निखळ स्वभाव ! 

न थांबता , आळस न करता , गाण्याविषयीची आवड आणि सतत रियाझ करून स्वतः.तयार राहून , संगीतकार जसं समजावतील त्याप्रमाणे , प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शिकायची आणि ते आत्मसात करून प्रत्येक गाण्याला न्याय करणं ही जिद्द होती जणू त्यांची . म्हणूनच तर सगळ्यांची आवडती गायिका बनल्या . कधीही सुर व शब्दोच्चार न चुकता त्यांची गाणी अमर झाली .

आणि पार्श्वगायन म्हणजे आपल्या आवाजात गाणं म्हणून रेकॉर्ड करणे असं नाही , तर त्याबरोबर परफॉर्म करणं म्हणजे कोणत्याही गाण्याची पार्श्वभूमी लक्षात घेवून , ते कोणावर पिक्चराइज होणार आहे त्याप्रमाणे बदल करून , त्यात फीलिंग्ज व इमोशन्स देवून गाणी गायल्या आणि म्हणूनच तुमच्या - आमच्या सर्व श्रोत्यांच्या हृदया पर्यंत ती गाणी पोहोचू शकली .

हिंदी गाण्यांपैकी , ए मेरे वतन के लोगो , जरा आंख मे भरलो पानी जो शहीद .... राष्ट्र प्रेमा ने ओतप्रोत व सैनिकांना श्रद्धांजली असं हे गाणं अजरामर होऊन गेलं . तसेच " लगजा गले के फिर ये हसीन रात हो न हो " अशी अनेक गाणी ज्यांना सुंदर शब्दांची साथ पण मिळाली आणि लटताईंचा सुरेल आवाज .

तसेच मराठी चित्रपटातील , चाफा बोलेना , चाफा चालेना , चाफा खंत करी काही केल्या बोलेना....आणि राजा सारंगा ....अशी भरपूर गाणी कितीही जुनी झाली तरी तितकीच ताजीतवानी वाटतात हा लताताईंच्या जादुई अवजाचाच जणू चमत्कार . 

लतादीदींनी हजारोंनी गाणी गायली तीही अनेक भाषांमध्ये , कितीतरी कॉन्सर्ट्स आणि परफॉर्मन्स झाले . प्रत्येक वेळी तोच सुरीला आवाज आणि तोच खेळकरपणा . नेहमी मोठ्या बोर्डरच्या साड्या आणि नीटनेटका घेलतेला पदर व मोठ्या केसांच्या दोन वेण्या . 

शाळेत जाऊन शिकता आले नाही , बालपण इतरांसारखे जगता आले नाही याची खंत होती त्यांना पण वेळोवेळी वेगवेगळ्या भाषा , उच्चार व इतर टेक्निकल शिक्षण त्या घेत राहिल्या . आणि अर्थात स्वतःची अतोनात मेहनत आणि चिकाटी , समज व बुद्धिमत्ता यांनी उच्च मुक्काम गाठला .

कितीतरी युनिव्हर्सिटीच्या मानद व डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळाल्या . राष्ट्रीय व आंतररष्ट्रीय पुरस्कार मिळवले . आणि २००१ मध्ये त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च मानाचा खीताब मिळाला . आणि प्रत्येकवेळी त्यांनी स्वतःची योग्यता दाखवून दिली व टिकवून ठेवली . लहानमोठे जे कोणी त्यांच्या संपर्कात आले त्यांच्याशी आपुलकीने वागल्या त्यांना प्रोत्साहन दिलं .

स्वतःच्या व्ययक्तिक जीवनात पण समजूतदार म्हणा किंवा मोठेपणा म्हणा ज्यामुळे त्यांनी आजीवन अविवाहित रहाणं पत्करलं . संगीतासाठी असो , कामाची व्यस्त्तता व लहान भावंडांचे लग्न करून त्यांनी त्यांची जवाबदारी पार पाडली . आणि म्हणूनच त्यांना लतादीदी म्हणून खूप मान देण्यात आला , लहान भावंडांनकडून व समस्त देशवासीयांच्या त्या लतादीदी झाल्या .

पण जीवनात कसलीही खंत न बाळगता , कोणावर कधी राग न करता , मोठेपणा न मिरवता त्यांनी चेहऱ्यावर नेहमी निखालस , निरागस व सर्वांना आनंद देवून जाईल असं हास्य कायम ठेवलं . जीवनात भरपूर समृद्धी व सुख त्यांना मिळालं . 

लता मंगेशकर ज्यांना आईवडिलांवर अतोनात प्रेम , स्नेह व अभिमान होता . त्यांनीं दिलेल्या संस्कार व शिक्षणाचं नेहमी अनुसरण केलं . लतादीदी बद्दल जेवढं लिहू तेवढं कमीच आहे . प्रत्येक भारतीयांच्या मनावर ज्यांनी इतके वर्ष राज्य केलं . कोणीही व्यक्ती अशी नसेल जी त्यांच्या गाण्यांनी व व्यक्तिमत्त्वानी प्रभावित झाली नसेल . 

लतादीदी जरी हे जग सोडून ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी परलोकात किंवा स्वर्गात निघून गेल्या आणि सगळ्यांचं मन व्यथित करून गेल्या पण त्यांची कीर्ती , त्यांची गाणी आणि असंख्य आठवणी ह्या अमर राहतील . अशा ह्या आमच्या तुमच्या आवडीच्या लतादीदिंना कोटी कोटी प्रणाम .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational