स्पर्श - भाग सातवा
स्पर्श - भाग सातवा
अनन्या जशी जशी मोठी होतं होती तशी अबोलीला मधेच वाटायची की आपण अनन्याचे खरे आई बाबा नाही हे कळल्यावर ती कशी वागेल. मग अनिकेत तिला समजवायचा ,'वेळ येईल तेव्हा बघू.ती मोठी झाली की तिला विश्वासात घेऊन सांगू.'
अनन्या शाळेत जायला लागली. ती हुशार होती. एकदा सांगितल की सगळं लक्षात रहायच. घरी आजी पण तिला संध्याकाळी देवा समोर दिवा लावताना मांडीत घेऊन बसायची.तिला शुभंकरोती , श्लोक शिकवायची. बाप्पाला, घरातल्या सगळ्यांना नमस्कार करायला सांगायची.
संध्याकाळी अबोली तिला जवळच्या बागेत खेळायला घेऊन जायची. तिथे मुलांमधे मिसळून त्यांच्या बरोबर खेळायची. शाळेत पण ती धावण्याच्या स्पर्धेत, गॅदरींग मधे नाचात , फॅन्सी ड्रेस मधे भाग घ्यायची.
शनिवार रविवार अनिकेत सगळ्यांना गाडीतून फिरायला न्यायचा. चौकोनी कुटुंब छान मजेत होतं.
बघता बघता अनन्या मोठी होवू लागली. तिची आजी पण आता थकली होती. आजी अनन्याला सांगायची ,' आई बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांना कधी दुखवू नको. त्यांची काळजी घे.'
अनन्या म्हणायची ,' हो ग आजी.माझ पण त्यांच्यावर प्रेम आहे. मी कधीच त्यांना दुखावणार नाही.'
आजी मधे मधे असं का सांगते ते अनन्याला कळायच नाही. मग ती आईला विचारायची आजी मला अस का सांगते?
अबोली म्हणायची,' अग म्हाता-या माणसांना वय होयला लागल की काळजी वाटते. आम्हाला मुलगा नाही ना. म्हणून आजीला वाटतं.'
सासुबाई आता थकल्यात हे अबोलीच्या लक्षात आलं होतं.एक दिवस झोपेतच त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्या देवाघरी गेल्या.
अबोलीला तर खुपच वाईट वाटलं. अनन्या पण दुःखी झाली होती.