संवाद
संवाद
*सं-गत कायमची*
*वा-द एकमेकांशी*
*द-खल एकमेकांची*
संवाद संपला की समजावं,नात संपुष्टात आलं आहे.आपल्या जोडीदाराशी काय बोलावे याचा जर विचार करावा लागत असेल तर या सारखी शोकांतिका नाही.अशा वेळी समजून जावं की दोन शरीर फक्त एकत्र रहात आहेत ती मानानं खूप दूर गेलेली आहेत.आणि अशी नाती समाजमान्यता आहे म्हणून किंवा समाजाच्या भीती पोटी...लोक काय म्हणतील म्हणून एकत्र असतात किंबहुना टिकवली जातात.
तडजोड करणे हा संसाराचा भाग आहे,पण मनाशी असलेला मनाचा संवादच खुंटन म्हणजे दोन अनोळखी व्यक्ती एकत्र राहण्यासारखं आहे.याला कारणे अनेक असू शकतात, जोडीदाराकडून अवांतर अपेक्षा.. त्यांनी मी म्हणेन तसच वागलं पाहिजे हा अट्टाहास..नेहमी जोडीदाराला गृहीत धरून चालन एक ना अनेक...स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आपण कुठे कमी पडतोय हे पहावं, वारंवार वाद कुठल्या मुद्द्यावरून होतात ते समजून घ्यायला हवं.केवळ स्वतःचच घोड दामटवित राहण समोरच्याचा मुद्दा काय आहे...तो समजून घेण्याची इच्छा हो नसावी,मग नुसते वादच होणार ना! समोरचा कसा चुकीचा आहे त्या पेक्षा स्वतः कुठे चुकतोय हे पाहणं गरजेचं आहे.
नात टिकून रहाव यासाठी नात्यात पारदर्शीपणा हवा...पारदर्शी नात्यात संवाद किंवा चर्चा कुठल्याही विषयावर घडते..आणि जिथे विश्वास आहे इथे कुठल्याही प्रकारचा संवाद साधला जातो.
जोडीदाराशी हातच राखुन वागणं..गोष्टी लपवणे..कारण नसताना खोटं बोलणे ह्या मुळे आपोआप दुरावा निर्माण होत जातो,जोडीदाराला उपेक्षित असल्यासारखं वाटू लागतं अशानं संवाद कमी होणं सहाजिकच आहे.संवाद नसलेली नाती एखाद्या विशाल सुकलेल्या वृक्षासारखी असतात ,ती उभी तर आहेत पण बहरलेली नाही.