श्रवणधारा
श्रवणधारा
शेवटचा पेपर होता. त्या सायंकाळी मला तिच्या घरी जायचं होतं. तिने घरी काही सांगितलं नव्हतं. पण घरच्यांना अट घातली होती, जर प्राध्यापक झाले तर माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करून द्यावं. घरच्यांनी थोडेफार आढेवेढे घेतले होते, पण नंतर ते तयार झाले. त्यामुळे आम्ही दोघं आनंदात होतो. पेपर झाला. तिला भेटायाला म्हणून गेलो तर ती माझ्यापेक्षा जास्त घाईत होती. मला म्हणली, “आज एक राजकुमार येणार आहे आमच्याकडे. माझा हात मागणार आहे तो. त्याच्यासाठी मस्तपैकी स्वैपाक करायचा आहे.”
मी गालातल्या गालात हसत म्हणालो, “अच्छा, म्हणून घाई आहे का? पण मला बोलायचं आहे तुझ्याशी. थोडं थांब ना.”
“नाही, खरंच घाई आहे. आता चार वाजलेत. तू सात वाजेपर्यंत येणार मग कसं होईल?” ती पुढे जात होती आणि मी तिला थांबवत होतो.
“बरं एकदा मागे वळून तरी बघ.” मी आर्जव केली.
तिने मागे वळून बघितलं. त्या एका मिनिटांत मला मागची सहा वर्ष आठवली. कितीतरी बदललो होतो मी सहा वर्षात, सुधासाठी. मुलींशी न बोलणारा मी, आता सुधाशिवाय राहवत नव्हतं. तिच्याकडे बघतंच राहावं असं वाटत होतं. आम्ही सोबत गेटच्या बाहेर आलो. ती तिच्या वाटेला वळली आणी मागे वळून माझ्याकडे बघत हात हलवला. मीसुद्धा तिला बाय करून खोलीकडे निघालो. का? काय माहीत? पण त्या दिवशी तिच्याकडे बघतंच राहावंस वाटत होतं.
तिच्या घरचा पत्ता तिने एका कागदावर लिहून दिला होता. तिथे ते भाड्याच्या खोलीत रहायचे. शनिपारला वळसा घालून मग कुठेतरी बोळीत तिचं घर होतं. रस्त्यात मी एक पुष्पगुच्छ घेतला. सुमारे पावणे सातच्या सुमारास पोहोचलो. तिथं माला बरीच गर्दी दिसली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी अघटित घडलं होतं. मी एकला विचारलं तर त्याने सांगितलं की इन्स्पेक्टर साठे हे जेलमधून पळून जाणार्या कैद्याला अडवताना कैद्याने केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झाले आणि आता काही वेळापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यांपुढे अंधारी यायला लागली. पेपर संपल्यावर आनंदात असणारी सुधा आता कशी असेल? या विचाराने मला दररून घाम फुटला. तिला बघण्याचीसुद्धा हिंमत होत नव्हती. मी आणलेला पुष्पगुच्छ साठेंच्या प्रेतावर अर्पण केला. त्यांना भेट म्हणून आणलेली वस्तु त्यांना अशा प्रकारे द्यावी लागेल असा विचार मी स्वप्नातसुद्धा केला नव्हता. मी दुरून पहिलं सुधा आणि तिची आई धाय मोकलून रडत होत्या. होत्याचं नव्हतं झालं होतं.
मी तिथून निघालो आणि थेट खोलीवर आलो. दोन दिवस जेवण केलं नाही. घरून पत्रं येत होती, “परीक्षा झाली, केव्हा येणार आहेस?” मी काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेत होतो. घटना घडल्याच्या दहाव्या दिवशी मी तिचं सांत्वन करायला तिच्या घराची वाट धरली. कोण काय म्हणेल याचा विचार केला नव्हता. कारण या वेळी माझी सर्वात जास्त गरज तिला होती. तिच्या घरी पोहोचलो तर तिथं कुलूप होते. शेजारी विचारलं तर समजलं, सुधा आणि तिची आई आजोळी राहायला गेलेत कायमचे. मी मटकन खाली बसलो. काय करावं ते सुचत नव्हतं. मी शनिपारला आलो. तिथल्या मंदीरासमोर बराच वेळ नसून राहिलो. माझ्या डोळ्यासमोर शेवट्याच्या दिवशी पाहिलेली सुधा येत होती. आनंदात असणारी आणि रडणारी. तिचं आजोळ माला माहिती नव्हतं. मी दुसर्या दिवशी कॉलेजला गेलो. तिथून माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच हातात आलं नाही. तिच्या मैत्रिणींशी संपर्क केला. त्यांनाही काहीच माहिती नव्हतं.
जवळपास महिनाभर मी सुधाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण काही यश आलं नाही. शेवटी घरी परतलो. झालेलं सर्व विसरायला जवळपास सहा महीने लागले. त्यासाठी नदी आणि शेताचा सहारा घेतला. तिथंसुद्धा तिची आठवण यायचीच. मग हळूहळू पूर्वपदावर आलो. प्राध्यापक पदासाठी भरपूर कॉलेजमध्ये अर्ज केले. शेवटी प्राध्यापक झालो. नंतर प्रत्येक वेळी सुधाची शक्य तेवढी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण नाही सापडली ती. तिचा रुमाल आणि तिच्या घरचा पत्ता असलेला कागद एवढंच शिल्लक होतं माझ्याजवळ आणि अजूनसुद्धा आहे. असं म्हणत त्यांनी त्यांच्या पाकीटातून तो कागद काढून सगळ्यांना दाखवला. तो बघताना सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू सुरू झाले होते.