श्रवणधारा
श्रवणधारा
आजोळी असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये बाबांच्या जागी काम होण्यासाठी खूप प्रयत्न केले. आजोबांनी खूप ठिकाणी नाक घासल्यावर तिथं शिपायाची नोकरी लागली. प्राध्यापकाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्या वेळी तुझी खूपच आठवण यायची. पण नाईलाज होता. मग लगेचच माझं लग्न लाऊन दिलं. मी नाही वगैरे म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी आईला माझ्या सासरी घेऊन आली. माझा नवरा पुण्यातच एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. हळूहळू बाबांचं दुःख आम्ही विसरत होतो. माझा नवरा स्वभावाने चांगला होता. त्याने खूप समजून घेतलं. मी माझी नोकरी सुरूच ठेवली होती. लग्नानंतर दुसर्या वर्षी आम्हाला मुलगा झाला. त्याचं नाव शंतनू ठेवलं. त्याला खेळवताना आईचा वेळ आनंदात जायचा. त्याच्या बोबड्या बोलांनी आम्हाला खूप आनंद व्हायचा. आता सर्व अरिष्ट टळली असं वाटत असतानाच शंतनूच्या बाबांचा अपघाती मृत्यू झाला. माझ्यावर आभाळ कोसळलं. माझ्या मनात परत आत्महत्येचे विचार येऊ लागले. त्यावेळी मी शंतनूकडे पाहिलं आणि सर्व दुःख गिळून टाकलं.
हळूहळू शंतनू मोठा झाला. त्याच्या बाबांसारखाच हुशार निघाला. त्याला इंजिनीअर बनवलं. शिक्षण पूर्ण होताच तो मोठ्या कंपनीत नोकरीला लागला तेव्हा मी माझी नोकरी सोडली. त्याच्या लग्नासाठी म्हणून स्थळं बघायला सुरुवात केली. त्याला एकही स्थळ पटत नव्हतं. शेवटी त्याला विश्वासात घेऊन विचारलं, तेव्हा समजलं त्याचं एका मुलीवर प्रेम आहे. माझं तुझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न तुटलं म्हणून मी त्याच्यावर अन्याय करणार नव्हते. मी त्याला लगेच होकार दिला. यथावकाश सूनबाई घरात आल्या. आतापर्यंत भरपूर दुःख आली होती, त्यांना सहन करण्याची ताकद दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानले. शंतनू आणि त्याची बायको रोज सकाळी कामावर जात ते सायंकाळीच परत येत. त्यामुळे घरातली सर्व कामं मीच करू लागली. पण आमच्या सूनबाईंच्या मनात काहीसं वेगळंच होतं. आधी चांगली वागणारी ती माझ्याशी मनाला वाटेल तसं वागू लागली. कामाच्या ताणामुळे ती चिडत असेल म्हणून मी काही बोलले नाही. शंतनूने सुद्धा दुर्लक्ष केलं. मग हळूहळू तोसुद्धा माझ्याशी नीट वागेनसा झाला. मी सहनच करत गेले. पण एके दिवशी माझा संयम सुटला आणि आमच्या तिघांत खूप भांडण झालं. काही दिवस असेच शांततेत गेले. पण मला काय माहीत ती वादळापूर्वीची शांतता होती.
एके दिवशी शंतनू माझ्याजवळ आला आणि आनंदात म्हणाला, “आई, मला फार मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. माझं स्वप्न होतं अशा प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करण्याचं. पण एक अडचण आहे. प्रोजेक्टसाठी म्हैसूरला जावं लागणार आहे. कदाचीत अडीच वर्ष आणि त्यात अजून एक म्हणजे पुजाला सुद्धा म्हैसूरला नोकरी लागली आहे.”
तो सर्वच ठरवून आला होता. देवाने आतापर्यंत तारलं होतं आणि आताही तोच मार्ग दाखवणार होता. त्यामुळे सर्वकाही त्याच्या भरवशावर सोडून मी म्हणाले, “अभिनंदन तुझं आणि तिलाही सांग. ती तर काही बोलत नाही माझ्याशी. केव्हा जाणार आहात मग आता?”
“आठवडाभरत निघू. एक सांगू का?” त्याने थोडं घाबरं होत विचारलं.
“सांग. काय झालं?” मला अंदाज येत होता.
“तुझी हरकत नसेल तर तू अडीच वर्ष ‘निवारा ओल्ड केयर’ला राहशील का? म्हैसूरला तुला करमणार नाही. शिवाय भाषा आणि माणसं वेगळी.”
“हो, का नाही. चालेल मला.” काळजवर दगड ठेऊन मी बोलले. माझा अंदाज खरा ठरला होता. त्यांनी मला वृद्धाश्रमात हाकलण्याचं ठरवलं होतं.
मग आठवडाभर त्यांनी त्यांची आणि मी माझी तयारी केली आणि परवा मला निवार्यात सोडून गेले म्हैसूरला. एक वेळ अपंगत्व बरं, पण परवालंबत्व नको.
महाजनकाका सुधाकाकूंची गोष्ट ऐकताना सुन्न झाले होते. काय बोलावं हे त्यांनाही सुचत नव्हतं. मग काही वेळाने ते म्हणाले, “माझी गोष्ट जरा वेगळी आहे. माझी बायको सहा वर्षांपूर्वी वारली. मुलगा शिक्षणासाठी म्हणून परदेशात गेला तो कायमचाच. त्याच्या आईला ठेवायलासुद्धा आला नाही. त्यमुळे तो माझ्यासाठी मेलेलाच आहे. साधारणतः एक वर्ष झालं मला येऊन. परवा तू दिसलीस आणि आयुष्यात जगण्याची एक नवीन आशा पल्लवित झाली बघ.”